NASHIK PRATIBIMB नाशिक प्रतिबिंब
Saturday, 5 July 2025
असा असतो आषाढी वारीचा सोहळा
Thursday, 28 November 2024
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली ती आजची तिथी (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार).
संत नामदेव महाराज या समाधी सोहळ्याचे साक्षीदार. त्यांनी उपरोक्त अभंगात या समाधी सोहळ्याचे ज्ञानदेवांच्या मनात समाधी घेण्याचा विचार आल्यापासून ते अगदी समाधी घेईपर्यंत भावपूर्ण वर्णन केले आहे.
१
मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रुमा ।
निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥
विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा ।
भरित दाटलें अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥
मति चालविली रसाळ । संत श्रोतिया केला सुकाळ ।
दिधलें पुरुषार्थाचें बळ । तें तूं केवळ संजीवन ॥३॥
अमृतानुभव आनंदलहरी । ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी ।
संस्कृत प्राकृत वैखरी । वदविली माझी ॥४॥
आतां मोक्षाचिया वाटा । पाहिला षड्रचक्र चोहटा ।
आज्ञा द्यावी वैकुंठा । ज्ञानदेव म्हणे ॥५॥
२
आतां पदपदांतराची सेवा । संपादिली स्वामी केशवा ।
धन्य आमुचिया दैवा । जोडिलां तुम्ही ॥१॥
आत्मविद्या बोलावया कारणें । सुख पावले श्रोते सज्जन ।
आतां जें आरंभिलें मनें । तें आपण सिद्धि न्यावें ॥२॥
भूवैकुंठ एक पंढरी । ल्याहूनि आगळी आळंकापुरी ।
सिद्धेश्वरा शेजारीं । इंद्रायणी ॥३॥
त्रिपुटी पश्चिम मोक्षाची वाट । प्रत्यक्ष कैलास सिद्धपेठ ।
गोपाळपुरीं केलीं गोष्ट । चौघीजणी ॥४॥
नलगे कलियुगींचा वारा । जें जें बोलिलों जगदोद्वारा ।
मागितला थारा । पदीं तुझ्या ॥५॥
आतां वैराग्याचें बळ । सिद्धि प्राप्तीचें फळ ।
ज्ञानदेवें घेतली आळ । जाणा स्थळ आवडीचें ॥६॥
३
अष्टोत्तरशें तीर्थें सारीं । ओघें आलीं आळंकापुरीं ।
वाद्यें वाजताती गजरीं । कीर्तन लहरी अमृताची ॥१॥
जैसा कस्तुरीचा सुगंधु । अनुभवी न म्हणतीच बद्धु ।
तैसा औटपिठाचा नादु । आठवी गोविंदु आवडीनें ॥२॥
बौद्ध अवतार चक्रपाणि । सत्रावी कळा माय रुक्मिणी ।
जाणत असे अंतःकरणीं । भक्त इच्छा ॥३॥
भावें विठठलें केली गोष्टी । ज्ञानदेवें अपूर्व इच्छिलें पोटीं ।
जावें उठाउठीं । समुदायेंसी ॥४॥
४
विठठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले ॥१॥
परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥२॥
गंधर्व आणि देव आले सुरगण । चाललीं विमानें आळंकापुरीं ॥३॥
लहान थोर सारे आले ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
नामा म्हणे देवा दिसती तांतडी । जाती मज घडी युगा ऐसी ॥५॥
५
पंढरीचा पोहा आला आळंकापुरीं । पंच कोसावरी साधुजन ॥१॥
पांडुरंगा संगें वैष्णवांचे भार । दिंड्या ते बाहेर निघाल्यस ॥२॥
पताकांचे भार निघाले बाहेर । भेटती ऋषीश्वर पांडुरंगा ॥३॥
अवघिया भेटी जाल्या त्या बाहेरी । मग आळंकापुरी येते जाले ॥४॥
सोपानानें मग केला नमस्कार । उतरिले पार पांडुरंगा ॥५॥
६
हरिहरविधाता आले आळंकापुरीं । इंद्रायणी तीरीं एक थाटी ॥१॥
योगियांचा सखा कोठें ज्ञानेश्वर । जाती ऋषीश्वर भेटावया ॥२॥
शून्याचिया पोटीं निरंजन गुंफा । ज्ञानयज्ञ सोपा सिद्ध केला ॥३॥
उन्मनीं निद्रा लागलीसे फार । स्वरुपीं ज्ञानेश्वर जागा जाला ॥४॥
नामा म्हणे देवा भली देली बुद्धी । लागली समाधि ज्ञानदेवा ॥५॥
७
लागली उन्मनी वैराग्याचे धुणी । जागा निरंजनीं निरंतर ॥१॥
भूचरी खेचरी चाचरीच्या छंदें । अगोचरीच्या नादें सहस्त्र दळीं ॥२॥
औटहातध्वनी चित्तवृत्ती जेथें । उजळली ज्योत चैतन्याची ॥३॥
नामा म्हणे देवा करा सावधान । नाहीं देहभान ज्ञानदेवा ॥४॥
८
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग । मिळाले ते सांग आळंकापुरीं ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत । जाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥
९
अल्याड पल्याड पताकांचे भार । मध्यें मनोहर इंद्राहणी ॥१॥
पिवळ्या पारव्या आणिक हिरव्या । नीळवर्ण सार्या लखलखित ॥२॥
जरी जर्तातरी जाल्या रानभरी । विजा त्यावरी खेळताती ॥३॥
सर्पाकार दंड तारांगणावाणी । पताका तिकोनी दाटताती ॥४॥
नामा म्हणे तेथें पताकांचे भार । केव्हडें भाग्य थोर ज्ञानोबाचें ॥५॥
१०
कैलासासा वास अधिक सिद्धबेट । विष्णूचें वैकुंठ पुरातन ॥१॥
भूमीवरी पंढरी तैसी आळंकापुरी । पंच कोशावरी पुण्यभूमी ॥२॥
सुखाची हे मूर्ति नीलकंठलिंग । चक्रतीर्थ सांग मोक्ष भेटे ॥३॥
परमार्थ सुअर्थ देखतांची संत । सांगितली मात अनुभवाची ॥४॥
नामा म्हणे देवा हें स्थळ चांगलें । चित्त मन रंगलें ज्ञानोबाचें ॥५॥
११
पुसताती संत सांगा देवा मातें । पूर्वीं येथें होतें कोण क्षेत्र ॥१॥
देव म्हणे स्थळ सिद्ध हें अनादि । येथेंच समाधि ज्ञानदेवा ॥२॥
अष्टात्तरशें वेळां साधिली समाधी । ऐसें हें अनादि ठाव असे ॥३॥
नामा म्हणे देवा सांगितलें उत्तम । ज्ञानांजन सुगम देखों डोळां ॥४॥
१२
स्वानंदें देवभक्तां भेटी । वोरसोनि कंठीं आलिंगावें ॥१॥
देव म्हणे भले आठवलें तुज । ते हे संधी मज कळली असे ॥२॥
पदपदांतरें केला मार्ग सोपा । त्यांत माझी कृपा वोळली असे ॥३॥
देव म्हणे तुझी पुरवीन आळी । सुखी सही मंडळी वैष्णवांची ॥४॥
नामा म्हणे देवा आज्ञा देगा यासी । नेणूं काय आम्हांसी आरंभिलें ॥५॥
१३
उदित जालें मन आतां काय अनुमान । करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी ॥१॥
देवाचा हो कर धरोनी ज्ञानेश्वर । निघाला बाहेर योगिराज ॥२॥
मागें पुढें संत चालिले मिरवित । कौतुक पहात इहलोकीं ॥३॥
नारा विठा गोंदा माहादा विरक्त । परसा भागवत उभें तेथें ॥४॥
समुदाय वैष्णव मिळालासे भारी । महोत्सव गजरीं आरंभिला ॥५॥
नामा म्हणे गुज दाविलें श्रीहरी । धन्य आळंकापुरीं पुण्यभूमी ॥६॥
१४
सारासार विचार करिती अवघे जन । हे ज्ञान अंजन दाविलें डोळां ॥१॥
पाहिलें गे माय अंतरींचें सुख । वैकुंठनायक उभा असे ॥२॥
ज्ञानदेवायोगें सकळांशी दर्शन । परब्रह्म निधान डुल्लतसे ॥३॥
अवघे जन कोडें घालिती सांकडें । सांगावे निवाडे नामयाचे ॥५॥
देव म्हणे नामा विचारिलें आम्हां । ते कां संधी तुम्हां कळली नसे ॥६॥
