Saturday, 16 May 2026

Vintage photo 1909


 Boys begging on the streets of Nashik, 1909.

Vintage photo 1914


 “For in the Nasik Market-place one Day

I snapp’d the Potter thumping his wet clay”

Photograph from Nasik, year 1914 taken by F. H. Fitz Gerald of Bombay. The caption was creative interpretation from the poem (The Rubaiyat of Omar Khayyam) by Omar Khayyam used as caption by F. H. Fitz Gerald

Vintage photographs of Nashik


Photographs of Sundar Narayan temple (Nashik) taken by Henry cousens in year 1880  Built by - Peshwa Sardar Gangadhar Yashwant Chandrachud  Built in - Year 1756   Temple Dedicated to Vishnu   Location - Ravivar peth



Photograph of Naroshankar temple (Nashik) taken by John William in year 1850   Built by - Naroshankar Rajebahaddur  Built in - Year 1747   Temple Dedicated to Shaivism   
Location - Panchavati , Nashik , Maharashtra




Photograph of Naroshankar temple (Nashik) taken by John William in year 1850   Built by - Naroshankar Rajebahaddur  Built in - Year 1747   Temple Dedicated to Shaivism   Location - Panchavati , Nashik , Maharashtra





Photographs of Trirashmi Caves (Nashik) taken by David harold day in year 1869    Built by - the Western Kshatrapas dynasty , the Satavahanas dynasty and the Abhiras dynasty   Built in -  2 nd century BCE to 5 th 


Photographs of Trirashmi Caves (Nashik) taken by David harold day in year 1869    Built by - the Western Kshatrapas dynasty , the Satavahanas dynasty and the Abhiras dynasty   Built in -  2 nd century BCE to 5 (5)


Photographs of Trirashmi Caves (Nashik) taken by David harold day in year 1869    Built by - the Western Kshatrapas dynasty , the Satavahanas dynasty and the Abhiras dynasty   Built in -  2 nd century BCE to 5 (5)


Photographs of Trirashmi Caves (Nashik) taken by David harold day in year 1869    Built by - the Western Kshatrapas dynasty , the Satavahanas dynasty and the Abhiras dynasty   Built in -  2 nd century BCE to 5 (5)


Photographs of Trirashmi Caves (Nashik) taken by David harold day in year 1869    Built by - the Western Kshatrapas dynasty , the Satavahanas dynasty and the Abhiras dynasty   Built in -  2 nd century BCE to 5 (5)




Photographs of Trirashmi Caves (Nashik) taken by David harold day in year 1869    Built by - the Western Kshatrapas dynasty , the Satavahanas dynasty and the Abhiras dynasty   Built in -  2 nd century BCE to 5 (5)



शनी महाराज जयंती आणि शनी अमावस्या : कर्म, न्याय आणि आत्मपरीक्षणाचा अद्वितीय योग



नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम् ।

छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् ॥



आज शनिवार, १६ मे २०२६ रोजी शनी जयंती आणि शनैश्चरी अमावस्या असा अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रात आणि हिंदू धर्मात या योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्यपुत्र कर्मफलदाते शनी महाराज यांचा जन्मोत्सव आणि शनिवारची अमावस्या एकाच दिवशी येणे, हा भाविकांसाठी आणि साधना करणाऱ्यांसाठी एक सुवर्णयोग मानला जातो. जेव्हा वैशाख महिन्याची अमावस्या शनिवारी येते, तेव्हा तिला शनैश्चरी अमावस्या म्हटले जाते. याच दिवशी शनी महाराजांचा जन्म झाल्याने हा दिवस शनी जयंती म्हणूनही साजरा केला जातो.
भारतीय संस्कृतीत ग्रह, तिथी आणि सण यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक ग्रह मानवी जीवनावर विशिष्ट परिणाम घडवतो, अशी श्रद्धा आहे. त्यामध्ये न्यायप्रिय, कर्मफलदाता आणि कठोर शिस्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे भगवान शनीदेव विशेष पूजनीय मानले जातात. यंदा शनी महाराज जयंती आणि शनी अमावस्या हे दोन्ही पवित्र योग एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व अनेकपटींनी वाढले आहे.
वैशाख महिन्याच्या अमावस्येला शनी जयंती साजरी होते. परंतु ती अमावस्या आणि शनिवार एकत्र येणे — हे विरळाच घडते. ज्योतिषशास्त्रात या संयोगाला "शनी त्रिवेणी" म्हणतात — शनिवार, शनी जयंती आणि शनी अमावस्या एकत्र. शनीदेवाची उपासना करणाऱ्यांसाठी आज जणू महापर्व आहे.
शनी महाराजांच्या जन्माची एक पौराणिक कथा ख्यातकीर्त आहे. सूर्यदेवांची पत्नी संज्ञा (सुवर्चला) ही सूर्याचे तेज सहन करण्यास असमर्थ झाली. तेव्हा तिने आपली छाया (सावली) निर्माण केली आणि स्वतः अश्विनी घोडीच्या रूपाने तपश्चर्येस निघून गेली. सूर्यदेव छायेलाच संज्ञा समजून राहिले. छायेच्या गर्भातून शनिदेवाचा जन्म झाला. शनी हे सूर्यपुत्र आहेत. सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांचे पुत्र म्हणून शनी जन्माला आले. म्हणूनच त्यांना छायापुत्र असेही म्हणतात. जन्मतःच शनीचे तेज इतके प्रखर होते की त्यांनी सूर्याकडे पाहताच सूर्याचे शरीर काळवंडले, असे पुराणांत वर्णिले आहे. यमराज हे शनींचे थोरले बंधू होत.
शनींनी लहानपणापासून ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्यांना नवग्रहांत स्थान दिले आणि सांगितले की तू जे पाहशील, त्याचे भले किंवा बुरे होईल. म्हणूनच आजही शनी कुणाचे अनिष्ट करत नाहीत — ते केवळ कर्माचे फळ देतात. शनी हे नवग्रहांपैकी एक असून ते न्यायाचे देवता मानले जातात.
रामायणात हनुमंताने शनींना लंकेत कैदेतून सोडवले, त्यामुळे शनी हनुमंताचे भक्त असलेल्यांना त्रास देत नाहीत असे मानले जाते. म्हणूनच शनिवारी हनुमानाची आणि शनींची एकत्र पूजा होते.
शनीची गती मंद असल्याने त्यांना शनैश्चर (हळू चालणारा) असे नाव आहे. मकर आणि कुंभ हे दोन राशींचे ते स्वामी आहेत. ते कर्म, न्याय, शिस्त, कष्ट आणि त्यागाचे प्रतीक आहेत. माणसाच्या आयुष्यातील साडेसाती व ढैय्या हे शनीशी निगडित आहेत आणि म्हणूनच बहुतेक जण शनींना भीतीने पाहतात. परंतु शनी हे शत्रू नव्हेत — ते कठोर गुरू आहेत.
शनीदेवांबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. शनी हे "क्रूर ग्रह" आहेत, ते दुःख देतात, त्यांना टाळावे, असा बहुतेकांचा समज असतो. परंतु हे सत्य नाही. शनी देव हे क्रूर नसून न्यायप्रिय आहेत. ते व्यक्तीला त्याच्या कर्मांनुसार फळ देतात (चांगल्या कर्माला चांगले आणि वाईट कर्माला शिक्षा). ते तर न्यायाची देवता आहेत. शनी हे कर्मफलदाता आहेत. ते स्वतःहून कुणावर संकट आणत नाहीत. मनुष्याने आपल्या जीवनात जे कर्म केले — चांगले असो वा वाईट — त्याचे फळ शनींच्या दशा, साडेसाती किंवा ढैय्याच्या काळात मिळते. म्हणजेच शनी हे न्यायाधीश आहेत — पण आपण स्वतःच आपल्या कर्मांचे साक्षीदार आहोत.
शनींचा प्रभाव जेव्हा असतो, तेव्हा माणूस विनम्र, सहनशील, कष्टाळू आणि धर्मपरायण बनतो. शनी माणसाला खाली आणत नाहीत — ते माणसाचा अहंकार नाहीसा करतात आणि त्याला खऱ्या अर्थाने घडवतात.
अमावस्या हा चंद्राच्या अस्ताचा दिवस — पितरांचा दिवस. या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण, तर्पण आणि श्राद्ध करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. शनीदेव हे मृत्यूलोक आणि जीवनातील कर्मफलाशी जोडलेले असल्याने शनी अमावस्येला पितृपूजेसोबत शनीपूजाही करण्याची प्रथा आहे. या दुर्मिळ योग असलेल्या दिवशी शनी देवांची पूजा केल्याने कुंडलीतील साडेसाती, ढय्या आणि शनी दोषांची तीव्रता कमालीची कमी होते, अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आज अत्यंत विशेष आहे. शनी जयंती + शनी अमावस्या + शनिवार — या तीन गोष्टी एकत्र आल्याने आजचे शनी उपासनेचे फळ शतपटीने वाढते, असे ज्योतिषी मानतात. शनींचे मूलस्थान म्हणजे मकर राशी. सध्या शनी मकर-कुंभ संक्रमणाच्या काळात आहेत. अशा काळात त्यांची उपासना करणे म्हणजे थेट शनींच्या शक्तीशी जोडणे होय.
शनी जयंती आणि शनी अमावस्येचा हा महासंयोग म्हणजे केवळ भीतीपोटी उपासना करण्याचा दिवस नाही, तर स्वतःच्या कर्मांचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. "सत्कर्म करत राहा आणि कोणावरही अन्याय करू नका" हाच शनी देवांचा खरा संदेश आहे. या दिवशी केलेली उपासना, दान, व्रत आणि सेवाकार्य केवळ या जन्मातीलच नव्हे, तर पूर्वजन्मातील कर्माचेही शोधन करते असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी मनापासून शनीची प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
आजचा हा दुर्मिळ योग आपल्या सर्वांना सुबुद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी, शांती आणि ईश्वरी कृपा घेऊन येवो — हीच शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना!
॥ ॐ शं शनैश्चराय नमः ॥

