Thursday, 13 January 2022

पानिपत... शौर्यदिन !!!

पानिपत... शौर्यदिन !!!

१४ जानेवारी १७६१ , पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या मर्द मराठ्यांना मानाचा मुजरा.......!!!


कौरव - पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती !

तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानिपती !!


१४_जानेवारी याच दिवशी पानिपतमध्ये १ लाख मर्द मराठे भारताच्या रक्षणासाठी अब्दाली विरुद्ध कडवा संघर्ष करून धारातीर्थी पडले.. शत्रूनेही सलाम ठोकला मर्द मराठ्यांना . अब्दालीनेही लिहून ठेवले आहे, '  एवढ्या त्वेषाने जिद्दीने लढणारे मराठा शूरवीर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले.' 

- पानिपत म्हणजे मराठी सैन्याने दिल्लीच्या बादशहा बरोबर केलेला करार पाळायला आणि बाहेरून आलेला अब्दालीला धडा शिकवायला केलेला रणसंग्राम.

- पानिपत म्हणजे “ बचेंगे तो और भी लडेंगे “ अस उत्तर देणारा शूरवीर दत्ताजी शिंदे.

- पानिपत म्हणजे आपल इमान हाच आपला धर्म मानून अब्दालीच्या कौलाला झिडकारून मृत्यूला सामोरा जाणारा इब्राहिमखान गारदी.

- पानिपत म्हणजे कुंजपुरा जिंकल्यावर भाल्याच्या फाळावर कुतुबशहाच मुंडक लावून दत्ताजीच्या मृत्यूचा बदला घेणारा जनकोजी.

- पानिपत म्हणजे पोटात अन्नाचा कण नसताना अंगावर झालेल्या शेकडो जखमांची पर्वा न करता मराठा सैन्याला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे हजारो मावळे.

- पानिपतची लढाई जरी हरलेली असली तरी पुन्हा अब्दाली आणि कुणाचीही आक्रमण करायची हिंमत झाली नाही हेच या पराभवाच यश आहे. 


अखंड भारतावर परकिय आक्रमणांचा प्रवास अलेक्झांडर पासून होता.कुणीही यावं आणि दिवसाढवळ्या ह्या हिंदुस्थानच चक्रवर्ती सम्राट व्हाव.ग्रीक आले,हूण आले,कुशाण आले,इराणी आले,मोगल आले ,तुर्क आले,अफगाण ही आले.

पण,एक पानिपत घडलं..उभा महाराष्ट्र हौतात्म्याच्या वेदीवर उभा राहिला ...!! कळीकाळावर दात ओठ खाऊन धाऊन मराठे गेले आणि...परकिय आक्रमकांना खीळ बसली ती कायमचीच.

इतिहास चर्चा करतो ती पानिपत आम्ही गमावल्याची

पण आमचं वास्तव सांगतं. पानिपतात आम्ही आजचा भारत कमावला

पानिपतात आम्ही देवांना हेवा वाटेल असं हौतात्म्य कमावलं.

आणि हो...राष्ट्रानेही अनुसरावा असा महाराष्ट्रधर्म राखला....!!

जो पर्यन्त सुर्य चंद्र असतील ...जो पर्यंत महासागर आणि पर्वतांची शिखरे असतील...तो पर्यंत उत्तरेतल्या मागच्या पिढ्या पुढच्या पिढ्यांना सांगतील.

" दख्खन से मराठे आये थे...मौत के घोडे पर सवार होकर .. हिंदुस्थान कि शान मे उन्होनी अपनी जान समशेर पर रखी थी"

महाराष्ट्र म्हणून आपण समृद्ध आहोत .त्याचं सर्वात श्रीमंत कारण हे.


#शौर्यदिन #पानिपत #मराठे




 

मकर संक्रांतीची माहिती

“तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला”


पूर्वं परित्यज्य यदा ग्रहाणां राशिं परं प्रत्ययनं स कालः।

संक्रांतिवाच्योsयमतिप्रशस्तः स्नाने च दाने च स्वेर्विशेषात्।।


संक्रांत म्हणजे काय... याचा अर्थ समजून घेऊन आपण सण म्हणून साजरा करणे उचित ठरेल. कोणताही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्यावेळी प्रवेश करील, त्या प्रवेशकाळाला ‘संक्रांति’ असे म्हणतात. हा संक्रांतिकाल अत्यंत सूक्ष्म असतो. म्हणून त्यावेळी धार्मिक विधीसाठी पुण्यकाल असे सांगितलेले आहे. ते संक्रांतीच्या पुण्यकालात स्नान, दान इत्यादी करणे पुण्यकारक आहे, असे शास्त्रकार सांगतात. 