१५
देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी । येथेंचि समाधि ज्ञानदेवा ॥१॥
चौयुगां आदिस्थळ पुरातन । गेले तें नेमून मुनिजन ॥२॥
चालिले सकळ जाले ते विकळ । अनादि हें स्थळ ज्ञानदेवा ॥३॥
नामा म्हणे आम्हां सांगितलें हरी । दीर्घध्वनि करी वोसंडोनी ॥४॥
१६
खेद दुःख करी मनाचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां दाटताती ॥१॥
नारा विठा गोंदा पाठविला महादा । साहित्या गोविंदा सांगितलें ॥२॥
काय काय आणूं सांगा हें प्रमाण । नेमियेला नेम पांडुरंगें ॥३॥
तुळसी आणि बेल दर्भ आणि फुलें । उदक हें चांगलें भागिरथीचें ॥४॥
नामा म्हणे देवा साहित्य करितां । आठवितें चित्ता खेद दुःख ॥५॥
१७
साडेतीन पाउलें टाकिलीं निश्चळ । नेमियेलें स्थळ उत्तरायणी ॥१॥
देव म्हणे ज्ञाना होई सावधान । माग वरदान मज कांहीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासीं । व्रत एकादशी स्वामीकडे ॥३॥
कृष्णपक्षीं व्रत हरिदिन परिपूर्ण । मागितला मान ज्ञानदेवें ॥४॥
नामा म्हणे देवा आवडीनें देतां । जोडलें हें संतां पियुष जें ॥५॥
१८
वोसंडोनी हरि आनंदला तेथें । पुण्य हें अगणित सांगितलें ॥१॥
सर्वांगालागीं न्याहाळिलें परिपूर्ण । केलें निंबलोण आवडीनें ॥२॥
आळंकापुरीं कोणी करील कीर्तन । तयालागीं येणें वैकुंठीचें ॥३॥
अस्ति नास्ति उदकीं करिल ब्रह्मरुप । कोटी कुळांसहित उद्धरीन ॥४॥
जेथें ज्ञानदेव तेथें मी निशिदिनीं । येथें सुखें ज्ञानी डुल्लताती ॥५॥
नामा म्हणे आतां वोसंडले हरी । जडमूढावरी कृपा केली ॥६॥
१९
वन वृक्ष वल्ली ईश्वरासमान । ऋषि मुनिजन राहाती जेथें ॥१॥
होऊनियां पक्षी कपोद कोकिळा । वेष्टियेलें स्थळा ब्रह्मबोधें ॥२॥
मृत्तिका पाषाण पंचक्रोशीचे खडे । जाले पहा धडफुडे ब्रह्मरुप ॥३॥
पंचमहापातकी गेले आळंकापुरीं । न चाले त्याजवरी काळ यम ॥४॥
सांगताती देव ऐकती रुक्मिणी । नामा म्हणे चक्रपाणि वर दिला ॥५॥
२०
चक्रतीर्थीं पाहा उभा तो गोपाळ । पुढें विणे टाळ वाजताती ॥१॥
स्वर्गींहुनि पुष्पें वर्षती सुरवर । उभे ऋषीश्वर समुदायेंसी ॥२॥
आणिक वाद्यें तेथें वाजती अपार । जाती ज्ञानेश्वर समाधीसी ॥३॥
नामा म्हणे देवा चुकों नेदी संधी । पोहोचविताम सिद्धि बाळकासी ॥४॥
२१
कोण जाणे माझे जीवींचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां लोटताती ॥१॥
अवघियांचे मन दूषित तटस्थ । लहान थोर संत वोसंडती ॥२॥
तारियेले जड बा माझ्या कीर्तनीं । आठवती मनीं गुण तुझे ॥३॥
नामा म्हणे येथें बोलवेना मज । जातसे निजगुज आवडीचें ॥४॥
२२
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ॥१॥
कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥
अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्वारा बोलविलें ॥३॥
नामा म्हणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥
२३
अनुभव हा सागर गुह्य आणि ब्रह्म । उघडे अध्यात्म बोलियेलें ॥१॥
प्रगट हें गुह्य उकलिलें गाबाळ । केलें करतळमळ ज्ञानयानें ॥२॥
कोणाची कल्पना नुरेचि बा येथें । उघडा गुह्यार्थ सिद्ध केला ॥३॥
करणें न करणें सांगितला पंथ । तिहीं लोकीं कीर्त वाढविली ॥४॥
ज्ञान हें अंजन साधी संजीवनी । नामा म्हणे यांनीं ख्याती केली ॥५॥
२४
अहंकार पोटींचे उतरिले जहर । केला उपकार जगामाजीं ॥१॥
कामक्रोध उतें उतरिले दंभ । करपले कोंभ संशयाचे ॥२॥
विकल्पाचे पायीं घातियेली बेडी । केली ताडातोडी इंद्रियांची ॥३॥
स्वर्गादिक सुखें कमाविली रोकडीं । वैकुंठासी शिडी लावियेली ॥४॥
नामा म्हणे धन्य उभारिल्या ध्वजा । घातयेल्या शेजा सुखाधामीं ॥५॥
२५
कासाविस प्राण मन तळमळी । जैसी कां मासोळी जीवनाविण ॥१॥
दाही दिशा वोस वाटती उदास । करिताती सोस मनामाजीं ॥२॥
घातियेली घोण प्राण आला कंठीं । ज्ञानेवासाठीं तळमळीं ॥३॥
नामा म्हणे देवा वाटतसे खंती । चालली विभूति योगियाची ॥४॥
२६
नानापरी मन आवरितों भारी । कांही केल्या हरि विसर न पडे ॥१॥
दृश्यादृश्याच्या दूर केल्या गोष्टी । उघडिली दृष्टि ज्ञानदेवें ॥२॥
गीतेवरी टीका ग्रंथ केला सार । केवळ ईश्वर ज्ञानाचा हा ॥३॥
नामा म्हणे आतां देहासी विटला । स्वरुपीं पालटला ज्ञानदेव ॥४॥
२७
गंध आणि अक्षता पंचामृत उदक । धूप आणि दीप आणियेले ॥१॥
संत सज्जनांचा मिळाला समुदावो । मध्यें ज्ञानदेवो चालतसे ॥२॥
क्षेत्र प्रदक्षणा करावया उद्देशी । मुहूर्त देवापाशीं विचारिला ॥३॥
दशमीचे दिवशीं रिघावें बाहेर । हरिदिनीं जागर निशिदिनीं ॥४॥
द्वादशी पारणें सोडावे निश्चळ । नेमियेलें स्थळ सिद्धेश्वरी ॥५॥
नामा म्हणे हरि नेमिला सिद्धांत । काय माझा अंत पाहातसां ॥६॥
२८
ज्ञानेश्वरापाशीं आनंदी आनंद । नाचतो गोविंद कीर्तनासी ॥१॥
दशमीच्या दिवशीं महोत्सव आळंकापुरीं । करितसे हरि आवडीनें ॥२॥
हरिदिनीं जागरण होत सारी रात्र । बसोनि पंढरीनाथ स्वयें अंगे ॥३॥
द्वादशी पुण्यतिथी केली ज्ञानेश्वरा । पांच दिवस सारा महोत्सव ॥४॥
अमावस्ये दिवशीं केला गोपाळकाला । मग वैष्णवाला लाभ मोठा ॥५॥
नामा म्हणे देवा आनंद आळंकापुरी । कांही दिवस हरि राहा येथें ॥६॥
२९
विनविति संत आणिक सज्जन । नव्हे समाधान कांहीं केल्या ॥१॥
नानाचि प्रकार करितसे घोर । कांहीं केल्या स्थिर चित्त नव्हे ॥२॥
काय पाहावें याला विरक्त पुरुषाला । स्वरुपीं मिळाला ज्ञानदेव ॥३॥
नामा म्हणे यांचें उचंबळलें प्रेम । म्हणोनि परब्रह्म मागें पुढें ॥४॥
३०
निवृत्ति सोपान आणिक मुक्ताई । जाताती पाहीं कोणीकडे ॥१॥
देवासी गुह्यार्थ केला पां एकांत । ज्ञानदेवें हित आरंभिलें ॥२॥
नामा म्हणे अवघे बसा एकीकडे । ऐको द्या निवाडे गुज याचें ॥३॥
३१
निवृत्ति सोपान मुक्ताई धाकुटी । धरियेली कंठी पांडुरंगें ॥१॥
कळवळिली मनीं करिती दीर्घ ध्वनी । आठविती मनीं ज्ञानदेव ॥२॥
विकळ जालें चित्त संत हे दुश्चित । नामा विकळ तेथ होत असे ॥३॥
३२
तिघांजणांलागीं केलें समाधान । सांगितली खूण अंतरींची ॥१॥
कलियुगी जग आत्याती करिती । साहवेना कीं यासी कांहीं केल्या ॥२॥
पापी उद्धरिले पतित तारिले । जड पावविले मोक्षपंथीं ॥३॥
नामा म्हणे याचें करितां समाधान । कळलें अंतःकरण मन यांचें ॥४॥
३३