Saturday, 5 July 2025

असा असतो आषाढी वारीचा सोहळा


🚩 हेचि घडो मज जन्मजन्मांतरी ।
       मागणे श्रीहरी नाही दुजे ।।

आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या, की वारी संपली असा  सर्वसाधारण समज असतो. परंतु वारीचा मुख्य दिवस असलेल्या आषाढी एकादशीला कोणते धार्मिक कार्यक्रम होतात? संतांच्या पालख्या किती दिवस पंढरपुरात थांबतात? त्यांचा दिनक्रम कसा असतो.

🚩 संपदा सोहळा नावडे मनाला । 
       लागला टकळा पंढरीचा ।। 

ज्येष्ठ महिना आला, की वारकऱ्यांच्या मनाची अवस्था अशी होते. वेगवेगळ्या संत क्षेत्राहून संतांच्या पालख्या शेकडो दिंड्यांसहित आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघतात. वारीमध्ये सहभागी नसलेले अनेक जण वारीचा हा सोहळा वर्तमानपत्र, टीव्ही आणि इतर माध्यमांतून अनुभवत असतात. या काळात सर्व महाराष्ट्रच वारीमय झालेला असतो.

*🚩 पलंग निघणे*

खुद्द पंढरपूरमध्येसुद्धा आषाढ महिना सुरू होताच वारीच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात रोज सकाळी काकड आरती, त्यानंतर देवाचा अभिषेक आणि आरती, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी साडेचार वाजता पोशाख, सायंकाळी धुपारती, रात्री शेजारती आणि त्यानंतर देवाची निद्रा असे उपचार रोज होत असतात. उपचारादरम्यान आणि रात्री शेजारतीनंतर पहाटपूजेनंतरची आरती होईपर्यंत असे एकूण आठ-नऊ तास दर्शन बंद असते. आषाढी वारीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होते. एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांना २४ ,४८ तास रांगेत थांबावे लागते. भक्तांना जशी देवाच्या दर्शनाची ओढ असते, त्याप्रमाणेच देवसुद्धा भक्तांना भेटण्यासाठी आसुसलेला असतो.

वारीमध्ये अधिकाधिक भक्तांना देवाचे दर्शन घेता यावे, यासाठी देवाचे काही उपचार बंद केले जातात. यालाच पलंग निघणे असे म्हणतात. 
पूर्वी आषाढ शुद्ध पंचमीच्या सुमारास देवाचा पलंग निघत असे. आता आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजे आषाढ महिना लागताच पहिल्याच दिवशी देवाचा पलंग निघतो. यादिवशी शेजघरामधील देवाचा पलंग बाहेर काढला जातो. या दिवसापासून देवाची झोप बंद. त्यामुळे श्रमपरिहारार्थ देवाच्या मागे लोड, रुक्मिणी मातेच्या मागे तक्का लावण्यात येतो. दुपारचा पोषाख बदल, सायंकाळची धुपारती, रात्रीची शेजारती आणि झोप इत्यादी उपचार बंद करण्यात येतात. फक्त सकाळची पूजा आणि दुपारचा नैवेद्य होतो. सायंकाळी लिंबूपाणी आणि रात्री दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात.

*🚩 पालख्यांचा पंढरपूर प्रवेश*

आषाढ शुद्ध षष्ठीच्या सुमारासच काही पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. यामध्ये खान्देशातून येणाऱ्या संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा हा महत्त्वाचा सोहळा आहे. शुद्ध नवमीला बहुतेक सर्व महत्त्वाच्या पालख्या पंढरपूर जवळील वाखरी येथे मुक्कामाला येतात. वाखरी हे ठिकाण पंढरपूर पासून आठ किलोमीटरवर आहे. नवमीला याठिकाणी माऊलींच्या पालखीचे उभे आणि गोल रिंगण होते. हा सोहळा पाहण्यासाठी अनेक पंढरपूरकर गर्दी करतात. हा मुक्काम पंढरपूरपासून जवळ असल्याने अनेक वारकरी नवमीला अथवा दशमीला पंढरपुरात येऊन चंद्रभागा स्नान आणि नगरप्रदक्षिणा हा महत्त्वाचा विधी उरकून घेतात. पुन्हा वाखरीला आपापल्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. दशमीला पहाटेपासूनच वाखरीवरून वेगवेगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये यायला सुरुवात होते.

*🚩 नामदेवराय जातात सामोरे*

दशमीला सकाळी पंढरपुरात आधीच प्रवेश केलेल्या मुक्ताबाईंची पालखी आणि पंढरपूर येथील केशवराज संस्थानमधून निघणारी संत नामदेवांची पालखी सर्व संतांच्या स्वागतासाठी वाखरीच्या दिशेने निघते. नामदेवराय म्हणजे पांडुरंगाचे प्रतिनिधी. नामदेव राय आले म्हणजे पांडुरंग आला अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते. नामदेवरायांचा पालखी सोहळा पंढरपूर आणि वाखरी यामधील पादुका मंदिरापाशी येतो, तेव्हा माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार तेथे येऊन नामदेवरायांना पुढे चालण्याची विनंती करतात. त्यानंतर शेवटचे सात पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.

पंढरपूर प्रवेशामध्ये शेवटच्या सात पालख्यांचा क्रम ठरलेला आहे. यामध्ये सर्वात शेवटी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, त्यांच्या पुढे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, त्यापुढे संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपान काका, संत मुक्ताबाई आणि पंढरपूरवरून संतांच्या स्वागताला आलेले संत नामदेवराय असा क्रम असतो. विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिरापाशी आल्यावर बहुतेक पालखी सोहळ्यामध्ये उभे रिंगण होते. हे सोहळ्यातले शेवटचे रिंगण. पंढरपूरच्या वेशीवर सर्व पालखी सोहळ्यांचे उत्साहात स्वागत केले जाते. सर्वात शेवटी असलेला माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचायला रात्रीचे दहा वाजतात.

*🚩 पंढरपुरातील मुक्काम*

दशमी ते चतुर्दशी पाच दिवस पालख्यांचा मुक्काम पंढरपूरमध्ये असतो. यापैकी एखादी तिथी कमी अथवा अधिक झाल्यास मुक्कामाचा एखादा दिवस कमी जास्त होतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी मुक्काम नाथ चौक येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये असतो. संत एकनाथ महाराजांची पालखी नाथ चौकातील नाथ मंदिरात उतरते.

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी बेलापूरकर मठामध्ये उतरते. ही तीनही ठिकाणे नाथ चौकाजवळ आहेत. संत तुकाराम महाराजांची पालखी प्रदक्षिणा मार्गावरील संत तुकाराम महाराज मंदिरात उतरते. संत सोपान काकांची पालखी तांबड्या मारुतीजवळील संत सोपान काका पालखी मंडपामध्ये, तर मुक्ताबाईंची पालखी तेथून जवळ असलेल्या मुक्ताबाई मंदिरामध्ये उतरते. शेगाव येथील गजानन महाराज संस्थानने पंढरपूरमध्ये मोठे प्रशस्त मंदिर आणि भक्तनिवास बांधले आहे. संत गजानन महाराजांची पालखी तेथे मुक्कामाला असते.

*🚩 आषाढी एकादशी 🚩*

आषाढी एकादशीचा दिवस हा वारीचा मुख्य दिवस. या दिवशी भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानास गर्दी होते. किंबहुना दशमीच्या रात्री आणि एकादशीस दिवसभर चंद्रभागा स्नान चालूच असते, असे म्हणायला हरकत नाही. आषाढी एकादशीला पहाटे विठ्ठल मंदिरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात येते. ही महापूजा शासनाच्या वतीने, शासनाच्या खर्चाने केली जाते. त्यामुळे याला शासकीय महापूजा असे म्हणतात. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी त्या त्या संतांच्या पादुकांची पूजा करण्यात येते. त्यानंतर संतांच्या पालख्या नगरप्रदक्षिणेसाठी निघतात. नगरप्रदक्षिणा म्हणजे पंढरपूर नगराला प्रदक्षिणा. अर्थात आताच्या विस्तारित पूर्ण पंढरपूरला प्रदक्षिणा करणे अपेक्षित नसून जुन्या पंढरपूरला प्रदक्षिणा करणे म्हणजेच नगरप्रदक्षिणा करणे अपेक्षित आहे.