मकर संक्रांत म्हणजे काय...मकर ही रास असल्याचं सर्वांनाच ज्ञात आहे. धनु राशीतून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या प्रक्रियेला मकर संक्रांती असं म्हटलेलं आहे.  दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे मकर संक्रांत असं म्हटलं जातं.  वर्षभरात बारा राशींतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली, तरी भारतीय लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता यांचा लाभ होतो. त्यामुळेच त्यांना मकर संक्रमण उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटते. 


आता हा सण दरवर्षी एकाच दिवशी कसा काय येतो ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधीतरी येतोच. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. सोलर सायकल ही साधारणतः दर आठ वर्षांनी एकदा बदलते. त्याचवेळी मकर संक्रांत 15 जानेवारी रोजी येते. यापूर्वी 2016 या वर्षात मकर संक्रांत 15 जानेवारीला येऊन गेली आहे.

मकर संक्रांत आणि तीळगूळ हे समीकरणच आहे. पण याच सणाला तीळगूळ का खायचा किंवा गुळाच्या पोळ्या याचवेळी का खायच्या असतात?  तर त्यासाठीदेखील एक शास्त्रीय कारण आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. तसंच गुळातही उष्णता असते. थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तीळगूळ बनतात. शिवाय भूतकाळात झालेल्या कटू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तीळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला सुरुवात करायची असे म्हटले जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असंही म्हटलं जातं. त्यामुळे मकर संक्रांत साजरी करताना तिळगुळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.  तिळाचं सेवन करणं हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. शिवाय तीळ अतिशय पौष्टिक असतात. यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त प्रमाणात असते. शिवाय यामध्ये लोह, सेलेनियम, ब जीवनसत्त्व, मँगनीज आणि इतर तंतुमय पदार्थांची मात्रादेखील असते. तिळामधील असणारे कॅल्शियम आणि झिंक हे शरीराराती हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी मदत करते. त्यामुळे वयाच्या तिशीनंतर स्त्रियांना तीळ खाण्याचा फायदा होऊ शकतो. शिवाय ज्यांना मासिक पाळीचा त्रास आहे, अशा स्त्रियांनाही तिळातील कॅल्शियममुळे बराच फायदा होतो. संधीवातावर तिळाच्या तेलाने मालिश केल्यास, संधीवाताच्या रूग्णांनाही बराच फरक पडतो. त्यामुळे अशा तिळामध्ये गूळ मिक्स करून तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पौष्टिक गोष्टींचा फायदा होतो. 

मकर संक्रांत भारतीय महिलांचाही आवडीचा सण आहे. एकतर नववर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिलाच सण आहे. त्यात मकर संक्रातीला महिला हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. हळदी-कुंकूच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या-घेण्यासाठी बोलावता येतं. थोडक्यात महिलांना साजरा करण्यासाठी हा सण म्हणजे पर्वणीच असते. पण यावेळी नक्की काळा रंग का परिधान करायचा याची माहिती सर्वांनाच नसते. त्याचं शास्त्रीय कारण आहे. सणासुदीला काळा रंग खरंतर वर्ज्य आहे. मात्र मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते. हिवाळ्यात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान केले जातात. शिवाय मकर संक्रातीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात. त्यामुळे हलव्याचे दागिनेदेखील यावेळी घालण्यात येतात. 

एका आख्यायिकेनुसार, महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर (शरशय्येवर) उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला. भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार,भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते व त्या वेळी तिसऱ्या दिशेकडे पहात असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते त्यामुळेच संक्रात येणे म्हणजे संकट येणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात, त्या नष्ट वा महाग होतात अशीही समजूत आहे. पंचांगात तिचे चित्र दिलेले असते. संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्ये करीत नाहीत. सुनाग नामक ऋषींनी जाबाली ऋषींना संक्रांतीचे माहात्म्य सांगितल्याची कथाआढळते. 

महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी, तर नंतरच्या दिवसाला किंक्रांत किंवा करिदिन म्हणतात. किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती या देवीने किंकर नावाचा दैत्य मारला, अशी कथा असून तो दिवस अशुभ मानला जातो. 

संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:।

तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।

देवीपुराणातील या श्लोकानुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मकर संक्रांतीच्या शुभ काळात स्नान, दान, दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे.  या दिवशी लोक नदीत अंगाला तीळ लावून स्नान करतात. यानंतर, सूर्याला जल अर्पण केल्यानंतर, त्याची पूजा केली जाते आणि  चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना केली जाते. या नंतर वेगवेगळ्या वस्तूंचे दान केले जाते. आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे.

या दिवशी अनेक ठिकाणी पतंग उडविले जातात. गुजरात मध्ये तर पतंगोत्सव साजरा करतात. नाशिक जिल्ह्यातील येवल्याचाही  पतंगोत्सव प्रसिद्ध आहे. 

मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरी केली जाते जसे मकरसंक्रात – Makar Sankranti (महाराष्ट्र). . . पोंगल – Pongal (तामिलनाडु) . . . उत्तरायण (गुजरात व राजस्थान) . . . लोहढी – Lohri (पंजाब) . . . माघमेला – Magh Mela (ओडिसा) . . . भोगाली बिहु – Bihu (आसाम) . . . संक्रांती – Sankranti (कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, बिहार) अशी विविध नावं या सणाला आहेत.




Sunday, 9 January 2022

कुशावर्त तीर्थाचे शिल्पवैभव

 कुशावर्त तीर्थाचे शिल्पवैभव


त्र्यंबकेश्वर गावात स्थित असलेले कुशावर्त कुंड हे अत्यंत पवित्र मानले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी साधुलोक या ठिकाणी शाही स्नान करतात.

अशा कुशावर्त तिर्थांची जन्मकथा अत्यंत रंजक आहे. असे म्हणतात की गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरुन वारंवार गायब व्हायची. गोदावरीचे पलायन थांबविण्यासाठी  गौतम ऋषींनी कुशाची मदत घेतली आणि गोदावरीला बांधले. दर्भाच्या कुशाने चौकोन रेखून गोदावरीला अडवले ते त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ होय. तेव्हापासून या तलावामध्ये नेहमीच भरपूर पाणी असतं. हा तलाव स्वतः कुशावर्त तीर्थ म्हणून ओळखला जातो.


हे कुशावर्त कुंड श्रीमंत होळकर सरकारचे फडणीस, रावजी महादेव पारनेरकर यांनी इ. स. १७६८ मध्ये बांधले. कुशावर्ताभोवती उत्तर, पश्चिम आणि दक्षिण अशा तीन बाजूस ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्याच्या चारी कोपऱ्यांवर चार देवालयं आहेत. या तीर्थावर स्नान, दान, श्राद्धादिक करण्यासाठी हे अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. 

कुशावर्त तीर्थचा मंडप असंख्य अप्रतिम मूर्तीनी सजविलेला आहे. तोही आवर्जून पाहण्यासारखा आहे. 




















Friday, 7 January 2022

'बदाम' राजाला मिशी का नसते माहितेय?

 'बदाम' राजाला मिशी का नसते माहितेय?





पत्ते खेळणे हा अनेकांच्या आवडीचा छंद असतो. नातेवाईक-मित्र-मेत्रीणी एकत्र जमले की हटकून पत्ते ( Four Color Deck) खेळले जातात. लांबच्या प्रवासादरम्यान तर पत्ते खेळले की टाईमपास होतो. म्हणून सर्व वयोगटातल्या लोकांना पत्ते खेळणे आवडते.

पत्त्यांचा कॅट हा ५२ पानांचा असतो. त्यात एका रंगाचे १३ पत्ते असतात. त्यापैकी एक राजा असतो. असे चार रंगाचे चार राजे असतात. पण त्यातला एक राजा असा असतो की त्याला मिशी नसते. तुम्ही हे कधी नीट पाहिले आहे का? नसेल पाहिले तर बघाच. बदामच्या राज्याला मिशी नाहिये. त्यामागे हे कारण आहे.

हे आहे कारण : ५२ पत्त्यांच्या कॅटमध्ये चौकट, किल्वर, इस्पिक, बदाम ही चार चिन्ह आणि त्याच रंगाचे चार राजा असतात. असे सांगितले जाते की, जेव्हा पत्त्यांचा खेळ अस्तित्वात आला तेव्हा बदामच्या राजालाही मिशी होती. पण जेव्हा या पानांची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा डिझायनर बदामच्या राजाची मिशी बनवायला विसरला. आश्‍चर्य म्हणजे चूक कळल्यानंतरही त्याने ती सुधारली नाही आणि मग या चारपैकी एक राजा मिशीशिवाय राहिला.

ही चूक न सुधारण्याचे एक कारण असेही मानले जाते की 'बदाम राजा' हा 'शार्लेमेन' या फ्रेंच राजा चे चित्र आहे, तो दिसायला सुंदर आणि प्रसिद्ध होता. त्यामुळे वेगळे दिसण्याच्या इच्छेने त्याने मिशा काढल्या. या राजावर एक हॉलिवूड चित्रपटही बनवण्यात आला आहे, त्यातही राजाला मिशी नव्हती.

पत्ते आणि राजांचे कनेक्शन : पत्त्यांमधले चार राजे इतिहासामधील काही महान राजांचे प्रतिनिधीत्व करतात. पहिला हुकुमाचा बादशहा हा प्राचीन काळातील इस्रायलचा राजा डेव्हिडचे, किल्वर या कार्डावर मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट आहे. तिसरा चौकट हा रोमन राजा सीझर ऑगस्टसचे तर चौथा बदाम हा फ्रान्सचा राजा शारलेमेन आहे, जो रोमन साम्राज्याचा पहिला राजा होता.

