Monday, 31 August 2026

नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिराची कहाणी.

 आज तिसरा श्रावणी सोमवार. आज जाणून घेऊया नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिराची कहाणी.


श्री कपालेश्वर मंदिर हे त्रैलोक्यातील एकमेव शिवमंदिर आहे , जिथे शिवलिंगासमोर नंदी नाही. कपालेश्वर मंदिर हे नाशिक शहरातील पंचवटी भागात, पवित्र गोदावरी नदीच्या व रामकुंडाच्या अगदी समीप वसलेले एक अतिप्राचीन शिवमंदिर आहे. त्र्यंबकेश्वर हे जसे नाशिकचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते, तसेच कपालेश्वर हे नाशिकमधील सर्वांत पूजनीय व जागृत शिवस्थान मानले जाते.


या मंदिराचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य म्हणजे — इथे शिवलिंगासमोर नंदीची मूर्ती नाही. सर्वसाधारणपणे कोणत्याही शिवमंदिरात प्रथम नंदीचे दर्शन घेऊन, त्याच्या दोन शिंगांमधून शिवलिंगाचे दर्शन घेण्याची प्रथा असते. कपालेश्वर मंदिर या नियमाला अपवाद असल्यामुळे त्याला 'त्रैलोक्यातील एकमेव मंदिर' असे संबोधले जाते.

पद्मपुराणात व स्थानिक परंपरेत कपालेश्वर नावामागील आणि नंदीच्या अनुपस्थितीमागील कथा वेगवेगळ्या प्रकारे वर्णिल्या आहेत. एका आख्यायिकेनुसार, या दुर्मिळ मंदिराची कथा प्राचीन काळातील सर्वात आदरणीय ऋषींपैकी एक असलेल्या मार्कंडेय ऋषींनी पद्मपुराणात सांगितली आहे. भगवान ब्रह्मदेवाला पाच मुखे होती. त्यापैकी चार मुखे वेदांचे पठण करण्यासाठी वापरली जात , तर पाचवे मुखे अनेकदा भगवान विष्णूवर टीका करत असे. एका दिव्य सभेत, जेव्हा ब्रह्मदेवाने विष्णू आणि शिव दोघांचाही अपमान करण्यास सुरुवात केली, तेव्हा भगवान शिव क्रोधित झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचे शस्त्र हिसकावून घेतले आणि आपल्या करंगळीच्या नखाने पाचवे मुंडके कापले. तथापि, या कृत्यामुळे त्यांना ब्रह्महत्येचे पातक लागले आणि ते कपाल त्यांच्या हातालाच चिकटून राहिले. 

या पापाच्या परिमार्जनासाठी शिवशंकर हातात कपाल घेऊन कपाली (भिक्षाटन करणारा योगी) वेशात तीर्थाटन करू लागले. पौराणिक परंपरेनुसार अनेक तीर्थक्षेत्रांतून भ्रमण करत असताना, आपल्या यात्रेदरम्यान, भगवान शिव नाशिक येथे पोहोचले. या ठिकाणी त्यांनी एका ब्राह्मणाच्या घरी विश्रांती घेण्याचे ठरवले. विश्रांती घेत असताना, भगवान शिवांनी एका गायीचे आणि तिच्या वासराचे संभाषण ऐकले; ते वासरू म्हणजे नंदीचाच पुनर्जन्म होता. वासराने आपल्या आईला सांगितले की या ब्राह्मणाने त्याचा छळ केला होता आणि तो त्याचा बदला घेईल. त्याच्या आईने त्याला बजावले की ब्राह्मणाला मारणे हे मोठे पाप आहे — ब्रह्महत्या . वासराने उत्तर दिले की भगवान शिवांनीही तेच पाप केले आहे, पण ते त्याचे प्रायश्चित्त करण्याचा मार्ग नक्कीच शोधतील. हे ऐकून, भगवान शिवांना जाणीव झाली की त्यांच्या स्वतःच्या तपश्चर्येचा उलगडा लवकरच होणार आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी, नंदीने त्या ब्राह्मणावर हल्ला करून त्यांना ठार मारले आणि ब्रह्महत्या केली . स्वतःला शुद्ध करण्यासाठी, नंदीने पंचवटी येथील पवित्र गोदावरी नदीत स्नान केले. पाण्यातून बाहेर आल्यावर, त्याचा काळा रंग पुन्हा दुधाळ पांढरा झाला — हे त्याचे पाप क्षमा झाल्याचे चिन्ह होते. हे पाहून, भगवान शिवानेही शुद्धीकरणाचा तोच मार्ग अवलंबला आणि याच स्थानी गोदावरी व रामकुंडाच्या पवित्र जलात स्नान केल्यानंतर व रामकुंडाशेजारी असलेल्या टेकडीवर तप  केल्यानंतर  त्यांना ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्ती मिळाली. शिवशंकरांच्या हातातील कपाल गळून पडले, आणि त्याच पुण्यक्षणी हे स्थान 'कपालेश्वर' म्हणून पावन झाले — ही या मंदिराच्या नावामागील मूळ कथा आहे.