या प्रदक्षिणा मार्गावर काही ठिकाणी पूर्वी जुन्या गावाच्या खुणा असलेल्या वेशी होत्या, जसे की महाद्वार वेस. पण पुढे गर्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने केलेल्या पंढरपूरच्या नगरविकास आराखड्यामध्ये या वेशी काढून टाकण्यात आल्या. नगर प्रदक्षिणा मार्ग महाद्वार घाटावरून कालिका मंदिर चौक, तेथून वळून काळा मारुती चौक, तेथून पुन्हा वळून गोपाळकृष्ण मंदिरापासून नाथ चौक, तेथून पुन्हा वळून तांबड्या मारुतीपासून पुन्हा महाद्वार घाट असा आहे. या मार्गावर कोठूनही प्रदक्षिणेस सुरुवात करून पुन्हा त्या ठिकाणी आले म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होते.

*🚩 पहिली प्रदक्षिणा गजानन महाराजांची*

गजानन महाराजांची पालखी पहाटे अडीच वाजता नगरप्रदक्षिणा निघते. तर, ज्ञानेश्वर माउलींची पालखी सर्वात शेवटी म्हणजे सकाळी आठच्या सुमारास नगरप्रदक्षिणेस निघते. नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर पालखी चंद्रभागेजवळ आल्यावर रथातून पालखी काढून चंद्रभागेच्या वाळवंटात नेली जाते. पालखीतून पादुका बाहेर काढून त्यांना चंद्रभागा स्नान घालण्यात येते. तर काही पालख्यांमध्ये पादुका हातात घेऊन वाळवंटात नेतात आणि त्यांना चंद्रभागा स्नान घालतात. यावेळेस उपस्थित भाविकसुद्धा देवावर पाणी उडवतात. त्यानंतर पुन्हा उर्वरित नगर प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. नगरप्रदक्षिणा मार्गावर महाद्वार चौकामध्ये महाद्वारासमोर अभंग आणि आरती होते. चौफाळा चौकामधून देवाच्या मंदिराचा कळस दिसतो. तिथे संत नामदेवरायांचा पुढील अभंग म्हणतात.

     झळझळीत सोनसळा । 
     दिसतो कळस सोज्वळा ।।
     बरवे बरवे पंढरपूर । 
     विठोबा रायाचे नगर ।।
     हे माहेर संतांचे । 
     नामयास्वामी केशवाचे ।।

याशिवाय मार्गामध्ये वाळवंटात आल्यावर चंद्रभागेचा, पुंडलिक मंदिरासमोर पुंडलिकाच्या वर्णनाचा आणि त्या त्या संतांच्या मठापुढे त्या त्या संतांच्या वर्णनाचा अथवा इतर कोणताही संतपर अभंग म्हणतात. नगरप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पालखी आपापल्या मठामध्ये परत येते. त्यावेळेस ‘देह जावो अथवा राहो’ हा अथवा अशाच अर्थाचा इतर अभंग होऊन आरती होते. एकादशी हा उपवासाचा दिवस. या दिवशी देवाला आणि संतांनासुद्धा उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व वारकऱ्यांना देव दर्शन होणे शक्य नसते. गर्दीमुळे विठ्ठल मंदिरातूनसुद्धा रथ अथवा पालखी निघत नाही.

पेशवे काळामध्ये पेशव्यांचे एक सरदार खाजगीवाले यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची रथयात्रा सुरू केली. ही रथयात्रा खाजगीवाले वाडा येथून म्हणजे आताच्या माहेश्वरी धर्मशाळेतून निघते. या रथयात्रेसाठी लाकडी दुमजली रथ आहे. हा रथ भाविक हाताने ओढतात. या रथामध्ये विठ्ठल, राही आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती ठेवून रथ ओढायला सुरुवात करतात. नगरप्रदक्षिणा मार्गावरून फिरून रथ पुन्हा माहेश्वरी धर्मशाळेत येतो.

*🚩 एकादशीचे कीर्तन महत्त्वाचे*

आषाढी एकादशीच्या रात्री होणारे कीर्तन हे वारीतले महत्त्वाचे कीर्तन. हे कीर्तन त्या त्या पालखीपुढे त्या त्या पालखी सोहळ्याचे मालक अथवा महत्त्वाचे मानकरी करतात. प्रत्येक फडावर या दिवशी स्वतः मालक कीर्तन करतात. श्री विठ्ठल वर्णन, पंढरी वर्णन अथवा अखंड पंढरीची वारी घडावी, अशा मागणीपर अभंगावर कीर्तन होते. कीर्तनानंतर जागर होतो. जागर म्हणजे रात्रभर चालणारे भजन.

सोहळ्यामध्ये रोज जागर होत असला, तरी एकादशीच्या जागराला विशेष महत्त्व आहे. कारण एरवीसुद्धा एकादशी हा जागरणाचा दिवस मानला जातो. त्यामुळे विठ्ठल मंदिरात आणि इतर संत क्षेत्री एकादशीच्या रात्री शेजारती होत नाही. रात्रभर जागर झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पहाटे काही ठिकाणी पुन्हा कीर्तन होते. त्यानंतर देवाला नैवेद्य होऊन लोक उपवास सोडतात. याला बारस सोडणे असे म्हणतात. महत्त्वाच्या पालखी सोहळ्यातर्फे श्री विठ्ठल मंदिरामध्ये पांडुरंगास नैवेद्य पाठवला जातो.

*🚩 खिरापतीचे कीर्तन*

द्वादशीच्या रात्री जे कीर्तन होते त्याला खिरापतीचे कीर्तन असे म्हटले जाते. या कीर्तनानंतर खिरापतीचा अभंग म्हणतात आणि त्यानंतर खिरापत म्हणजे कुरमुरे अथवा चिवड्याचा प्रसाद वाटतात. त्रयोदशी आणि चतुर्दशीच्या दिवशी त्या-त्या मठामध्ये सकाळची पूजा, दुपारी नैवेद्य, रात्री एकदा अथवा सकाळ आणि रात्री अशी दोन कीर्तने आणि रात्रभर जागर असे कार्यक्रम होतात. काही वारकरी दशमीला पंढरपूरमध्ये प्रवेश केल्यावर एकादशी सुरू होताच रात्री बारा वाजताच परत फिरतात.

बहुतांश वारकरी एकादशीला चंद्रभागा स्नान आणि नगरप्रदक्षिणा करून माघारी निघतात. निष्ठावान वारकरी एकादशीचे रात्रीचे कीर्तन आणि दुसऱ्या दिवशी बारस सोडून परतात. तर काही वारकरी पौर्णिमेपर्यंत थांबतात. पायी वारी करणाऱ्या सर्वच वारकऱ्यांना प्रत्यक्ष विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. पंढरपूरमध्ये पोचले, की त्यांची वारी पूर्ण होते. वारीच्या काळात कळस दर्शनालाही महत्त्व आहे. शिवाय वारीमध्ये देव वाळवंटात असतो, अशीही एक श्रद्धा आहे. संत साहित्यात असे अनेक उल्लेख आढळतात. निष्ठावान वारकर्‍यांचा भर चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, कीर्तन, भजन या गोष्टींवर असतो.

*🚩 काला*

पौर्णिमा हा काल्याचा दिवस. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची अथवा उपक्रमाची सांगता काल्याने होते. वारीची सांगता सुद्धा आषाढी पौर्णिमेला काल्याने होते. हा काला पंढरपूरजवळील गोपाळपूर या ठिकाणी होतो. या ठिकाणी काला करण्यासाठी सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमधून निघून गोपाळपूरला जातात. अपवाद म्हणजे संत एकनाथ महाराजांची पालखी. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा काला श्री विठ्ठल मंदिरामध्ये देवासमोर लाकडी सभामंडपामध्ये होतो. पौर्णिमेच्या दिवशी पहाटे देहूकरांच्या फडावर पहाटे चार ते सहा या वेळेत पत्रिकेच्या अभंगाचे कीर्तन होते.

एके वर्षी आजारी असल्यामुळे संत तुकाराम महाराजांना पंढरीची वारी करता आली नाही. तेव्हा त्यांनी काही वारकऱ्यांजवळ देवाला निरोप म्हणून काही अभंग लिहून पाठवले. आजारी पडल्यामुळे तुकोबांच्या मनाची झालेली अवस्था, वारकऱ्यांच्या जवळ पाठवलेले निरोपाचे अभंग, वारकरी परत येईपर्यंत झालेली मनाची अवस्था, वारकऱ्यांकडून आलेला निरोप आणि त्यानंतर महाराजांची अवस्था हे सर्व वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्याला पत्रिकेचे अभंग असे म्हटले जाते. या कीर्तनामध्ये हा सर्व प्रसंग सांगून या अभंगातील प्रमाणे घेतली जातात.