निसंगाची संग न लगे आणिकाचा । परमार्थ हा साचा गहन केला ॥१॥
जड या जीवाचें हरविलें अज्ञान । नेले उतरुन भवसिंधु ॥२॥
ज्ञानियासि केली सिंधुसंजीवनी । जालें जनीं वनीं एक तारुं ॥३॥
नामा म्हणे सत्य बा माझ्याचें बोलणें । करी निंबलोण पदीं त्यांचें ॥४॥
३४
फार आठवतें निवृत्तीचे चित्तीं । सोपान स्फुंदती मुक्ताबाई ॥१॥
आम्हां माता पिता नित्य ज्ञानेश्वर । नाहीं आतां थार विश्रांतीसी ॥२॥
छळिलें ब्राह्मणें प्रतिष्ठानीं जातां । रेड्यामुखीं वेदांता बोलविलें ॥३॥
आला चांगदेव व्याघ्र वहान घेऊन । नेला अभिमान ज्ञानदेवें ॥४॥
नाना प्रकारचे आठविती शब्द । नामा म्हणे बोध भाविकाला ॥५॥
३५
देव म्हणे असे आठवाल फार । लागे उशीर समाधीसी ॥१॥
रुक्माबाई म्हणे याजलागी जाण । ब्रह्मीं ब्रह्म खूण मेळविली ॥२॥
अवतार हे चौघे जाले कैशापरी । सांगा आम्हां हरी उकलोनी ॥३॥
शिव तो निवृत्ती सोपान ब्रह्मास्थिती । ज्ञानदेव मूर्ति विष्णूची हो ॥४॥
ब्रह्मणी हे कळा माय मुक्ताबाई । विचारुनि पाही स्वयं मुक्ता ॥५॥
नामा म्हणे याला नाही पां उपाधी । पूर्ण हे समाधि ज्ञानदेवा ॥६॥
३६
अंतर बाहेर कळलें स्वरुपं । स्वयें नंदादीप उजळिला ॥१॥
येणें जाणें कोठें योगी पहा अवीट । सान वैकुंठ करुनि ठेवी ॥२॥
ज्ञानियाला मरण म्हणती अज्ञान । वायां तुम्ही शीण करुं नका ॥३॥
घटाचिया योर्गे प्रतिबिंब भासे । काय म्हणे नासे निरालंब ॥४॥
दर्पणाचे योर्गे दुसरें देखणें । काय मुखें दोन त्यांसी जालीम ॥५॥
दृष्याचियामुळें जीव दिसे येथें । काय पा परमार्थ विटंबले ॥६॥
तंतूचियामुळें पटाला विस्तार । काय निराकार वायां गेलें ॥७॥
रुक्मादेवीवरें केलें समाधान । नामा म्हणे मौन धरुनि ठेले ॥८॥
३७
छत्र चामरें उभा सन्मुख भोंवती । रुक्माईचा पति मध्यभागीं ॥१॥
निंबें आणि नारळ गोण्याची पोफळें । उदंड तिहीं केळें आणियलीं ॥२॥
आणिक बहुता परी घेतली सामुग्री । पीत पीतांबरी मृगछाला ॥३॥
भगवीं आभरणें घेतलें भस्म । अंगें परब्रह्य साह्य त्यासी ॥४॥
नामा म्हणे स्वामी तिष्ठताती अंगें । मेळविली सांगें साहित्यासी ॥५॥
३८
उगमापासुनी गंगा सागरासी गेली । काय दोन जालीं उदकें त्यांची ॥१॥
तैसा ज्ञानदेव जाला अनुभव । काय आम्हां देव दुरावला ॥२॥
सरिता सरोवरचे एके ठायीं झरे । लहान थोर सारे स्वरुपीं माझ्या ॥३॥
रुक्मादेवीवरें उगविलें गाबाळ । संत कृपाळ डुल्लाताती ॥४॥
नामा म्हणे येणें मोहिलें चित्त । राहिले तटस्थ चौघेंजण ॥५॥
४०
आणिक वाद्यें तेथें वाजताती अपार । उठावले भार वैष्णवांचे ॥१॥
चिद्रत्नमंडप दिसला कल्लोळ । जैसे दीपमाळ दीप ठेले ॥२॥
नक्षत्र गोंधळ उसळती भारी । चक्रें त्याजवरी उल्लाळती ॥३॥
मोतियें तोरणें लाविलीं अपार । झळकती तारे विभु ऐसे ॥४॥
नामा म्हणे देवा नवल केलें गहन । पुजाळिलें गगन ज्ञानदेवें ॥५॥
४१
निवृत्ति ज्ञानदेव उभे दोहींकडे । सोपान तो पुढें मुक्ताबाई ॥१॥
देहुडे सुरगण थक्त पडिलें लोकां । सुरु केला डंका वैकुंठींचा ॥२॥
चक्रतीर्थीं उभे देव साधुजन । करविलें स्नान ज्ञानदेवा ॥३॥
देवाचें हें तीर्थ घेतलें ज्ञानेश्वरें । केला नमस्कार पादपद्मीं ॥४॥
विठठल रुक्मिणी ऋषि सुरवर । पूजा ज्ञानेश्वर करितसे ॥५॥
नामयाच्या हातीं गंध अक्षता । पूजा महंता मान्य जाली ॥६॥
४२
टाळ विणे मृदंग वाजती अपार । नारद तुंबर गीत गाती ॥१॥
शुक वामदेव अंबऋषि सादर । मध्यें ज्ञानेश्वर ब्रह्मरुप ॥२॥
पिपिलिकेसी मार्ग जावया न मिळे । जाती भार मेळे वैष्णवांचे ॥३॥
नामा म्हणे देवा दाविली नवाळी । पुरविली आळी ज्ञानोबाची ॥४॥
४३
दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा । आणिक कीर्तना संत उभे ॥१॥
रात्रंदिवस त्यांही केला हरिजागर । हरिदिनीं थोर कृष्णपक्षीं ॥२॥
मग केलें स्नान भागिरथीचे तीरीं । संत महंता भारी पूजिजेलें ॥३॥
अवलोकिलें डोळां अंतर बाहेरी । मग सिद्धेश्वरी येत झाले ॥४॥
सिद्धेश्वरालगीं पूजिले निवळ । मागितलें स्थळ समाधीसी ॥५॥
गंगा आणि गिरजा नीलकंठ ईश्वर । केला नमस्कार नामा म्हणे ॥६॥
४४
अष्टोत्तरशें वेळ समाधि निश्चळ । पूर्वीं तुझें स्थळ वहनाखालीं ॥१॥
उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडिली शिळा विवराची ॥२॥
आसन आणि धुनि मृगछालावर । पाहाती ऋषीश्वर वोसंडोनि ॥३॥
बा माझी समाधि पाहिली जुनाट । केवळ वैकुंठ गुह्यगोप्य ॥४॥
नामा म्हणे देवा पुरातन स्थान । ऐसें नारायणें दावियेलें ॥५॥
४५
नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची ॥१॥
हरिदिनीं जागर केला निशीदिनीं । उदईक पारणीं द्वादशींची ॥२॥
गंगा गिरजा राही रुक्माबाई भामा । उठिल्या रांधण्या पारण्याच्या ॥३॥
नाना प्रकारचे पाक ते अपार । मुनि ऋषीश्वर बोलाविले ॥४॥
वैष्णव देव आणि आले सुरगण । करोनियां स्नान इंद्रायणी ॥५॥
पिंपळाचे पारीं बैसविल्या पंक्ती । पात्रें ते श्रीपती वाढूं लागे ॥६॥
नामा म्हणे देवा करणें साहित्यासी । येतो कासाविसी प्राण माझा ॥७॥
४६
सोवळ्यानें हरि वाढतो सकळां । मनींचा कळवळा कोण जाणे ॥१॥
रुक्माईचे कानीं सांगितली गोष्ट । विस्तारावें ताट ज्ञानदेवा ॥२॥
राही रुक्माबाई वाढिती आवडीनें । सोडितो पारणें ज्ञानदेव ॥३॥
नामा म्हणे देवा परब्रह्म अन्न । जातों बोलावण ज्ञानदेवा ॥४॥
४७
निवृत्ति सोपान मुक्ताई चवथी । अनेक विभूति ज्ञानेश्वरा ॥१॥
नामा पुंडलिक गरुड हनुमंत । परस भागवता बोलविलें ॥२॥
विठ्ठल रुक्माई सत्यभामा राही । इतुके तयेठायीं जमा जाल्या ॥३॥
विसोबा खेचर चांगा वटेश्वर । सांवता कुंभार एके ठायीं ॥४॥
गंगा गिरजा दोघी नीळकंठ ईश्वर । मध्यें ज्ञानेश्वर घेतियेला ॥५॥
४८
निवृत्ति मुक्ताईचें करिती समाधान । घेतला सोपान मध्यभागीं ॥१॥
ऐक्य अहिक्याची बैसली एकवटे । विस्तारिलीं ताटें रुक्माईने ॥२॥
एक एकालागीं देताती प्रसाद । आतां ज्ञाजराज पाहूं डोळां ॥३।
नामा म्हणे स्वस्थ जेवितां पंगती । घृतपात्र हातीं विस्तारितु ॥४॥
४९
ज्ञानदेवालागीं चंदनाची उटी । पंचारती होती आनंदाच्या ॥१॥
गंध आणि अक्षता पुष्पपरिमळा । घेती वोसंगळा नामदेव ॥२॥
ज्ञानदेव स्वस्थ देवा वोसंगळा । माळा घाली गळां नामदेव ॥३॥
५०
जेऊनियां स्वस्थ उठिले परिपूर्ण । केलें आचमन वैष्णवांनीं ॥१॥
वैकुंठींचा प्रसाद पावेल निवाडे । गोंदा महादा विडे वांटिताती ॥२॥