असे मानले जाते की, स्वतः भगवान विष्णूंनी येथे शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याचे नाव 'कपालेश्वर' ठेवले, ज्याचा अर्थ 'ज्याने मस्तक (कपाल) काढले तो देव' असा होतो. नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिरात प्रार्थना केल्याने पापांचे क्षालन होते आणि आत्म्याला मोक्षाकडे - म्हणजेच अंतिम मुक्तीकडे - नेले जाते, असे म्हटले जाते.

नंदी येथे 'वाहन' नव्हे, तर 'गुरु' का?

नंदीच्या अनुपस्थितीबाबत स्थानिक परंपरेत एक स्वतंत्र कथा सांगितली जाते. शंकरांना ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होण्याचा मार्ग स्वतः महानंदीने सुचवला, असे मानले जाते — त्यांनीच शंकरांना नाशिकच्या रामकुंडात स्नान करण्याचा सल्ला दिला. या उपकाराच्या कृतज्ञतेपोटी भगवान शंकरांनी नंदीला येथे 'वाहन' किंवा 'सेवक' म्हणून नव्हे, तर गुरुस्थान बहाल केले. गुरु हा शिष्यासमोर सेवक म्हणून उभा राहत नाही, या तत्त्वानुसार कपालेश्वर मंदिरात शिवलिंगासमोर नंदीची स्वतंत्र मूर्ती स्थापित केलेली नाही — ही या मंदिराची जगावेगळी ओळख आहे.

या कथेला जोडूनच आणखी एक आख्यायिका सांगितली जाते, ज्यात सोमेश्वर परिसरात गाय व वासराच्या घटनेतून शंकरांवर गोहत्येचा प्रसंग ओढवल्याचा उल्लेख येतो — त्यानंतर नंदीनेच शंकरांना नाशिकला येऊन गोदावरीत स्नान करण्यास सुचवले, असाही एक पाठभेद प्रचलित आहे. अशा प्रकारे कथेच्या वेगवेगळ्या रूपांतही नाशिक व गोदावरी-स्नान हा मुक्तीचा गाभा कायम राहतो.

कपालेश्वर मंदिराचा नेमका स्थापनाकाळ निश्चित करणारा एकसंध ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाही, परंतु काही ठोस खुणा व नोंदी या मंदिराच्या प्राचीनतेला पुष्टी देतात.


शिलालेखीय पुरावा : कळसाजवळील देवनागरी शिलालेख

मंदिरात पारंपरिक मराठा स्थापत्यशैलीतील नक्षीकाम व शिल्पकला पाहायला मिळते. मंदिराच्या कळसाजवळ 'श्री गणेशाय नमः श्री कपालेश्वर' असा देवनागरी लिपीतील शिलालेख कोरलेला आढळतो. या लिपीच्या वळणावरून व अक्षररचनेवरून तो जुन्या काळातील असल्याचे अभ्यासक सांगतात — हा या मंदिराच्या प्राचीनतेचा एक प्रत्यक्ष, जागेवर उपलब्ध असलेला पुरावा आहे.

या मंदिराची मूळ रचना आणि स्थापत्यशैली यादव कालखंडातील (अंदाजे ११ वे ते १३ वे शतक) असल्याचे दिसून येते. त्यापूर्वीही येथे महादेवाची पिंड अस्तित्वात होती. स्थानिक मान्यतेनुसार इ.स. सुमारे ११०० च्या दरम्यान तत्कालीन गवळी राजाने सुमारे पाच हजार रुपये खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला, असे सांगितले जाते. गवळी राजसत्तेसंबंधीचे ऐतिहासिक तपशील तुलनेने अपुरे असल्याने ही नोंद परंपरागत मानली जाते.