*🚩 गोपाळपूर*

गोपाळपूर हे ठिकाण पंढरपूरपासून दक्षिणेस दोन किलोमीटरवर आहे. या ठिकाणी एका टेकडीवर गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत प्रेक्षणीय, दगडी बांधकामाचे असून मंदिराच्या कडेने किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे. मंदिराच्या आवारातच देवाचे सासरे भीमकराज आणि जनाबाई इत्यादींची मंदिरे आहेत. गोपाळकृष्णाची मूर्ती देहुडाचरणी वेणू वाजवणाऱ्या रूपात आहे. या मूर्तीचा चेहरा आणि पंढरपुरातील मुख्य मंदिरातील पांडुरंग मूर्तीचा चेहरा बराचसा सारखा आहे. या मंदिराच्या परिसरामधे बरीच मोकळी जागा आहे. संतांच्या पालख्या पहाटेपासून गोपाळपूरला यायला सुरुवात होते. मंदिर परिसरामध्ये ठरलेल्या ठिकाणी पालखी विसावते.

पालखीसमोर काल्याचे कीर्तन होते. काही पालख्यांमध्ये कीर्तनाऐवजी काल्याचे भजन होते. त्यानंतर काल्याचा प्रसाद म्हणजे कुरमुरे वाटतात. भाविकसुद्धा एकमेकांना काला भरवतात. यानंतर पालख्या गोपाळकृष्ण मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालून पुन्हा पंढरपूर मध्ये परत येतात. काही पालखी सोहळ्यांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरला जाताना पुन्हा एकदा चंद्रभागा स्नान होते. काला झाला म्हणजे वारीची सांगता होते आणि संतांच्या पालख्या भोजनानंतर आपापल्या गावी परत निघतात.

*🚩 देवभेट*

गेल्या वीसेक वर्षांपासून संतांच्या पादुका मुख्य विठ्ठल मंदिरात देवाच्या भेटीसाठी नेण्याचा प्रघात सुरू झाला आहे. यानुसार संतांच्या पादुका हातात घेऊन अथवा पालखीसह श्रीविठ्ठल मंदिरात नेतात. तेथे पादुका पांडुरंगाजवळ आणि रुक्मिणी मातेकडे नेतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे पादुकांचे स्वागत आणि पूजा होते. देवाच्या अंगावरील उपरणे, गळ्यातील हार इत्यादी पादुकांना घातले जातात. तर त्या त्या संत संस्थानतर्फे देवाला उपरणे, हार इत्यादी अर्पण केले जातात. देव भेटीनंतर पालख्या आपल्या मठामध्ये परततात.

*🚩 निरोप*

देवदर्शनानंतर पालखी आपापल्या ठिकाणी परत आल्यावर नैवेद्य, भोजन होऊन दुपारनंतर पालखीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. यावेळेस संत निळोबारायांचा पुढील अभंग अथवा अशाच अर्थाचे इतर अभंग म्हटले जातात.

     पंढरीहुनि गावी जातां । 
     वाटे खंती पंढरीनाथा ।।
     आता बोळवीत यावे । 
     आमुच्या गावा आम्हासवे ।।
     तुम्हां लागी प्राण फुटे। 
     वियोग दु:खे पूर लोटे ।।
     निळा म्हणे पंढरीनाथा। 
     चला गावा आमुच्या आता।।

पालख्यांना निरोप देण्यासाठी पंढरपूरकर वेशीपर्यंत येतात.

*🚩 पालखी नगरप्रदक्षिणा*

पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगरप्रदक्षिणा निघते. आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये स्थानिक भाविकांना दर्शन मिळणे अवघड होते. ते आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेमध्ये आणि आपापल्या व्यवसायामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे स्थानिकांना दर्शन देण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री देवाची पालखी नगरप्रदक्षिणेस निघते. यावेळी पालखी सोबत वासुदेव, दिवटे आणि आंबेकर आजरेकर फडाच्या चवरे महाराजांची दिंडी असते. पौर्णिमेपासून पुढे पंचमीपर्यंत रोज रात्री देवासमोर गरुड खांबापाशी चवरे महाराजांचे भजन होते.

*🚩 महाद्वार काला*

संतांचा काला जरी पौर्णिमेला झाला, तरी देवाचा काला मात्र संतांना निरोप दिल्यावर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला होतो. याला महाद्वार काला असे म्हणतात. या महाद्वार काल्यामध्ये मिरवल्या जाणाऱ्या पादुका देवाचे एक सेवेकरी असलेले हरिदास यांच्याकडे आहेत. या पादुका हरिदास वेशीपाशी हरिदासांच्या ज्या वाड्यामध्ये असतात, त्याला काल्याचा वाडा असे म्हणतात. महाद्वार काल्याच्या दिवशी काल्याच्या वाड्यामधे या पादुका मानकरी हरिदास यांच्या डोक्यावर फेट्यामध्ये बांधतात. पादुका डोक्यावर बांधताच त्यांची शुद्ध हरपते. पूर्वी नामदेव महाराजांनी देवाला खांद्यावर घेऊन महाद्वार काला केला असे मानले जाते. त्यामुळे आता सुद्धा नामदेवांचे वंशज नामदास महाराज डोक्यावर पादुका बांधलेल्या हरिदासांना आपल्या खांद्यावर घेतात आणि हा काल्याचा सोहळा करतात. ही काल्याची मिरवणूक नामदास महाराजांच्या दिंडीसह काल्याच्या वाड्यातून विठ्ठल मंदिरात येते. तेथे देवासमोरील सभामंडपामध्ये या पादुकांवर हंडी फोडली जाते.

नामदास महाराज हरिदासांना खांद्यावर घेऊन लाकडी मंडपामध्ये तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर दिंडीसह मिरवणूक महाद्वारातून बाहेर येते. तेथून महाद्वार घाटाने खाली चंद्रभागेवर आणि तेथून खाजगीवाले वाडा (आताची माहेश्वरी धर्मशाळा) या मार्गाने पुन्हा काल्याच्या वाड्यात परत येते. मार्गामध्ये ठिकठिकाणी भाविक पादुकांवर दही, लाह्या उधळतात. पूर्ण मार्गामध्ये नमदास मंडळी आळीपाळीने हरिदासांना आपल्या खांद्यावर उचलून घेतात. दिंडी काल्याच्या वाड्यात परत आल्यावर आरती होते आणि या उत्सवाची सांगता होते. महाद्वार काला झाला म्हणजे आषाढी वारीची सांगता झाली.

*🚩 प्रक्षाळ पूजा*

यानंतर वारीनिमित्त बंद झालेले देवाचे उपचार पुढे वद्य पंचमीच्या आसपास सुरू केले जातात. या पूजेला प्रक्षाळ पूजा असे म्हणतात. प्रक्षाळ म्हणजे धुणे अथवा स्वच्छ करणे. वारीच्या काळात गर्दीमुळे अस्वच्छ झालेले मंदिर धुणे, मंदिराची स्वच्छता करणे आणि वारीनिमित्त देवाला आलेला शिणवटा घालवणे असे या पूजेचे दोन भाग आहेत. पंचमीच्या आदल्या रात्री देवाच्या मागे लावलेला लोड काढून घेतात आणि देवाच्या पूर्ण अंगाला तेल लावून मर्दन करतात. पंचमीला पहाटे देवाला औषधी वनस्पतीपासून बनवलेले उटणे लावून स्नान घालतात. या पूजेनंतर भाविक देवाच्या पायांना लिंबू साखर लावतात. मूर्तीची झीज होऊ नये म्हणून आता देवाच्या पायावर चांदीचे कवच ठेवून त्यावर लिंबू साखर लावले जाते. हा उपक्रम पहाटपूजेपासून साधारण सकाळी अकरा वाजेपर्यंत चालू असतो.

अकरा वाजता देवाला पहिले स्नान घातले जाते. याला पहिले पाणी असे म्हणतात. यावेळेस देवावर पांढरे तलम उपरणे पांघरून त्यावरून गरम पाण्याने स्नान घातले जाते. पहिले पाणी झाले म्हणजे देवाला साधे धोतर नेसवून अंगावर उपरणे पांघरतात. यानंतर पुन्हा दर्शन सुरू होते. देवाचा मुख्य नैवेद्य दुसऱ्या स्नानानंतर होतो. काही भाविक पहिले पाणी झाल्यावर देवाला नैवेद्य आणत. पूर्वी स्थानिक ब्राह्मणांचे सोवळ्यातले पुरणाचे नैवेद्य देवापर्यंत थेट नेता येत असत. ब्राह्मणेतर मंडळी संध्याकाळी दूध आणि पेढे असा नेवेद्य रांगेतून आणत. आता स्थानिकांचे नैवेद्य थेट देवापाशी सोडणे बंद झाल्यामुळे हे नैवेद्य येत नाहीत. संस्थानतर्फेच नैवेद्य होतो.

यानंतर दुपारी दोनच्या सुमारास दुसरे पाणी होते. यावेळेस पांडुरंगाला रुद्राभिषेक आणि रुक्मिणी मातेला पवमान अभिषेक होतो. एकवीस ब्राह्मण सभामंडपामध्ये रुद्र म्हणतात. त्यावेळेस देवाला गायीच्या शिंगातून दुधाचा अभिषेक केला जातो. या अभिषेकानंतर पांडुरंग आणि रुक्मिणी मातेस जरीचा पोशाख आणि दागिने घालतात. यानंतर देवाला महानैवेद्य आणि आरती होते. देवाचा पलंग पुन्हा शेजघरामध्ये ठेवतात.