दोन प्रहरपावेतों आटोपलें भोजन । तृतीय प्रहरीं कीर्तन आरंभिलें ॥३॥
कीर्तनाच्या नादें मोहिला गोविंद । करावा उद्योग समाधीचा ॥४॥
नामा म्हणे देवा करितां उशीर । विकळ ज्ञानेश्वर जात असे ॥५॥
६१
निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान । कांही केल्या मन राहात नाहीं ॥१॥
बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट । ओघ बारा वाट मुरडताती ॥२॥
बांधल्या पेंढीच्या सुटलासे आळा । तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥
हरिणीविण खोपी पडियेली वोस । दशदिशा पाडसें भ्रमताती ॥४॥
मायबापें आम्हां त्यागियेलें जेव्हां । ऐसें संकट तेव्हां जालें नाहीं ॥५॥
नामा म्हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तीचें ॥६॥
६२
देव रुक्माबाई आणिक साधुजन । करिती समाधान निवृतीचें ॥१॥
ज्ञानियांनी ऐसी करावी जंव खंती । अज्ञानाचा किती पाड आला ॥२॥
धन्य तुमचा महिमा बोलती पुराणीं । दृश्य कांहीं मनीं आठवूं नये ॥३॥
आकाशाचे ठायीं अभ्रें येती जाती । कोण त्याची खंती करुं पाहे ॥४॥
अवतारादिक गेले आले अपार । जैसा का विस्तार मृगजळाचा ॥५॥
नामा म्हणे देवें धरियेलें हातीं । उठविली विभूति निवृत्तिराज ॥६॥
६३
गरुड हनुमंत मुक्ताई सोपान । देव साधुजन आनंदले ॥१॥
मागें पुढें संत पताकांचे भार । मध्यें ज्ञानेश्वर मिरवतो ॥२॥
टाळ आणि विणे मृदंग गायन । करिती कीर्तन सुस्वरेंसी ॥३॥
जयजयकार ध्वनि करिती सुरगण । वर्षती सुमन स्वर्गींहुनी ॥४॥
हरिपाठ गजन करिती अपार । नामा म्हणे भार उठविले ॥५॥
६४
सर्व स्वस्ति क्षेम वैष्णव मंडळी । बैसलेती पाळी समाधीच्या ॥१॥
पताकांची छाया दुणावली फार । सिद्ध ज्ञानेश्वर तेव्हां जाले ॥२॥
अजानवृक्षदंड आरोग्य अपार । समाधीसमोर स्थापियेला ॥३॥
कोरड्या काष्टीं फुटियेला पाला । तेव्हां अवघियाला नमस्कारी ॥४॥
नामा म्हणे देवा घार गेली उडोन । बाळें दाणादाण पडियेली ॥५॥
६५
मुंग्यांचिये विवरीं लागलीसे आग । पुढें आणि मागें जालें नाहीं ॥१॥
राही रुक्माई आणि सत्यभामा । ओवाळिती प्रेमा ज्ञानेश्वरा ॥२॥
उभारिल्या गुढिया आणि तोरणें । छाया सुदर्शन धरियेलें ॥३॥
नारा विठा गोंदा भेटला महादा । उभे जागोजागा राहिलेती ॥४॥
विसोबा खेचर चांगा वटेश्वर । केला नमस्कार अवघियांनीं ॥५॥
गोरा कुंभार सांवता माळी । नामा तळमळी वत्सा ऐसें ॥६॥
६६
प्रसा भागवतें केला नमस्कार । सारे लहान थोर जमा जाले ॥१॥
सकलांचिया पायीं नमियलें नमना । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥
प्रथम पायरी बाहेरील जेथ । उभा पंढरीनाथ भेटावया ॥३॥
देव म्हणे बापा अमृत नेदी पाट । फार केले कष्ट जगासाठीं ॥४॥
नामा म्हणे यांनीं अनुभवाच्या नौका । पार केलें लोकां जडमूढां ॥५॥
६७
देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥१॥
नदीचिया माशा घातलें माजवण । तैसें जनवन कलवलें ॥२॥
दाही दिशा धुंद उदयास्ताविण । तैसेंचि गगन कालवलें ॥३॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । पादपद्मीं ठेवा निरंतर ॥५॥
तीन वेळां जेव्हां जोडिलें करकमळ । झांकियेले डोळे ज्ञानदेवें ॥६॥
भीममुद्रा डोळा निरंजनीं लीन । जालें ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥
नामा म्हणे आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥
६८
निवृत्तीनें बाहेर आणिले गोपाळ । घातियेली शिळा समाधीसी ॥१॥
सोपान मुक्ताई सांडिती शरीरा । म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥
आणिकांचीं तेथेम उद्विग्न तीं मनें । घालिताती सुमनें समाधीसी ॥३॥
नामदेवें भावें केली असे पूजा । बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥४॥
६९
अवघी जयजयकारेम पिटियेली टाळी । उठली मंडळी वैष्णवांची ॥१॥
सह मंडळी सारे उठले ऋषीश्वर । केला नमस्कार समाधीशी ॥२॥
पंचद्वारे संत रिघाले बाहेर । सखा ज्ञानेश्वर आळंकापुरीं ॥३॥
इंद्रायणी केलें अवघ्यांही आचमन । करिती समाधान निवृत्तीचें ॥४॥
सोपानासी पोटीं धरिलें देवानें । संवत्सरगांवी जाणें नेम केला ॥५॥
मुक्ताबाईलागीं सांगितली खूण । जाय तो सोपान स्थिर असा ॥६॥
त्रिवर्ग तीं ऐसीं राहिलीं एकमनें । जाणोनियां खूण नामा म्हणे ॥७॥
७०
देवसमागमें परतले भार । केला हरिगजर समाधीसी ॥१॥
नव दिवस संत समाधीजवळी । देव चंद्रमौळी कीर्तनासी ॥२॥
शुद्धमार्गेसर दशमी भोजनें । विधि नारायणें संपादिली ॥३॥
एकादशीं कीर्तन द्वादशीं पारणीं । मग ऋषि मुनि संतोषले ॥४॥
त्रयोदशीं देव रिघाले बाहेरी । धन्य आळंकापुरीं ज्ञानराज ॥५॥
नामा म्हणे धन्य पलाटण पाउलीं । पंचक्रोश ठेलीं सकळ तीर्थें ॥६॥
७१
धन्य आळंकापुरी शिवपीठ शिवाचें । अगस्ति ऋषीचेम पूर्वस्थळ ॥१॥
त्रिवर्गीं म्हणितलें जाताम जातां हरी । आम्हां कौंडण्यपुरीं आज्ञा द्यावी ॥२॥
इंदनीळ पर्वत नेमिला सोपान देवा । तोंवरी करुं सेवा अंबिकेची ॥३॥
देव म्हणे भलें आरंभिलें तुम्ही । आज्ञा घेतों आम्हीं पंढरीसी ॥४॥
इंद्रनीळ पर्वती समाधि सोपान । सर्वत्र आमंत्रण देवेम दिलें ॥५॥
देवभक्तालागीं जालें समाधान । मग सुरगण आंवतिले ॥६॥
नामा पुंडलिक निघाले बाहेरी । गरुडावरी देव स्वार जाले ॥७॥
७२
समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर । उठविले भार वैष्णवांचे ॥१॥
आळंकापुरीं सव्य घेतली ते संतीं । दिली भागीरथी ज्ञानालागीं ॥२॥
भैरवापासुनि उगम निरंतर । रानोमाळ झरे तीर्थ गंगा ॥३॥
सैघं इंद्रायणी वाहाती मिळोनी । अखंड क्षणीं वोघ जाती ॥४॥
चालिलें विमान गंधर्व सुरगण । यात्रा परिपूर्ण जाली म्हणती ॥५॥
तीर्थ महोत्साह जाला सारासार । देव ऋषीश्वर परतले ॥६॥
वैष्णवांचे भार निघाले बाहेर । केला जयजयकार सर्वत्रांनीं ॥७॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेर । गरुडावरी स्वार देव जाले ॥८॥
नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर । जाला असे स्थिर ब्रह्मबोधें ॥९॥
Thursday, 14 November 2024
वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट
#आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट
त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते.
चातुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात, असे म्हटलं जातं. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेवदेखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरी हर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. या दिवशी 'हरिहर भेट' म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते. या दिवशी रात्री शंकराची १००८ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. या दिवशी विष्णूंची सहस्त्र कमळांनी पूजा करणार्याला कुटुंबाला वैकुंठ प्राप्ती होते असे म्हणतात.
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान विष्णु यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णुची परिक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णु यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णुची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णुला वर दिला की, कार्तिक मासात येणारी चतुर्दशी 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. या दिवशी भगवान विष्णुची पुजा केली जाते. विष्णुला चंदन, फुलं, दुध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णुचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णु नामस्मरण केलं जातं. विष्णुला गोड नैवद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णुंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.
वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.
पौराणिक आख्यायिकेनुसार या दिवशी शिवाने प्रभू विष्णुंना सुदर्शन चक्र दिले होते. वैकुंठ चतुर्दशीला काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते.
महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुदर्शीला केले होते. म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राध्द करणे श्रेष्ठ असल्याचे मानले जातं. सद्धगुणी, दिव्य पुरुष आणि सतकर्म करणार्यांना वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास मृत्यूपश्चात वैकुंठलोक मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
Tuesday, 5 November 2024
वीरशैव लिंगायत गवळी समाजाचा अनोखा सोहळा : सगर उत्सव
महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत गवळी समाजा तर्फे दरवर्षी मोठ्या जल्लोषात दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदेच्या व भाऊबीजेच्या दिवशी सगर उत्सव साजरा करण्यात येतो. पशुपालक व दुग्धोत्पादन असणाऱ्या या समाजात पदरी असणाऱ्या म्हैस व रेड्यांनाच आपली लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे ह्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या म्हशी व हेल्याना सजवून वाजत गाजत परिसरात मिरवणूक काढण्यात येते. आकर्षक सजावट केलेल्या हेल्याना आणि त्यांच्या मालकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते.
म्हैस हे लक्ष्मीचे रुप तर रेडा हे याचे वाहन आहे. या दिवशी म्हैस व रेड्याची पूजा केल्यास नवीन वर्षांत अडचणी येत नाहीत असे मानले जाते. या उत्सवामागे महाभारत काळातील एका घटनेचा संदर्भ दिला जातो.श्रीकृष्णाने इंद्रपूजा नाकारुन गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचे आवाहन सर्व गोकूळवासियांना केले होते. त्यामुळे रागावलेल्या इंद्राने गोकूळावर तुफानी पर्जन्यवृष्टी करुन गोकूळ पाण्यात बुडवून कृष्ण व गोकूळवासियांना धडा शिकविण्याचा प्रयत्न केला. तथापि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून सर्व गोप गोपिकांचे व त्यांच्या पशूधनाचे संरक्षण केले. त्या आनंदाप्रीत्यर्थ गवळी समाजात सगर उत्सव साजरा केला जातो असे जुने जाणकार सांगतात.
रंगविलेली शिंगे, गळ्यात घुंगूरमाळा, पाठीवर नक्षीकाम व मानेवर मोरपंखांचा पिसारा अशा रुपात नटलेल्या हेल्यांमुळे हा सोहळा लक्षवेधी ठरतो. सजवलेल्या म्हैस व रेड्यांकडून कसरती करुन घेतल्या जातात. रेड्यांच्या शर्यती अथवा टक्करी आयोजित केल्या जातात.
नाशिकमध्येही हा सोहळा वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
(या लेखासोबतची छायाचित्रे इंटरनेटवरुन साभार)
Saturday, 2 November 2024
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक... दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
Friday, 18 October 2024
मुल्हेरचा रासोत्सव
एक अनोखी परंपरा - मुल्हेरचा रासोत्सव.....
श्रीकृष्णच्या जीवनात रासलीलेचे स्थान अढळ आहे. गोपिका व श्रीकृष्ण यांच्या एकमेकांवरच्या निस्सीम प्रेमाचे ते प्रतीक मानले जाते. गोकुळातील गोपींचे कृष्णकन्हैयावर अपार प्रेम होते. कृष्णाचे सुद्धा सर्व गोपींवर समान प्रेम होते. सर्व गोपी श्रीकृष्णमय झाल्या होत्या. त्या गोपींना आपले पतीसुद्धा श्रीकृष्णरुप दिसत असत. श्रीकृष्णाने सर्व गोपींना वचन दिले होते. त्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेस रात्रीच्या शांत समयी मुरलीधरने मुरली वाजविण्यास सुरूवात केली. मुरलीचा मंत्रमुग्ध करणारा ध्वनी ऐकताच त्या सावध झाल्या. त्यांना कृष्णाच्या भेटीची ओढ लागली. त्यांनी व्यवस्थित शृंगार केला व श्रीकृष्णाकडे आल्या.
श्रीकृष्णास मुरली वाजवताना पाहून सर्व गोपींना आनंद झाला. श्रीकृष्णाने गोपींच्या संख्येएवढी रूपे धारण केली. त्यामुळे प्रत्येक गोपीला श्रीकृष्णाचा सहवास लाभला. एकमेकांचा हात धरून श्रीकृष्णासह गोल रिंगण करून गाणी म्हणत त्या आनंदाने नृत्य करू लागल्या. सर्व गोपिकांच्या जीवनातला तो सुवर्णक्षण होता. श्रीकृष्णाबरोबरची रासक्रीडा पाहून सर्व देवदेवतांना आपणसुद्धा गोपींचे रूप घ्यावे असे वाटू लागले. रासलीलेतील गोपींचे तालमय नृत्य पाहून रंभा, मेनका, तिलोत्तमा इ. अप्सरासुद्धा आश्चर्यचकित झाल्या. गंधर्व, यक्ष,किन्नर यांना गोपींचा हेवा वाटू लागला.
असाच अनोखा रासक्रीडा उत्सव नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथे दरवर्षी साजरा होतो. नाशिकच्या बागलाण प्रांतातील मुल्हेर येथील रासोत्सव महाराष्ट्रातील जुन्या परंपरांपैकी एक आहे. मराठी प्रांत असूनही येथे उत्तरेतील मथुरा आणि वृंदावनात प्रचलीत असणाऱ्या ब्रज भाषेतील गोपीगीत गाऊन उत्सव साजरा केला जातो. स्थानिक श्रद्धेनुसार महाभारतातील राजा मयुरध्वज याने श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने रासोत्सव सुरु केला. पुढे इ.स.१५० च्या सुमारास बागलाण प्रांतावर आभिरांचे आधिपत्य होते. ते स्वतःला कृष्णाच्या कुळातील समजत असत. त्यांनी ही परंपरा सुरु केली असावी परंतु त्याचे तेव्हाचे स्वरूप कसे असावे याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. साधारणपणे हजार वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जातो अशी स्थानिक मान्यता आहे. प्रचलीत उत्सव इ.स.१६०० दरम्यान श्री.उद्धवमहाराजांचे गुरु श्री.काशिनाथमहाराज यांच्यापासून साजरा केला जातो.