ऐतिहासिक संदर्भानुसार , इ.स. १६८० मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या एका सरदाराने या मंदिराचे नुकसान केले होते. पुढे इ.स. १७३८ मध्ये स्थानिक लोक व कोळी समाजाने पुढाकार घेऊन ५ हजार रुपये खर्च करत भग्न झालेल्या मंदिरात सुधारणा केल्या आणि पूजाविधीसाठी 'शैव-गुरवांची' नेमणूक केली. त्यानंतर नाशिक मराठा साम्राज्यात सामील झाल्यानंतर या मंदिराला भव्य स्वरूप मिळाले. सरदार जगजीवनराव पवार यांनी १० हजार रुपये खर्च करून मंदिराचा मुख्य सभामंडप  बांधला, तर त्यांचे नातेवाईक कृष्णाजी पवार पाटील यांनी १५ हजार रुपये खर्च करून मंदिराच्या भव्य दगडी पायऱ्या बांधल्या. 

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (२०२६-२०२७) पार्श्वभूमीवर सध्याच्या मंदिर प्रशासनाकडून सध्या कपालेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे.

गर्भगृहातील शिवलिंग आकाराने लहान असूनही अत्यंत जागृत मानले जाते. मंदिर पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत भाविकांसाठी खुले असते; पहाटेची पूजा-अभिषेक-आरती आणि सायंकाळची आरती अशा दोन प्रमुख नित्यविधी येथे पार पडतात.

या मंदिराचे आणखी एक वैशिट्य म्हणजे श्री कपालेश्वराचा 'पंचमुखी मुखवटा. पालखीसोहळ्यात मिरवला जाणारा हा आगळावेगळा पंचमुखी मुखवटा अत्यंत तेजस्वी भासतो. शिवशंकराच्या पाच मुखांच्या जटामुकुटात गंगा विराजमान आहे. तिच्या शिरावर पंचमुखी नागराजांनी आपली छत्रछाया धरली आहे. 

या मुखवट्याच्या निर्मितीची कथा मोठी अद्भुत आहे. नाशिकच्या जुन्या तांबट आळीत रहाणारे दादा उमाशंकर वैद्य  हे निस्सीम शिवभक्त. कपालेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा. एकदा त्यांना कपालेश्वराचा द्रुष्टांत झाला. त्यानुसार त्यांनी कपालेश्वर चरणी चांदीचा मुखवटा अर्पण करण्याचे ठरवले. ही गोष्ट १८९३ सालची. सोनार  समाजातील तत्कालीन कसबी सुवर्णकार श्री रामचंद्र रावजी इंदोरकर यांच्याकडे हे  काम सोपवण्यात आले. आपले सर्व कसब कारागीरी  पणाला लावुन त्यांनी हा पंचमुखी शिवाचा मुखवटा घडवला. आणि त्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा तो कपालेश्वर पालखीत मिरवण्यात आला.

तेव्हापासून श्रावणी सोमवार, महाशिवरात्री आणि सोमवती अमावस्या या महापर्व कालात वैद्य कुटुंबाकडे असलेला मुखवटा भगवान कपालेश्वराच्या पालखीत मिरवला जातो. वंशपरंपरेने या पालखी सोहळ्याचा खर्च आणि परंपरा वैद्य कुटुंबाकडे राहील हेही तेव्हाच ठरवण्यात आले. वैद्य कुटुंबीयांनी दादा उमाशंकरांची ही परंपरा निष्ठेने पुढे चालु ठेवली आहे. 

कै. दादाजी उमाशंकर वैद्य यांनी ६ नोव्हेंबर १८९३ रोजी धनोत्रयोदशीला दि कपालेश्वर पालखी प्रोसेशन ट्रस्टची स्थापना केली. तेव्हापासून वैद्य कुटुंबीयांकडे पंचमुखी सेवेचा वारसा लाभला आहे. सदरचा पंचमुखी महादेवाचा मुखवटा वर्षभरातील सर्व सोमवती अमावस्या, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो. त्यानंतर विधीवत पूजा आणि श्रुंगार करून सवाद्य पालखी सोहळा संपन्न होत असतो.


असे हे आगळेवेगळे दुर्मिळ नंदी विरहीत शिव मंदिर.





































 

Wednesday, 26 August 2026

मनमाड रेल्वे स्थानकाचा दुर्मिळ जुना फोटो.