या पूजेपासून देवाच्या उपचारास पुन्हा सुरुवात होते. सायंकाळी धुपारती आणि रात्री शेजारती होते. प्रक्षाळ पूजेनिमित्त मंदिरात फुलांची आरास करण्यात येते. रात्री शेजारतीच्या वेळेस देवाला औषधी काढ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तुळस, बडीशेप, लवंग, दालचिनी इत्यादी औषधी पदार्थ पाण्यामध्ये उकळून हा काढा बनवला जातो. दुसर्‍या दिवशी या काढ्याचा प्रसाद भाविकांना वाटतात. अशा रितीने जवळ जवळ तीन आठवडे पंढरपुरात आषाढीची लगबग चालू असते.

           🚩 राम कृष्ण हरी 🚩

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Thursday, 28 November 2024

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन





संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली ती आजची तिथी (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). 

संत नामदेव महाराज  या समाधी सोहळ्याचे साक्षीदार. त्यांनी उपरोक्त अभंगात या समाधी सोहळ्याचे ज्ञानदेवांच्या मनात  समाधी घेण्याचा विचार आल्यापासून ते अगदी समाधी घेईपर्यंत भावपूर्ण वर्णन केले आहे.


मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रुमा ।
निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥
विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा ।
भरित दाटलें अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥
मति चालविली रसाळ । संत श्रोतिया केला सुकाळ ।
दिधलें पुरुषार्थाचें बळ । तें तूं केवळ संजीवन ॥३॥
अमृतानुभव आनंदलहरी । ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी ।
संस्कृत प्राकृत वैखरी । वदविली माझी ॥४॥
आतां मोक्षाचिया वाटा । पाहिला षड्रचक्र चोहटा ।
आज्ञा द्यावी वैकुंठा । ज्ञानदेव म्हणे ॥५॥


आतां पदपदांतराची सेवा । संपादिली स्वामी केशवा ।
धन्य आमुचिया दैवा । जोडिलां तुम्ही ॥१॥
आत्मविद्या बोलावया कारणें । सुख पावले श्रोते सज्जन ।
आतां जें आरंभिलें मनें । तें आपण सिद्धि न्यावें ॥२॥
भूवैकुंठ एक पंढरी । ल्याहूनि आगळी आळंकापुरी ।
सिद्धेश्वरा शेजारीं । इंद्रायणी ॥३॥
त्रिपुटी पश्चिम मोक्षाची वाट । प्रत्यक्ष कैलास सिद्धपेठ ।
गोपाळपुरीं केलीं गोष्ट । चौघीजणी ॥४॥
नलगे कलियुगींचा वारा । जें जें बोलिलों जगदोद्वारा ।
मागितला थारा । पदीं तुझ्या ॥५॥
आतां वैराग्याचें बळ । सिद्धि प्राप्तीचें फळ ।
ज्ञानदेवें घेतली आळ । जाणा स्थळ आवडीचें ॥६॥


अष्टोत्तरशें तीर्थें सारीं । ओघें आलीं आळंकापुरीं ।
वाद्यें वाजताती गजरीं । कीर्तन लहरी अमृताची ॥१॥
जैसा कस्तुरीचा सुगंधु । अनुभवी न म्हणतीच बद्धु ।
तैसा औटपिठाचा नादु । आठवी गोविंदु आवडीनें ॥२॥
बौद्ध अवतार चक्रपाणि । सत्रावी कळा माय रुक्मिणी ।
जाणत असे अंतःकरणीं । भक्त इच्छा ॥३॥
भावें विठठलें केली गोष्टी । ज्ञानदेवें अपूर्व इच्छिलें पोटीं ।
जावें उठाउठीं । समुदायेंसी ॥४॥


विठठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले ॥१॥
परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥२॥
गंधर्व आणि देव आले सुरगण । चाललीं विमानें आळंकापुरीं ॥३॥
लहान थोर सारे आले ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
नामा म्हणे देवा दिसती तांतडी । जाती मज घडी युगा ऐसी ॥५॥


पंढरीचा पोहा आला आळंकापुरीं । पंच कोसावरी साधुजन ॥१॥
पांडुरंगा संगें वैष्णवांचे भार । दिंड्या ते बाहेर निघाल्यस ॥२॥
पताकांचे भार निघाले बाहेर । भेटती ऋषीश्वर पांडुरंगा ॥३॥
अवघिया भेटी जाल्या त्या बाहेरी । मग आळंकापुरी येते जाले ॥४॥
सोपानानें मग केला नमस्कार । उतरिले पार पांडुरंगा ॥५॥


हरिहरविधाता आले आळंकापुरीं । इंद्रायणी तीरीं एक थाटी ॥१॥
योगियांचा सखा कोठें ज्ञानेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥
शून्याचिया पोटीं निरंजन गुंफा । ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला ॥३॥
उन्मनीं निद्रा लागलीसे फार । स्वरुपीं ज्ञानेश्वर जागा जाला ॥४॥
नामा म्हणे देवा भली देली बुद्धी । लागली समाधि ज्ञानदेवा ॥५॥


लागली उन्मनी वैराग्याचे धुणी । जागा निरंजनीं निरंतर ॥१॥
भूचरी खेचरी चाचरीच्या छंदें । अगोचरीच्या नादें सहस्त्र दळीं ॥२॥
औटहातध्वनी चित्तवृत्ती जेथें । उजळली ज्योत चैतन्याची ॥३॥
नामा म्हणे देवा करा सावधान । नाहीं देहभान ज्ञानदेवा ॥४॥


धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग । मिळाले ते सांग आळंकापुरीं ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत । जाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥


अल्याड पल्याड पताकांचे भार । मध्यें मनोहर इंद्राहणी ॥१॥
पिवळ्या पारव्या आणिक हिरव्या । नीळवर्ण सार्‍या लखलखित ॥२॥
जरी जर्तातरी जाल्या रानभरी । विजा त्यावरी खेळताती ॥३॥
सर्पाकार दंड तारांगणावाणी । पताका तिकोनी दाटताती ॥४॥
नामा म्हणे तेथें पताकांचे भार । केव्हडें भाग्य थोर ज्ञानोबाचें ॥५॥

१०
कैलासासा वास अधिक सिद्धबेट । विष्णूचें वैकुंठ पुरातन ॥१॥
भूमीवरी पंढरी तैसी आळंकापुरी । पंच कोशावरी पुण्यभूमी ॥२॥
सुखाची हे मूर्ति नीलकंठलिंग । चक्रतीर्थ सांग मोक्ष भेटे ॥३॥
परमार्थ सुअर्थ देखतांची संत । सांगितली मात अनुभवाची ॥४॥
नामा म्हणे देवा हें स्थळ चांगलें । चित्त मन रंगलें ज्ञानोबाचें ॥५॥

११
पुसताती संत सांगा देवा मातें । पूर्वीं येथें होतें कोण क्षेत्र ॥१॥
देव म्हणे स्थळ सिद्ध हें अनादि । येथेंच समाधि ज्ञानदेवा ॥२॥
अष्टात्तरशें वेळां साधिली समाधी । ऐसें हें अनादि ठाव असे ॥३॥
नामा म्हणे देवा सांगितलें उत्तम । ज्ञानांजन सुगम देखों डोळां ॥४॥

१२
स्वानंदें देवभक्तां भेटी । वोरसोनि कंठीं आलिंगावें ॥१॥
देव म्हणे भले आठवलें तुज । ते हे संधी मज कळली असे ॥२॥
पदपदांतरें केला मार्ग सोपा । त्यांत माझी कृपा वोळली असे ॥३॥
देव म्हणे तुझी पुरवीन आळी । सुखी सही मंडळी वैष्णवांची ॥४॥
नामा म्हणे देवा आज्ञा देगा यासी । नेणूं काय आम्हांसी आरंभिलें ॥५॥

१३
उदित जालें मन आतां काय अनुमान । करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी ॥१॥
देवाचा हो कर धरोनी ज्ञानेश्वर । निघाला बाहेर योगिराज ॥२॥
मागें पुढें संत चालिले मिरवित । कौतुक पहात इहलोकीं ॥३॥
नारा विठा गोंदा माहादा विरक्त । परसा भागवत उभें तेथें ॥४॥
समुदाय वैष्णव मिळालासे भारी । महोत्सव गजरीं आरंभिला ॥५॥
नामा म्हणे गुज दाविलें श्रीहरी । धन्य आळंकापुरीं पुण्यभूमी ॥६॥

१४
सारासार विचार करिती अवघे जन । हे ज्ञान अंजन दाविलें डोळां ॥१॥
पाहिलें गे माय अंतरींचें सुख । वैकुंठनायक उभा असे ॥२॥
ज्ञानदेवायोगें सकळांशी दर्शन । परब्रह्म निधान डुल्लतसे ॥३॥
अवघे जन कोडें घालिती सांकडें । सांगावे निवाडे नामयाचे ॥५॥
देव म्हणे नामा विचारिलें आम्हां । ते कां संधी तुम्हां कळली नसे ॥६॥