(दै.  सकाळ ) 

Thursday, 6 January 2022

दुर्लक्षित असलेला नांदगावचा खोज किल्ला

नाशिक जिल्ह्यात फक्त मालेगावचाच एक तो काय भुईकोट आहे असे अनेकांना वाटते. पण लासलगावचा भूईकोट व त्याच सोबत नांदगाव तालुक्यातील खोज किल्ला हे देखील भुईकोट आहेत. त्यातील लासलगावच्या भुईकोटा विषयी तरी काही लोकांना माहिती असते पण नांदगाव तालुक्यातील खोज किल्ल्यविषयी स्थानिक व काही अभ्यासू दुर्ग भटक्यांनशिवाय इतर कुणास माहीत नाही.

नाशिकपासून जवळजवळ १३० किमी व नांदगाव पासून १६ किमी वर आहे ते नस्तनपुर.  या नस्तनपुराची अजून वेगळी ओळख म्हणजे येथे प्रभू श्रीराम यांनी वसवलेल शनिपीठ आहे; आणि याच शनिपिठाच्या पुढे आहे खोज किल्ला.  किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे किल्ल्याला खंदकासोबतच दुहेरी तटबंदीचा साज आहे तसेच किल्ल्यात असलेला एक बुरुज काहीसा सुस्थितीत आहे. या बुरुजाचा आकार अतिशय मोठा असून याच्या आत जाण्याचं जिन्याची रचना केलेली दिसते.  तसेच २ मजली सज्जे या बुरुजात केलेले दिसून येतात व आधी हा बुरुज दुसऱ्या एका बुरुजाला सज्ज्यायुक्त जिन्याने जोडलेला होता अशी योजना क्वचितच कोठे पहावयास मिळते 

सद्यस्थितीत दुसरा बुरुज पूर्ण ढासळला आहे. या बुरुजासोबतच अजून ८ बुरुज होते पण त्यांचे आता फक्त अवशेष तेवढे दिसतात. त्याचसोबत अश्व शाळा, हमामखाना, दगडी बारव,  तटबंदी यांचे अवशेष दिसून येतात खोजा नावाच्या राजाची आख्यायिका इतिहास विचारला तर स्थानिक सांगतात,  पण एकूणच गडावरील दुर्गस्थापत्य पाहता हा किल्ला निजामशाहीत निर्माण केला गेला असावा.  पण शोकांतिका अशी की आपल्याला या किल्याच्या इतिहासाचा अंदाजच तेवढा लावता येतो. 

गॅझेटियर मध्येदेखील नोंद नसलेल्या या किल्ल्याकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे नाहीतर काही दिवसात याचे नाव फक्त तेवढे शिल्लक उरेल...

प्रा.प्रशांत पाटील

#travellerprashant #khojafort #nastanpur #nashik #gadkille #fortsofindia #maharashtra_forts 







Monday, 3 January 2022

नववर्षानिमित्त आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आतषबाजी

जगभरात नव्या वर्षाचं स्वागत विविध देशांमध्ये दिमाखदार आतषबाजीने करण्यात आले. मात्र यात सगळ्यात अभूतपूर्व होती ती चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमध्ये करण्यात आलेली आतषबाजी. संवर्धित वास्तव तंत्रज्ञानाचा (Augmented Reality Technology) वापर करून करण्यात आलेली डोळ्यांचे पारणे फेडणारी ही आतषबाजी वैशिष्ट्यपूर्ण कशी होती हे व्हिडिओमध्ये अवश्य पहा 


Fireworks last night at Beijing (China)... awesome use of AR  technology on the grandest scale ever.


#fireworks #china #newyear #2022 #ARtech #AugmentedReality 


https://www.youtube.com/watch?v=Om4cqPHYE2M





Saturday, 1 January 2022

नववर्षदिन १ जानेवारीलाच का साजरा केला जातो?

नववर्षदिन १ जानेवारीलाच का साजरा केला जातो?

जानेवारी हे नाव ग्रेगरीयन वर्षातील पहिल्या महिन्यासाठी रोमन देवता जानुस (Janus) याच्यावरून ठेवण्यात आले. 

जानुस ही देवता रोमन संस्कृतीमध्ये  शुभारंभाची देवता मानली जाते. या देवतेला दोन शिरे कल्पिलेली आहेत. एक शिर वृद्धावस्थेतील म्हणजे मावळत्या वर्षाचे प्रतिक तर दुसरे शिर यौवनावस्थेतील म्हणजे येणा-या वर्षाचे प्रतिक मानले जाते.

नववर्षदिन हा जानेवारी महिन्याच्या प्रारंभी या देवतेच्या सन्मानार्थ साजरा केला जात असे. 

ग्रेगरीयन नववर्ष २०२२ च्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐

- ©️अशोक दारके

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...