 मनमाड रेल्वे स्थानकाचा एक दुर्मिळ जुना फोटो.




हे इसवी सन १९३० साली काढलेले जुने छायाचित्र मनमाड रेल्वे स्थानकाच्या इतिहासातील एक अनमोल क्षण जपून ठेवते.
फलकावर दिसणारे “MANMAD” हे नाव आणि त्याखाली नमूद केलेली समुद्रसपाटीपासूनची उंची, बाजूला उभे असलेले प्रवासी, हमाल, मालाच्या गाठोड्यांनी भरलेली हातगाडी आणि सावली देणारी भलीमोठी झाडे—हे दृश्य आपल्याला एका वेगळ्याच काळात घेऊन जाते.
त्या काळात रेल्वे स्थानक म्हणजे केवळ प्रवासाचे ठिकाण नव्हते; ते गाव-शहरांना जोडणारे, व्यापाराला चालना देणारे आणि असंख्य माणसांच्या आयुष्याच्या कथा एकत्र आणणारे केंद्र होते.
आज मनमाड स्टेशन पश्चिम भारतातील सर्वात महत्वाचे जंक्शन आहे. मात्र तीनशे वर्षांपूर्वी ते एक लहानसे खेडे होते. जवळच अनकाई टणकाई हे यादवकालीन किल्ले व लेण्या आहेत. यादवांच्या काळात उत्तरेकडे कान्हदेशा म्हणजेच खान्देशात जाण्यासाठीचा रस्ता ह्या दोन किल्ल्यांच्या मघोमध असलेल्या दरीतून जातो. दक्षिणेकडे पुण्याकडे जाणारा एकमेव मार्गही ह्याच दोन किल्ल्यांच्या मधून जाणाऱ्या रस्त्यातून जातो. त्याच रस्त्यावर "मनमाडी" नावाचे हे जुने खेडे होते.
ब्रिटिशांनी ह्याच पठाराची निवड रेल्वेचे जंक्शन निर्माण करताना केली. मुंबई ते मनमाड, मनमाड ते हैदराबाद, मनमाड ते आग्रा, मनमाड ते दौंड असे चार रेल्वेमार्ग एकाच स्टेशनला जोडण्यात आले आणि ह्या लहानश्या हिलस्टेशनची भरभराट सुरू झाली. ह्या स्टेशनला मनमाड असे नाव ब्रिटिशकाळी पडले. ह्याच काळात शेकडो पंजाबी लोकांनी मनमाड शहरात वास्तव्य केलं. भारतातील तिसरा सर्वात मोठा गुरुद्वारा गुपतसर इथे उभा आहे. ह्या पंजाबातील शीख बांधवांचे हजारो मराठी वंशज आजही मनमाडमध्ये पंजाबी-मराठी ही ओळख घेऊन राहतात.
मोठ्या रेल्वेस्टेशनमुळे भारत सरकारने मनमाडमध्ये धान्य गोदाम तयार केले. हे त्याकाळात आशिया खंडातील सर्वात मोठे धान्य गोदाम होते. मनमाडजवळील थंब्सअप चा आकार असलेला डोंगर जगप्रसिद्ध आहे. ह्या डोंगरावर अंगठ्याच्या आकाराचा सुळका आहे. स्थानिक लोक ह्याला हडबीची शेंडी म्हणून ओळखतात.

Monday, 24 August 2026

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग — बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग

 त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग — बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग, जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकाच लिंगात एकवटले आहेत —


पौराणिक कथा, ऐतिहासिक नोंदी आणि पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे मांडलेला सखोल आढावा. 

त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक या छोट्याशा गावात, ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले शिवमंदिर आहे. भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी (भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर) एक आहे.

या स्थानाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे — भारतातील पवित्र गोदावरी नदीचा उगम येथील ब्रह्मगिरी पर्वतावर मानला जातो, ज्यामुळे या क्षेत्राला केवळ शैव नव्हे, तर नदी-तीर्थ म्हणूनही विशेष स्थान प्राप्त झाले आहे. गावाभोवती ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि गंगाद्वार अशा तीन टेकड्या असून, प्रत्येकीशी वेगळी पौराणिक कथा व देवता जोडलेली आहे.

पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात “ब्रह्मगिरी पर्वत” नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एके काळी गौतम ऋषींचा आश्रम होता. 