१५
देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी । येथेंचि समाधि ज्ञानदेवा ॥१॥
चौयुगां आदिस्थळ पुरातन । गेले तें नेमून मुनिजन ॥२॥
चालिले सकळ जाले ते विकळ । अनादि हें स्थळ ज्ञानदेवा ॥३॥
नामा म्हणे आम्हां सांगितलें हरी । दीर्घध्वनि करी वोसंडोनी ॥४॥

१६
खेद दुःख करी मनाचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां दाटताती ॥१॥
नारा विठा गोंदा पाठविला महादा । साहित्या गोविंदा सांगितलें ॥२॥
काय काय आणूं सांगा हें प्रमाण । नेमियेला नेम पांडुरंगें ॥३॥
तुळसी आणि बेल दर्भ आणि फुलें । उदक हें चांगलें भागिरथीचें ॥४॥
नामा म्हणे देवा साहित्य करितां । आठवितें चित्ता खेद दुःख ॥५॥

१७
साडेतीन पाउलें टाकिलीं निश्चळ । नेमियेलें स्थळ उत्तरायणी ॥१॥
देव म्हणे ज्ञाना होई सावधान । माग वरदान मज कांहीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासीं । व्रत एकादशी स्वामीकडे ॥३॥
कृष्णपक्षीं व्रत हरिदिन परिपूर्ण । मागितला मान ज्ञानदेवें ॥४॥
नामा म्हणे देवा आवडीनें देतां । जोडलें हें संतां पियुष जें ॥५॥

१८
वोसंडोनी हरि आनंदला तेथें । पुण्य हें अगणित सांगितलें ॥१॥
सर्वांगालागीं न्याहाळिलें परिपूर्ण । केलें निंबलोण आवडीनें ॥२॥
आळंकापुरीं कोणी करील कीर्तन । तयालागीं येणें वैकुंठीचें ॥३॥
अस्ति नास्ति उदकीं करिल ब्रह्मरुप । कोटी कुळांसहित उद्धरीन ॥४॥
जेथें ज्ञानदेव तेथें मी निशिदिनीं । येथें सुखें ज्ञानी डुल्लताती ॥५॥
नामा म्हणे आतां वोसंडले हरी । जडमूढावरी कृपा केली ॥६॥

१९
वन वृक्ष वल्ली ईश्वरासमान । ऋषि मुनिजन राहाती जेथें ॥१॥
होऊनियां पक्षी कपोद कोकिळा । वेष्टियेलें स्थळा ब्रह्मबोधें ॥२॥
मृत्तिका पाषाण पंचक्रोशीचे खडे । जाले पहा धडफुडे ब्रह्मरुप ॥३॥
पंचमहापातकी गेले आळंकापुरीं । न चाले त्याजवरी काळ यम ॥४॥
सांगताती देव ऐकती रुक्मिणी । नामा म्हणे चक्रपाणि वर दिला ॥५॥

२०
चक्रतीर्थीं पाहा उभा तो गोपाळ । पुढें विणे टाळ वाजताती ॥१॥
स्वर्गींहुनि पुष्पें वर्षती सुरवर । उभे ऋषीश्वर समुदायेंसी ॥२॥
आणिक वाद्यें तेथें वाजती अपार । जाती ज्ञानेश्वर समाधीसी ॥३॥
नामा म्हणे देवा चुकों नेदी संधी । पोहोचविताम सिद्धि बाळकासी ॥४॥

२१
कोण जाणे माझे जीवींचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां लोटताती ॥१॥
अवघियांचे मन दूषित तटस्थ । लहान थोर संत वोसंडती ॥२॥
तारियेले जड बा माझ्या कीर्तनीं । आठवती मनीं गुण तुझे ॥३॥
नामा म्हणे येथें बोलवेना मज । जातसे निजगुज आवडीचें ॥४॥

२२
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ॥१॥
कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥
अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्वारा बोलविलें ॥३॥
नामा म्हणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥

२३
अनुभव हा सागर गुह्य आणि ब्रह्म । उघडे अध्यात्म बोलियेलें ॥१॥
प्रगट हें गुह्य उकलिलें गाबाळ । केलें करतळमळ ज्ञानयानें ॥२॥
कोणाची कल्पना नुरेचि बा येथें । उघडा गुह्यार्थ सिद्ध केला ॥३॥
करणें न करणें सांगितला पंथ । तिहीं लोकीं कीर्त वाढविली ॥४॥
ज्ञान हें अंजन साधी संजीवनी । नामा म्हणे यांनीं ख्याती केली ॥५॥

२४
अहंकार पोटींचे उतरिले जहर । केला उपकार जगामाजीं ॥१॥
कामक्रोध उतें उतरिले दंभ । करपले कोंभ संशयाचे ॥२॥
विकल्पाचे पायीं घातियेली बेडी । केली ताडातोडी इंद्रियांची ॥३॥
स्वर्गादिक सुखें कमाविली रोकडीं । वैकुंठासी शिडी लावियेली ॥४॥
नामा म्हणे धन्य उभारिल्या ध्वजा । घातयेल्या शेजा सुखाधामीं ॥५॥

२५
कासाविस प्राण मन तळमळी । जैसी कां मासोळी जीवनाविण ॥१॥
दाही दिशा वोस वाटती उदास । करिताती सोस मनामाजीं ॥२॥
घातियेली घोण प्राण आला कंठीं । ज्ञानेवासाठीं तळमळीं ॥३॥
नामा म्हणे देवा वाटतसे खंती । चालली विभूति योगियाची ॥४॥

२६
नानापरी मन आवरितों भारी । कांही केल्या हरि विसर न पडे ॥१॥
दृश्यादृश्याच्या दूर केल्या गोष्टी । उघडिली दृष्टि ज्ञानदेवें ॥२॥
गीतेवरी टीका ग्रंथ केला सार । केवळ ईश्वर ज्ञानाचा हा ॥३॥
नामा म्हणे आतां देहासी विटला । स्वरुपीं पालटला ज्ञानदेव ॥४॥

२७
गंध आणि अक्षता पंचामृत उदक । धूप आणि दीप आणियेले ॥१॥
संत सज्जनांचा मिळाला समुदावो । मध्यें ज्ञानदेवो चालतसे ॥२॥
क्षेत्र प्रदक्षणा करावया उद्देशी । मुहूर्त देवापाशीं विचारिला ॥३॥
दशमीचे दिवशीं रिघावें बाहेर । हरिदिनीं जागर निशिदिनीं ॥४॥
द्वादशी पारणें सोडावे निश्चळ । नेमियेलें स्थळ सिद्धेश्वरी ॥५॥
नामा म्हणे हरि नेमिला सिद्धांत । काय माझा अंत पाहातसां ॥६॥

२८
ज्ञानेश्वरापाशीं आनंदी आनंद । नाचतो गोविंद कीर्तनासी ॥१॥
दशमीच्या दिवशीं महोत्सव आळंकापुरीं । करितसे हरि आवडीनें ॥२॥
हरिदिनीं जागरण होत सारी रात्र । बसोनि पंढरीनाथ स्वयें अंगे ॥३॥
द्वादशी पुण्यतिथी केली ज्ञानेश्वरा । पांच दिवस सारा महोत्सव ॥४॥
अमावस्ये दिवशीं केला गोपाळकाला । मग वैष्णवाला लाभ मोठा ॥५॥
नामा म्हणे देवा आनंद आळंकापुरी । कांही दिवस हरि राहा येथें ॥६॥

२९
विनविति संत आणिक सज्जन । नव्हे समाधान कांहीं केल्या ॥१॥
नानाचि प्रकार करितसे घोर । कांहीं केल्या स्थिर चित्त नव्हे ॥२॥
काय पाहावें याला विरक्त पुरुषाला । स्वरुपीं मिळाला ज्ञानदेव ॥३॥
नामा म्हणे यांचें उचंबळलें प्रेम । म्हणोनि परब्रह्म मागें पुढें ॥४॥

३०
निवृत्ति सोपान आणिक मुक्ताई । जाताती पाहीं कोणीकडे ॥१॥
देवासी गुह्यार्थ केला पां एकांत । ज्ञानदेवें हित आरंभिलें ॥२॥
नामा म्हणे अवघे बसा एकीकडे । ऐको द्या निवाडे गुज याचें ॥३॥

३१
निवृत्ति सोपान मुक्ताई धाकुटी । धरियेली कंठी पांडुरंगें ॥१॥
कळवळिली मनीं करिती दीर्घ ध्वनी । आठविती मनीं ज्ञानदेव ॥२॥
विकळ जालें चित्त संत हे दुश्चित । नामा विकळ तेथ होत असे ॥३॥

३२
तिघांजणांलागीं केलें समाधान । सांगितली खूण अंतरींची ॥१॥
कलियुगी जग आत्याती करिती । साहवेना कीं यासी कांहीं केल्या ॥२॥
पापी उद्धरिले पतित तारिले । जड पावविले मोक्षपंथीं ॥३॥
नामा म्हणे याचें करितां समाधान । कळलें अंतःकरण मन यांचें ॥४॥

३३
निसंगाची संग न लगे आणिकाचा । परमार्थ हा साचा गहन केला ॥१॥
जड या जीवाचें हरविलें अज्ञान । नेले उतरुन भवसिंधु ॥२॥
ज्ञानियासि केली सिंधुसंजीवनी । जालें जनीं वनीं एक तारुं ॥३॥
नामा म्हणे सत्य बा माझ्याचें बोलणें । करी निंबलोण पदीं त्यांचें ॥४॥