स्थानिक आख्यायिकेनुसार हा उत्सव महाभारत कालीन मुल्हेर राजा मयूरध्वज याने (इ.स.पूर्व ३००० सुमारे )सुरु केला. राजा मयूरध्वजाचे राज्य नर्मदेच्या दक्षिण भागात होते या राजधानी रत्नपुर (मुल्हेरचे पूर्वीचे नाव ) पांडवांच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी नर्मदा हि त्यांच्या दिग्विजयाची सीमा निश्चित करण्यात आली.अर्जुन श्रीकृष्णासह नर्मदातीरी अश्व त्यांचा १६ वर्षाचा मुलगा ताम्रध्वज सांभाळत होता. अर्जुनाने नर्मदेच्या दक्षिण तिरावरील राज्यावर विजय मिळवण्याची इच्छा श्री कृष्णा जवळ प्रगट केली. पण देवाने सांगितले की, आपली हिच सीमा आहे. तसेच मयूरध्वज राजा महापराक्रमी आहे.त्याच्यापुढे आपला टिकाव लागणे कठीण आहे तरी ही अर्जुनाने कृष्णाला आग्रह धरला की तुम्ही असतांना काहीही अशक्य नाही.मयूरध्वज हि कृष्ण भक्त होता. त्याच्यावर कृपा व्हावी व अर्जुनाचाही हट्ट पुरवावा. अशा इच्छेने ते सैन्यासह नर्मदेच्या तीरावर आले. त्यांचा सामना ताम्रध्वजानें केला तोही पराक्रमी होता. त्याने आपल्या बाणाच्या वर्षावाने अर्जुनाचा पराभव केला. मग कृष्णाने दुसरी युक्ती केली. त्या दोघांनी ब्राह्मण वेष धारण केला व मयूरध्वजाच्या यज्ञ मंडपात दान मागण्यासाठी आले राजाने त्यांचा आदर करून काय दान देऊ? हि पृच्छा केली तेव्हा ब्राह्मण रुपी कृष्णाने सांगितले की आमचा मुलगा जंगलात एका सिंहाने पकडला असून त्याला सोडविण्यास आपला अर्धा देह द्यावा. अशी इच्छा केली. राजाने कृष्णाचे चिंतन केले तेव्हा त्याला ब्राह्मणाचे खरे स्वरूप कळाले. साक्षात भगवान आपल्याकडे दान मागत आहेत हे जाणून राजाने पत्नी शुद्धमती व पुत्र ताम्रध्वज ह्याच्या हातून देह कापून दिला .श्रीकृष्ण राजावर प्रसन्न झाले. राजाचा त्याग पाहून अर्जुन हि खजील झाला. देवाने राजास वर देऊ केला तेव्हा मयूरध्वज म्हणाला की देवा आपल्या दर्शनाने मोक्ष प्राप्ती आहेच. पण द्यायचे असेल तर आपल्या ह्या जन्मातील वैशिष्ट्य असलेली रासक्रीडा मला दाखवावी. श्रीकृष्णाने मयूरध्वज राजास ती दिव्यचक्षूंनी दाखविली. राजा धन्य झाला व भगवान श्रीकृष्णास विनंती केली की आपली हि कृपा अश्विनी पौर्णिमेस उत्सव म्हणून साजरी करण्याची परवानगी द्यावी, तेव्हा पासून रासक्रीडा उत्सव साजरा होतो. एवढेच नाही तर श्री उद्धव महाराजांनी आपले निर्वाणानंतर चे स्थान ह्या जागे जवळ असावे अशी इच्छा केली . म्हणून समाधी हि रासस्तंभा समोर आहे.
उत्सवाचे स्वरूप - अश्विन शुद्ध पौर्णिमेला गोरजमुहूर्तावर श्री.उद्धवमहाराज समाधी मंदिराच्या प्रांगणातील एका खांबावर चोवीस आरे असणाऱ्या चक्रावर केळीच्या पानांचे आच्छादन करून त्याचे आरोहण केले जाते त्यानंतर ते झेंडूच्या फुलांनी सुशोभित केले जाते. श्री.उद्धवमहाराजांचे वंशज असणाऱ्या पंडित घराण्यातील एका उपनयनसंस्कार झालेल्या बालकाला कृष्ण बनवतात तोच त्यादिवसाचा साक्षात भगवान असतो त्याची आणि इतर गोपींची पंडितांच्या घरी आरती केली जाते. त्यानंतर त्यांना उत्सवस्थळी चक्राखाली आसनावर बसवले जाते. रासक्रीडा उत्सवाची सुरुवात ही रासचक्राच्या सजावटीपासून सुरू होते. यासाठी २८ फुट व्यासाचे भव्य चक्र दोरीच्या सहाय्याने विणून तयार केले जाते. यात १४ आऱ्या असलेल्या ७ फुट व्यासाचे चक्राला २८ बाम्बू बांधून ते २८फुट व्यासाचे भले मोठे चक्र कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे विनले जातेेचक्राची सजावट केळीची पाने व झेंडूच्या फुलांनी केली जाते. त्यानंतर सूर्यास्त व् चंद्रोदय यांच्या संपात काळी हजारो हातानी १४ फूटी रासस्तंभावर चढविले जाते.
रासक्रीडेतील अनेक वेगवेगळी कामे पूर्वापार अनेक समाजांना वाटून दिलेली असून सर्व समाजघटकांना विविध जबाबदार्या सोपवत सामाजिक एकतेचा संदेशही या उत्सवातून देण्याचा प्रयत्न पूर्वापार होत आला आहे. आजही हे सर्व समाज आपापली परंपरा व जबाबदारी सांभाळून आहेत. रासमंडलासाठी लागणारी केळीची पाने व झेंडूची फुले आणण्याचे काम भिल्ल व कोकणी समाजाकडे, रासमंडल विणणे व देव सांभाळण्याची जबाबदारी शिंपी समाजाकडे, रासाच्या चाकाची व रासमंडळाच्या दांड्या सांभाळण्याचे काम मराठा समाजाकडे, दिवाबत्तीची सोय करण्याचे नियोजन तेली समाजाकडे आणि भजन परंपरा व पूजा साहित्याची जबाबदारी ब्राह्मण व वाणी समाजाकडे आहे. गावातील इतर सगळी मंडळी रासाच्या चाकाच्या सजावटीत व भजन गायनात सहभागी होतात. मुल्हेर परिसरातील ४२ खेड्यांमधून प्रामुख्याने आदिवासींची वस्ती आहे. त्यांचा सहभाग या उत्सवात असतो. गुजरातच्या डांग भागातूनही काही आदिवासी या उत्सवासाठी मुल्हेर गाठतात.
सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्या मध्यकाळी म्हणजेच संपतकाळी हे चक्र चंद्र सूर्याच्या साक्षीने, श्री उद्धव महाराज की जयच्या जयघोषात १४ फूट उंचीच्या रासस्तंभावर चढवतात. चक्र म्हणजे मंडल होय. वृंदावनात अशाच मंडलाखाली भगवान श्रीकृष्ण गोपिकांसमवेत वृंदावनात रासक्रीडा खेळत. या मंडलाचे प्रतिक म्हणजेच हे रासचक्र आहे तर रासक्रीडेला गोपी व कृष्णाच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार इ.स. पूर्व ३००० साली महाभारत कालीन राजा। मयुरध्वजास भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य चक्षूंनी रासक्रीडेचे दर्शन घडवले. तेव्हापासून मुल्हेर येथे अश्विन पौर्णिमेस रासक्रीडा उत्सव साजरा केला जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळते. रासक्रीडा उत्सवाची धुरा सध्या मुल्हेरच्या श्री उद्धव महाराज समाधी संस्थानकडे आहे. चारशे वर्षांपूर्वी उद्धव महाराजांनी मुल्हेरला समाधी घेतली. त्यांचे गुरू श्री काशीनाथ महाराज मुल्हेरलाच राहत. त्यांच्याही आधी मुल्हेरमध्ये रासक्रीडा उत्सव सुरू होताच.