३४
फार आठवतें निवृत्तीचे चित्तीं । सोपान स्फुंदती मुक्ताबाई ॥१॥
आम्हां माता पिता नित्य ज्ञानेश्वर । नाहीं आतां थार विश्रांतीसी ॥२॥
छळिलें ब्राह्मणें प्रतिष्ठानीं जातां । रेड्यामुखीं वेदांता बोलविलें ॥३॥
आला चांगदेव व्याघ्र वहान घेऊन । नेला अभिमान ज्ञानदेवें ॥४॥
नाना प्रकारचे आठविती शब्द । नामा म्हणे बोध भाविकाला ॥५॥

३५
देव म्हणे असे आठवाल फार । लागे उशीर समाधीसी ॥१॥
रुक्माबाई म्हणे याजलागी जाण । ब्रह्मीं ब्रह्म खूण मेळविली ॥२॥
अवतार हे चौघे जाले कैशापरी । सांगा आम्हां हरी उकलोनी ॥३॥
शिव तो निवृत्ती सोपान ब्रह्मास्थिती । ज्ञानदेव मूर्ति विष्णूची हो ॥४॥
ब्रह्मणी हे कळा माय मुक्ताबाई । विचारुनि पाही स्वयं मुक्ता ॥५॥
नामा म्हणे याला नाही पां उपाधी । पूर्ण हे समाधि ज्ञानदेवा ॥६॥

३६
अंतर बाहेर कळलें स्वरुपं । स्वयें नंदादीप उजळिला ॥१॥
येणें जाणें कोठें योगी पहा अवीट । सान वैकुंठ करुनि ठेवी ॥२॥
ज्ञानियाला मरण म्हणती अज्ञान । वायां तुम्ही शीण करुं नका ॥३॥
घटाचिया योर्गे प्रतिबिंब भासे । काय म्हणे नासे निरालंब ॥४॥
दर्पणाचे योर्गे दुसरें देखणें । काय मुखें दोन त्यांसी जालीम ॥५॥
दृष्याचियामुळें जीव दिसे येथें । काय पा परमार्थ विटंबले ॥६॥
तंतूचियामुळें पटाला विस्तार । काय निराकार वायां गेलें ॥७॥
रुक्मादेवीवरें केलें समाधान । नामा म्हणे मौन धरुनि ठेले ॥८॥

३७
छत्र चामरें उभा सन्मुख भोंवती । रुक्माईचा पति मध्यभागीं ॥१॥
निंबें आणि नारळ गोण्याची पोफळें । उदंड तिहीं केळें आणियलीं ॥२॥
आणिक बहुता परी घेतली सामुग्री । पीत पीतांबरी मृगछाला ॥३॥
भगवीं आभरणें घेतलें भस्म । अंगें परब्रह्य साह्य त्यासी ॥४॥
नामा म्हणे स्वामी तिष्ठताती अंगें । मेळविली सांगें साहित्यासी ॥५॥

३८
उगमापासुनी गंगा सागरासी गेली । काय दोन जालीं उदकें त्यांची ॥१॥
तैसा ज्ञानदेव जाला अनुभव । काय आम्हां देव दुरावला ॥२॥
सरिता सरोवरचे एके ठायीं झरे । लहान थोर सारे स्वरुपीं माझ्या ॥३॥
रुक्मादेवीवरें उगविलें गाबाळ । संत कृपाळ डुल्लाताती ॥४॥
नामा म्हणे येणें मोहिलें चित्त । राहिले तटस्थ चौघेंजण ॥५॥

४०
आणिक वाद्यें तेथें वाजताती अपार । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥
चिद्रत्नमंडप दिसला कल्लोळ । जैसे दीपमाळ दीप ठेले ॥२॥
नक्षत्र गोंधळ उसळती भारी । चक्रें त्याजवरी उल्लाळती ॥३॥
मोतियें तोरणें लाविलीं अपार । झळकती तारे विभु ऐसे ॥४॥
नामा म्हणे देवा नवल केलें गहन । पुजाळिलें गगन ज्ञानदेवें ॥५॥

४१
निवृत्ति ज्ञानदेव उभे दोहींकडे । सोपान तो पुढें मुक्ताबाई ॥१॥
देहुडे सुरगण थक्त पडिलें लोकां । सुरु केला डंका वैकुंठींचा ॥२॥
चक्रतीर्थीं उभे देव साधुजन । करविलें स्नान ज्ञानदेवा ॥३॥
देवाचें हें तीर्थ घेतलें ज्ञानेश्वरें । केला नमस्कार पादपद्मीं ॥४॥
विठठल रुक्मिणी ऋषि सुरवर । पूजा ज्ञानेश्वर करितसे ॥५॥
नामयाच्या हातीं गंध अक्षता । पूजा महंता मान्य जाली ॥६॥

४२
टाळ विणे मृदंग वाजती अपार । नारद तुंबर गीत गाती ॥१॥
शुक वामदेव अंबऋषि सादर । मध्यें ज्ञानेश्वर ब्रह्मरुप ॥२॥
पिपिलिकेसी मार्ग जावया न मिळे । जाती भार मेळे वैष्णवांचे ॥३॥
नामा म्हणे देवा दाविली नवाळी । पुरविली आळी ज्ञानोबाची ॥४॥

४३
दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा । आणिक कीर्तना संत उभे ॥१॥
रात्रंदिवस त्यांही केला हरिजागर । हरिदिनीं थोर कृष्णपक्षीं ॥२॥
मग केलें स्नान भागिरथीचे तीरीं । संत महंता भारी पूजिजेलें ॥३॥
अवलोकिलें डोळां अंतर बाहेरी । मग सिद्धेश्वरी येत झाले ॥४॥
सिद्धेश्वरालगीं पूजिले निवळ । मागितलें स्थळ समाधीसी ॥५॥
गंगा आणि गिरजा नीलकंठ ईश्वर । केला नमस्कार नामा म्हणे ॥६॥

४४
अष्टोत्तरशें वेळ समाधि निश्चळ । पूर्वीं तुझें स्थळ वहनाखालीं ॥१॥
उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडिली शिळा विवराची ॥२॥
आसन आणि धुनि मृगछालावर । पाहाती ऋषीश्वर वोसंडोनि ॥३॥
बा माझी समाधि पाहिली जुनाट । केवळ वैकुंठ गुह्यगोप्य ॥४॥
नामा म्हणे देवा पुरातन स्थान । ऐसें नारायणें दावियेलें ॥५॥

४५
नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची ॥१॥
हरिदिनीं जागर केला निशीदिनीं । उदईक पारणीं द्वादशींची ॥२॥
गंगा गिरजा राही रुक्माबाई भामा । उठिल्या रांधण्या पारण्याच्या ॥३॥
नाना प्रकारचे पाक ते अपार । मुनि ऋषीश्वर बोलाविले ॥४॥
वैष्णव देव आणि आले सुरगण । करोनियां स्नान इंद्रायणी ॥५॥
पिंपळाचे पारीं बैसविल्या पंक्ती । पात्रें ते श्रीपती वाढूं लागे ॥६॥
नामा म्हणे देवा करणें साहित्यासी । येतो कासाविसी प्राण माझा ॥७॥

४६
सोवळ्यानें हरि वाढतो सकळां । मनींचा कळवळा कोण जाणे ॥१॥
रुक्माईचे कानीं सांगितली गोष्ट । विस्तारावें ताट ज्ञानदेवा ॥२॥
राही रुक्माबाई वाढिती आवडीनें । सोडितो पारणें ज्ञानदेव ॥३॥
नामा म्हणे देवा परब्रह्म अन्न । जातों बोलावण ज्ञानदेवा ॥४॥

४७
निवृत्ति सोपान मुक्ताई चवथी । अनेक विभूति ज्ञानेश्वरा ॥१॥
नामा पुंडलिक गरुड हनुमंत । परस भागवता बोलविलें ॥२॥
विठ्ठल रुक्माई सत्यभामा राही । इतुके तयेठायीं जमा जाल्या ॥३॥
विसोबा खेचर चांगा वटेश्वर । सांवता कुंभार एके ठायीं ॥४॥
गंगा गिरजा दोघी नीळकंठ ईश्वर । मध्यें ज्ञानेश्वर घेतियेला ॥५॥

४८
निवृत्ति मुक्ताईचें करिती समाधान । घेतला सोपान मध्यभागीं ॥१॥
ऐक्य अहिक्याची बैसली एकवटे । विस्तारिलीं ताटें रुक्माईने ॥२॥
एक एकालागीं देताती प्रसाद । आतां ज्ञाजराज पाहूं डोळां ॥३।
नामा म्हणे स्वस्थ जेवितां पंगती । घृतपात्र हातीं विस्तारितु ॥४॥

४९
ज्ञानदेवालागीं चंदनाची उटी । पंचारती होती आनंदाच्या ॥१॥
गंध आणि अक्षता पुष्पपरिमळा । घेती वोसंगळा नामदेव ॥२॥
ज्ञानदेव स्वस्थ देवा वोसंगळा । माळा घाली गळां नामदेव ॥३॥

५०
जेऊनियां स्वस्थ उठिले परिपूर्ण । केलें आचमन वैष्णवांनीं ॥१॥
वैकुंठींचा प्रसाद पावेल निवाडे । गोंदा महादा विडे वांटिताती ॥२॥
दोन प्रहरपावेतों आटोपलें भोजन । तृतीय प्रहरीं कीर्तन आरंभिलें ॥३॥
कीर्तनाच्या नादें मोहिला गोविंद । करावा उद्योग समाधीचा ॥४॥
नामा म्हणे देवा करितां उशीर । विकळ ज्ञानेश्वर जात असे ॥५॥

६१
निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान । कांही केल्या मन राहात नाहीं ॥१॥
बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट । ओघ बारा वाट मुरडताती ॥२॥
बांधल्या पेंढीच्या सुटलासे आळा । तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥
हरिणीविण खोपी पडियेली वोस । दशदिशा पाडसें भ्रमताती ॥४॥
मायबापें आम्हां त्यागियेलें जेव्हां । ऐसें संकट तेव्हां जालें नाहीं ॥५॥
नामा म्हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तीचें ॥६॥

६२
देव रुक्माबाई आणिक साधुजन । करिती समाधान निवृतीचें ॥१॥
ज्ञानियांनी ऐसी करावी जंव खंती । अज्ञानाचा किती पाड आला ॥२॥
धन्य तुमचा महिमा बोलती पुराणीं । दृश्य कांहीं मनीं आठवूं नये ॥३॥
आकाशाचे ठायीं अभ्रें येती जाती । कोण त्याची खंती करुं पाहे ॥४॥
अवतारादिक गेले आले अपार । जैसा का विस्तार मृगजळाचा ॥५॥
नामा म्हणे देवें धरियेलें हातीं । उठविली विभूति निवृत्तिराज ॥६॥

६३
गरुड हनुमंत मुक्ताई सोपान । देव साधुजन आनंदले ॥१॥
मागें पुढें संत पताकांचे भार । मध्यें ज्ञानेश्वर मिरवतो ॥२॥
टाळ आणि विणे मृदंग गायन । करिती कीर्तन सुस्वरेंसी ॥३॥
जयजयकार ध्वनि करिती सुरगण । वर्षती सुमन स्वर्गींहुनी ॥४॥
हरिपाठ गजन करिती अपार । नामा म्हणे भार उठविले ॥५॥

६४
सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळी । बैसलेती पाळी समाधीच्या ॥१॥
पताकांची छाया दुणावली फार । सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हां जाले ॥२॥
अजानवृक्षदंड आरोग्य अपार । समाधीसमोर स्थापियेला ॥३॥
कोरड्या काष्टीं फुटियेला पाला । तेव्हां अवघियाला नमस्कारी ॥४॥
नामा म्हणे देवा घार गेली उडोन । बाळें दाणादाण पडियेली ॥५॥

६५
मुंग्यांचिये विवरीं लागलीसे आग । पुढें आणि मागें जालें नाहीं ॥१॥
राही रुक्माई आणि सत्यभामा । ओवाळिती प्रेमा ज्ञानेश्वरा ॥२॥
उभारिल्या गुढिया आणि तोरणें । छाया सुदर्शन धरियेलें ॥३॥
नारा विठा गोंदा भेटला महादा । उभे जागोजागा राहिलेती ॥४॥
विसोबा खेचर चांगा वटेश्वर । केला नमस्कार अवघियांनीं ॥५॥
गोरा कुंभार सांवता माळी । नामा तळमळी वत्सा ऐसें ॥६॥

६६
प्रसा भागवतें केला नमस्कार । सारे लहान थोर जमा जाले ॥१॥
सकलांचिया पायीं नमियलें नमना । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥
प्रथम पायरी बाहेरील जेथ । उभा पंढरीनाथ भेटावया ॥३॥
देव म्हणे बापा अमृत नेदी पाट । फार केले कष्ट जगासाठीं ॥४॥
नामा म्हणे यांनीं अनुभवाच्या नौका । पार केलें लोकां जडमूढां ॥५॥

६७
देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥
नदीचिया माशा घातलें माजवण । तैसें जनवन कलवलें ॥२॥
दाही दिशा धुंद उदयास्ताविण । तैसेंचि गगन कालवलें ॥३॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । पादपद्मीं ठेवा निरंतर ॥५॥
तीन वेळां जेव्हां जोडिलें करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥६॥
भीममुद्रा डोळा निरंजनीं लीन । जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥
नामा म्हणे आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥

६८
निवृत्तीनें बाहेर आणिले गोपाळ । घातियेली शिळा समाधीसी ॥१॥
सोपान मुक्ताई सांडिती शरीरा । म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥
आणिकांचीं तेथेम उद्विग्न तीं मनें । घालिताती सुमनें समाधीसी ॥३॥
नामदेवें भावें केली असे पूजा । बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥४॥

६९
अवघी जयजयकारेम पिटियेली टाळी । उठली मंडळी वैष्णवांची ॥१॥
सह मंडळी सारे उठले ऋषीश्वर । केला नमस्कार समाधीशी ॥२॥
पंचद्वारे संत रिघाले बाहेर । सखा ज्ञानेश्वर आळंकापुरीं ॥३॥
इंद्रायणी केलें अवघ्यांही आचमन । करिती समाधान निवृत्तीचें ॥४॥
सोपानासी पोटीं धरिलें देवानें । संवत्सरगांवी जाणें नेम केला ॥५॥
मुक्ताबाईलागीं सांगितली खूण । जाय तो सोपान स्थिर असा ॥६॥
त्रिवर्ग तीं ऐसीं राहिलीं एकमनें । जाणोनियां खूण नामा म्हणे ॥७॥

७०
देवसमागमें परतले भार । केला हरिगजर समाधीसी ॥१॥
नव दिवस संत समाधीजवळी । देव चंद्रमौळी कीर्तनासी ॥२॥
शुद्धमार्गेसर दशमी भोजनें । विधि नारायणें संपादिली ॥३॥
एकादशीं कीर्तन द्वादशीं पारणीं । मग ऋषि मुनि संतोषले ॥४॥
त्रयोदशीं देव रिघाले बाहेरी । धन्य आळंकापुरीं ज्ञानराज ॥५॥
नामा म्हणे धन्य पलाटण पाउलीं । पंचक्रोश ठेलीं सकळ तीर्थें ॥६॥

७१
धन्य आळंकापुरी शिवपीठ शिवाचें । अगस्ति ऋषीचेम पूर्वस्थळ ॥१॥
त्रिवर्गीं म्हणितलें जाताम जातां हरी । आम्हां कौंडण्यपुरीं आज्ञा द्यावी ॥२॥
इंदनीळ पर्वत नेमिला सोपान देवा । तोंवरी करुं सेवा अंबिकेची ॥३॥
देव म्हणे भलें आरंभिलें तुम्ही । आज्ञा घेतों आम्हीं पंढरीसी ॥४॥
इंद्रनीळ पर्वती समाधि सोपान । सर्वत्र आमंत्रण देवेम दिलें ॥५॥
देवभक्तालागीं जालें समाधान । मग सुरगण आंवतिले ॥६॥
नामा पुंडलिक निघाले बाहेरी । गरुडावरी देव स्वार जाले ॥७॥

७२
समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर । उठविले भार वैष्णवांचे ॥१॥
आळंकापुरीं सव्य घेतली ते संतीं । दिली भागीरथी ज्ञानालागीं ॥२॥
भैरवापासुनि उगम निरंतर । रानोमाळ झरे तीर्थ गंगा ॥३॥
सैघं इंद्रायणी वाहाती मिळोनी । अखंड क्षणीं वोघ जाती ॥४॥
चालिलें विमान गंधर्व सुरगण । यात्रा परिपूर्ण जाली म्हणती ॥५॥
तीर्थ महोत्साह जाला सारासार । देव ऋषीश्वर परतले ॥६॥
वैष्णवांचे भार निघाले बाहेर । केला जयजयकार सर्वत्रांनीं ॥७॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेर । गरुडावरी स्वार देव जाले ॥८॥
नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर । जाला असे स्थिर ब्रह्मबोधें ॥९॥




Thursday, 14 November 2024

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट


त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते.

चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात, असे म्हटलं जातं. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेवदेखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरी हर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. या दिवशी विष्णूंची सहस्त्र कमळांनी पूजा करणार्‍याला कुटुंबाला वैकुंठ प्राप्ती होते असे म्हणतात.

पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासात येणारी चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल.  या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णुंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.

वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.

पौराणिक आख्यायिकेनुसार या दिवशी शिवाने प्रभू विष्णुंना सुदर्शन चक्र दिले होते.  वैकुंठ चतुर्दशीला काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते.

महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुदर्शीला केले होते. म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राध्द करणे श्रेष्ठ असल्याचे मानले जातं. सद्धगुणी, दिव्य पुरुष आणि सतकर्म करणार्‍यांना वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास मृत्यूपश्चात वैकुंठलोक मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. 








Vintage photo 1909

  Boys begging on the streets of Nashik, 1909.