मात्र, इ. स. १६४०च्या सुमारास काशीनाथ महाराजांनी रासक्रीडा उत्सवाची पुनर्रचना केल्याचे संदर्भ श्री उद्धवमहाराज संस्थानचे ११ वे मठाधिपती डॉ. रघुराज महाराज यांच्या अभ्यासाने सापडले आहेत. यावरून तेव्हापासून आजतागायत हा रासक्रीडा उत्सव मुल्हेर येथे सुरू आहे. कोजागरी पौर्णिमेच्या शीतल चांदण्याचा सहवास आणि उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरणात हा रासोत्सव आजही उत्तर भारतीय पद्धतीनेच साजरा केला जातो. श्री उद्धव महाराजांच्या समाधीसमोर संपातकाली रास स्तंभावर चक्र चढल्या नंतर पूजा, आरती होते. रात्री अधिकारी घराण्यातील एका मुलाला श्रीकृष्णाचे रूप दिले जाते. नवसाने झालेल्या मुला, मुलींना राधागोपिका बनवून राधा कृष्ण जय कुंजविहारी, मुरलीधर गोवर्धनधारी वा भजनाच्या जयघोषाने देवघरापासून समाधी मंदिराकडे नेतात, रात्री नऊ वाजता आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होतो. सकाळी सात वाजेपर्यंत रासाच्या चक्राखाली व्रज भाषेतील १०५ भजने म्हटली जातात. या भाजनांची रचना विस्कळीत झाली. ती पुन्हा सुस्थापित करण्याचे काम श्री काशीनाथ महाराजांनी केले. या भजनांची गायकी पंजाबी आहे. तर पखवाज उत्तर भारतीय आहे. सुमारे अर्धा किलो वजनाची दक्षिणी झांज अत्यंत वेगाने या भजनांमध्ये वाजवली जाते.
या भजनांचे वैशिष्ठ्य म्हणजे ही भजने संत कबीर, नरसिंह स्वामी यांनी रचलेली असून यात श्रीकृष्णाशी असलेली गोपिकांची एकरूपता, विरहाचि व्याकुळता आणि समर्पण याचे हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. केदार, सारंग, जयजयवंती, अडाना, सोरट, भूप, प्रभात, तोडी, कल्याण, मालगौडा, सामेरी, कानडा, परज, मालू, बिलावर, मालकॉस, रामकली, भैरवी, नायकी आदी रागदारीत गायली जातात. रासक्रीडेची भजने गाण्यामध्ये तरुण वर्गाचा उत्साह लक्षणीय असतो, हेही एक या उत्सवाचे वैशिष्ठ्य. भजन सोहळ्याची सांगता भैरवीने होते. हा परमोच्च क्षण असतो. यावेळी उपस्थित भाविकांचे अश्रूंनी डोळे भरून येतात. सकाळी ८.३० वा. रासस्तंभावरून रासचक्र हळूवारपणे खाली उतरविले जाते. त्यानंतर रासचक्र महोत्सवाची सांगता होते. यादिवशी मुल्हेरमध्ये मोठी यात्रा भरते. या उत्सवाला महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातूनही जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविक कोजागिरीच्या रात्री उपस्थित असतात. त्यामुळे मुल्हेरला यात्रेचे स्वरूप येते.
या उत्सवात नवस बोलण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठीही गर्दी असते. त्यात अपत्यप्राप्तीसाठी नवस बोलणारे अधिक असतात. नवस हा श्रद्धेचा भाग असला तरी हा रासक्रीडा उत्सव म्हणजे एक सांस्कृतिक सोहळा आहे यात शंका नाही.
Saturday, 5 October 2024
श्री देवी सप्तश्रुंग स्तोत्र
श्रीगणेशाय नमः || श्री सरस्वत्ये नमः || श्री गुरुभ्यो नमः || श्री दुर्गादेव्ये नमः ||
ॐ नमो श्री सप्तशृंगी निवासिनी | नमो सह्याद्रीशिखर रूपिनी |
नमो त्रिगुणरूप विश्वमोहिनी | जगजननी तुज नमो ||१||
नमो महिषासुरमर्दिनी | नमो सुरवरबंधमोचनी |
नमो भक्त मनोल्हासिनी दैत्यकुलदाहिनी तुजनमो ||२||
नमो मुळमाया भगवती | तुझीया नामे भक्त गर्जती |
सगुणरूप नटली पर्वती | पहाता तटस्थ सूरनर ||३||
कष्टे लंघुनी गिरीवर | जवळ करिता तुझे द्वार |
शिन भाग उतरे पार |नवल अदभूत हेची पै ||४||
सुंदर ध्यान मृत्युलोकी | भक्तलिन सदविवेकी |
साष्टांग नमोनी नयन झाकी | हृदय मंदिरी रूप तुझे ||५||
सर्व सुरांचे तेज एकवटले | अष्टादश भूजारूप नटले |
दानव अंगी भय सुटले | उर्वीवरी प्रगटता ||६||
सर्व देवांची एकशक्ती | प्रेमभावे करावी भक्ती |
ओळंगती चारी मुक्ती |निश्चय चित्ती असावा ||७||
औट पिठे भारता माझारी | अर्धपिठ सप्तश्रुंगगिरी |
दुर्गा हीच आष्टादशकरी | पावली निर्वाण भक्तासी ||८||
विप्रकुळांची कुलस्वामिनी | रेणुकामाता पुर निवासिनी |
क्षत्रियकुल वरदायिनी | तुळजापूर तुकाई ||९||
तृतीय वर्ण वैश्याची आई | करविर निवासिनी रमाबाई |१०||
ध्यान धावते पर्वत कंदरी | क्रोधावली असुरावरी |
नानापरी आयुधेकारी | रणांगणी उभी जैसी ||११||
कधी सौम्यरूप दिसे | कधी नयना उग्रता भासे |
भक्तजना लाविले पिसे | संचारोनी नाचवी थै थै ||१२||
सन्मुख पार्वती मार्कंडेय मुनी | वाडे सप्तसतीचा मधुर ध्वनी |
परिसे जगदंबा लक्ष लावोनी | हस्त कर्णासी लाविला ||१३||
घोडंब निवासीनि धृवबाला | स्तवनार्थी उभी पूर्वेला |
पाठीशी परशुरामबाला | निसर्ग रचना सुंदर ||१४||
गणेशतीर्थी लंबोदर | यमुनातांबुल तीर्थ मनोहर |
शिवालय तीर्थी सिद्धेश्वर | स्नाने पतिता उद्धरी ||१५||
पिंडश्राद्ध पितृतर्पण | करिता पूर्वजा उद्धरण |
मनिद्विपी स्वानंदे करून | समिपता मुक्ती भोगिती ||१६||
नवदुर्गा पर्वत शिखरी | शस्त्रे सज्ज घेवुनिया करी |
गुप्तउभ्यारण सुंदरी | ध्वजरक्षणी सावध ||१७||
सप्तमातृका विक्राळरूप | करी पाजाळुनी पोत दीप |
स्वेच्छे खेळती समीप | रक्षणी सप्तश्रुंगाचे ||१८||
वेताळादि चंडीका भैरव | शाखिनी डाकिनी बिरुदेव |
सांभाळी ती स्वयमेव | अंबिका राजदरबार ||१९||
अदभूत चमत्कार अनेक | वर्णिता वाटेल कौतुक |
सर्वस्वी नटली रूप एक | भगवती अंबिका समर्थ ||२०||
राम असता बळ ब्रम्हचारी | तीर्थे फिरलासे उर्वीवरी |
तव सप्तश्रुंगासी रावणारी | दर्शनास्तव पातले ||२१||
रघुनाथ वनवासी असता | पंचवटी ये निवास करिता |
सांगे घेउनी जनकदुहिता | मातेच्या दर्शनी येतसे ||२२||
अद्यापि सिंदूर चर्चुनी | जगदंबे सन्मुख बैसोनी |
भक्तजना प्रथम दर्शनी | सगुणरूप नटला असे ||२३||
ऐसी माय माझी अनादी | सदभक्ता उतरावी भवाद्धी |
योगिया ब्रम्हानंदपदी | स्वानंदे बैसवी अक्षय ||२४||
सप्तश्रुंगरूपे सप्तशती | शुद्ध वैखरी उच्चारिती |
तयासीच उत्तमगती | तवकृपे लाभतसे ||२५||
ऐसी जगन्माता श्रीमंतीण | भक्ता का करिसी हैराण |
अन्न उदाक्स्तव दिनदिन | हिंडवीसी दारोदारी ||२६||
भक्ता कसोटी लाविसी | खरे खोटे निवडिसी |
सदभक्ता अपंगीसी | अंती दाविसी ब्रम्हरूप ||२७||
तुझे गाता गुणगान | राधासुत झाला लीन |
जळी स्थळी तुझे ध्यान | अहोरात्र ध्यातसे ||२८||
कधी दाविसी चितस्वरूप | भक्ती करिता जपतप |
अंतरीचा ध्यान दिप | अखंड जळतो तवकृपे ||२९||
आता नको हो अंत पाहू | करपल्लवे किती तुज पाहू |
यातना कुठवरी साहू | विश्वमोहिनी दयाळे ||३०||
जीवसृष्टीची जीवन कळा | चिदानंदरुपी चितकळा |
त्रिभुवन सुंदरी वेल्हाळ | भोळा खुळा भाव माझा ||३१|
माया ब्रंम्हात मानिती भेद | निवडीता तटस्थ झाले वेद |
ज्ञानवंत पी घालिती वाद | खेद बहु वाटतसे ||३२||
अंबे तूच रामकृष्ण हरी | राधा रुक्मिणी जनककुमारी |
माया ब्रंम्हाचा खेळ दशअवतारी | आभेदत्व नसेची ||३३||
देहासवे फिरे छाया | तैसी व्यापली श्रीहरीची माया |
ब्रम्ह स्वरूपी ओळख द्याया | जगदंबिका समर्थ ||३४||
पित्याची ओळखी माताच सांगे | बाप म्हणविता वर पांगे |
दूषण येईल निजांगे | समाधान मायकरी ||३५||
सगुणसृष्टी सगुणदेव | भावे मानिले स्वयमेव ।
भेदाभेद पहाती जीव | सोहं शिवा विसरले ||३६||
माजेल वादाचा पाल्हाळ | दुर्गा भगवती गुण वेल्हाळ |
आमंगळासी करिले मंगळ | कृपामृत दृष्टीने ||३७||
तुझे रूप ध्यानी मनी | शिरी मुकुट पंचफणी |
केस मोकळे सोडोनी | मान झुकविली उत्तरे ||३८||
कुंकुम लाविले स्वस्तीक | हरिंद्रा गुलाल बुक्का टिक |
वक्र भुवया सुरेख | धनुष्या कृती शोभती ||३९||
शंकरे चंद्रमा धरिला जटेत तोची | तुझिया मुकुटात |
दैत्यावरील क्रोध बहुत | शितल होण्या धरीला असे ||४०||
किंचित मुरडीले नाशिक | नथनी सर्जाची सुरेख |
गालावरी लावली टीक | दृष्ट सगुनीला होईल ||४१||
कर्णफुले शोभती छान | तांबुल विडामुखी धरून |
अलंकार गळा भरून | नाभिपर्यंत लोळतसे ||४२||
पुतळ्याची हौस भारी | ताईत पेट्या डोरले शिनगरी |
कंठा बोरमाळ गळसरी | महाराणी शोभतसे ||४३||
रंगारंगाच्या पैठण्या फार | नारळी जरतारी बुट्टेदार |
छातीवरी उभा पदर | गुर्जरनि माय माझी ||४४||
पायघोळ दिसे छान | शिंदेशाही तोडर घालोन |
सच्य चरण उचलोन | वाम पुढे टाकिला ||४५||
कमंडलुरुद्राक्ष माला | वामसव्य दोन्ही कराला |
सव्य हास्ती परशु धरीला | वाम लाविला मुकुटासी ||४६||
आणिक हस्त चतुर्दश | शस्त्रे धरिले बहुवश |
दृष्टदानव दंडनास | वर्णिता विस्तार वाढेल ||४७||
आश्विन शुद्ध कोजागिरी | श्रुंगार पुजा षोडशोपचारी |
महापूजा रात्रभरी | नामगजरी कल्लोळ ||४८||
कोजागिरीचे चंद्रामृत | रम्य वनश्री डोलत |
वैकुंठ कैलास भासत | भाविक भक्ता स्वानंद ||४९||
वनस्पती सिद्ध सोज्वळ | धरूजाता होतसे ज्वाळ |
संधीनी संजीवानी कोमल मृतजीवा उठविती ||५०||
गळसरीची प्रदक्षिणा | सोपी आते बहुजना |
आखतिर्थी प्रदक्षिणा | आष्टतिर्थ दर्शन ||५१||
सूर्यतीर्थ कालिका तिर्थ | गंगा लक्ष्मी सरस्वती तिर्थ |
तांबुल यमुना शितला तिर्थ | स्नाने पापे नासती ||५२||
तिसरी महा प्रदक्षिणा | सुरथराजा वैश्यस्थाना |
वणी मार्कंडेया सहजाना | गणती तिन योजने ||५३||
कृतयुगी ब्रम्हा सांगे नारदा | सिद्धीदायक भक्त वरदा |
कालिका लक्ष्मी शारदा | जगदंबीका हिच पै ||५४||
ममकमंडलु पासून निघाली | गिरीजा तीच गीरणा नाम पावली |
महानदित मुख्य जहाली | पर्वता सन्नीध वहातसे ||५५||
ऐसा या अर्धपीठाचा महिमा | नित्य जपावे बत्तीस नामा |
दुर्गभीमा दुर्गाभामा | दुर्गमात्मस्वरूपिणी ||५६||
दुर्गा दुर्गा र्तीशमनी | दुर्गमा दुर्गपद्वी निवारीनी |
दुर्गमच्छेदिनी | दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी | दुर्गभ्या ||५७||
दुर्गतोध्वारिनी दुर्गनिहंत्री | दुर्गमापहा दुर्गमासुर सहंत्री |
कलीयुगी नाममंत्री | उद्धरतिल मानव ||५८||
दुर्गमज्ञानदा दुर्गमार्ग स्वरुपिनी | दुर्गभा दुर्गमायुधधारिणी |
दुर्गमालोका दुर्गमार्थ स्वरुपिनी | दुर्गदैत्य लोक दवानला ||५९||
दुर्गमार्गप्रदा दुर्गमाश्रीता | दुर्गमविद्या दुर्गमता |
दुर्गमांगी आंबामाता | दुर्गमज्ञान संस्थाना ||६०||
दुर्गभ्या दुर्गमेश्वरी दुर्गभात्रिभुवना माझारी |
नाम पठणे संकटे निवारी | दुर्गदारिणी भगवती ||६१||
नामस्मरणी ठेवुन विश्वास | त्रिकाल जपावे बत्तीस नामास |
निर्विघ्न करील भक्तास | सप्तश्रुंगी निवासिनी ||६२||
भक्तिसाधन नामची श्रेष्ठ | नचसाधती जपतपाचे कष्ट |
नाम महिमा वरिष्ठ | कलीयुगा माझारी ||६३||
तनमन धनेची शरण | धरावे आंबेची चरण |
त्रिविध ताप दारूण | निवारील निश्चये ||६४||
निष्काम करिता भक्ती | आंगीबाने चैतन्य शक्ती |
चौ पुरुषार्थ चारीमुक्ती | वोळंगती सर्वस्वे ||६५||
अमृत मोहिनी निवासी | महालयाच्या पंचक्रोसि |
एक योजने दक्षिणेसी | जन्मभूमी कारेगाव ||६६||
प्रतिष्ठान निवासी एकनाथ | मासिक वारी पिता करीत |
नाथ कृपेने जन्म होत | देहनाम निवृत्ती ||६७||
माता माझी राधाबाई | मुखी नाम आंबाबाई |
बालपणी मंत्र देई | तोची लोलो लागला ||६८||
सप्तश्रुंग दुर्गामाई | तुझी लीला तुची वदवी |
भरून उरली सर्वाठाई | मी तव अज्ञान बालक ||६९||
श्रोतया विनवी भक्तकवी | चुकी भुली पदरात घ्यावी |
बहुश्रुत अनुभवी | नमन माझे साष्टांग ||७०||
इतिश्री पद्म पुराणांतरगत | वर्णिली सह्याद्री खंडात |
मार्कंडेय सप्तशतीत | सविस्तर कथियेले ||७१||
तया आधारे वर्णन केले | भक्ती भावे श्रुंगारीले |
श्रीजगदंबे चरणी वाहिले | भक्ता मुखी वदवावे ||७२||
|| श्रीजगदंबार्पणमस्तु ||
असा असतो आषाढी वारीचा सोहळा
🚩 हेचि घडो मज जन्मजन्मांतरी । मागणे श्रीहरी नाही दुजे ।। आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या, की वारी संप...
-
गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान, टिंगरी ते गाळणे रोड, टिंगरी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक Shreepad ShreeVallabh Temple, Galne ro...
-
आज २१ मार्च म्हणजे जागतिक कविता दिवस ! सर्व कवींना आणि काव्यप्रेमींना जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जगातील काव्यात्मक अभिव्यक्त...
-
आदिमाया भगवती सप्तश्रृंगी देवीचा महिमा विजयादशमी अर्थात दसरा. याच दिवशी आदिमाया जगदंबेने महिषासूराचा वध करुन सर्वसामान्यांना त्याच्या अत्या...





