शिवपुराण व स्कंदपुराणातील नाशिक-कौशिकी खंडात या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमागील कथा तपशीलवार वर्णिली आहे. या पौराणिक  आख्यायिकेनुसार, एकेकाळी ब्रह्मगिरी परिसरात महर्षी  गौतम  आपल्या पत्नी अहिल्येसह तपोवनात वास्तव्य करत होते. या तपोवनात राहणाऱ्या इतर ऋषींच्या पत्नींना गौतम ऋषींच्या तपस्येचा व समृद्धीचा हेवा वाटू लागला. त्यांनी कपटाने गौतम ऋषींवर गोहत्येचा (गाईच्या हत्येचा) आळ घेतला — एक भ्रामक गाय निर्माण करून तिला गौतम ऋषींच्या हातून मारवले गेले, असा कट रचला गेला.

या कथित पापाचे परिमार्जन करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर कठोर तपश्चर्या आरंभली. भगवान शंकर त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. गौतम ऋषींनी दोन गोष्टी मागितल्या — एक, आपल्या जटांमधील पवित्र गंगा नदी (जी पुढे गोदावरी  अथवा गौतमी नावाने ओळखली गेली) येथे प्रवाहित व्हावी, जेणेकरून मृत गाय  गंगेच्या जलधारांनी जिवंत होईल , आणि दोन, शंकरांनी स्वतः याच स्थानी कायमचे वास्तव्य करावे. भगवान शिवांनी दोन्ही विनंत्या मान्य करून येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थिरावण्याचे मान्य केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. — तीच जागा आजचे त्र्यंबकेश्वर.

गौतम ऋषींच्या तपाने गंगेला धरतीवर आणले, आणि त्याच पुण्यभूमीत शिवाने स्वतःला ज्योतिर्लिंगाच्या रूपात बद्ध करून घेतले — ही या क्षेत्राची मूळ कथा आहे.

त्र्यंबकेश्वर हे नाव संस्कृत  त्रि-अंबक (तीन नेत्र असलेला) या शब्दावरून आले आहे. गर्भगृहातील लिंग इतर ज्योतिर्लिंगांहून वेगळे आहे — येथे एका खळग्यात तीन लहान सुपारीच्या आकाराचे नैसर्गिक स्वयंभू लिंगे स्पष्ट दिसतात, जी  ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक मानली जातात. भाविकांच्या मते या लिंगांतून सतत जलबिंदू झिरपत राहतात — हे या स्थानाचे एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे.

पौराणिक कथांच्या पलीकडे, सध्याच्या मंदिर वास्तूला ठोस ऐतिहासिक व पुरातत्वीय आधार आहे — बांधकामाच्या नोंदी, दानपत्रे आणि अलीकडील उत्खनन-संवर्धन कार्यातून हे स्पष्ट होते. 

सध्याचे भव्य मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांनी बांधले. काम इ.स. १७५५ मध्ये सुरू होऊन तब्बल ३१ वर्षांनी १७८६ मध्ये पूर्ण झाले. त्या काळात अंदाजे १६ लाख रुपये खर्च आल्याची ऐतिहासिक नोंद आहे. सह्याद्रीच्या घडीव काळ्या पाषाणात (बेसाल्ट) कोरलेले हे बांधकाम मराठा-पेशवेकालीन मंदिर-स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानले जाते.



हे मंदिर भूमिज शैलीमध्ये बांधलेले असून, दाक्षिणात्य शैलीच्या चार प्रवेशद्वारे असलेल्या तटबंदीमध्ये पूर्व दिशेकडे तोंड केलेले आहे. मंदिराची रचना नंदीमंडप, अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. काळ्या पाषाणाच्या जाळीदार गवाक्ष असलेल्या नंदीमंडपात संगमरवरी नंदी मूर्ती बसवण्यात आलेली आहे.

मंदिर चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंद केलेल्या विस्तीर्ण आवारात उभे आहे.  गर्भगृहातील त्रिमूर्ती-लिंगाच्या पूर्वेस पार्वतीदेवीची संगमरवरी मूर्ती आहे, तर प्रवेशाशी शुभ्र संगमरवरातील नंदी विराजमान आहे. सर्वसामान्य भाविकांना गर्भगृहाबाहेरून दर्शन घेता येते; विशेष पूजा करणाऱ्यांनाच आत प्रवेश दिला जातो. 

मंदिराच्या भिंती अष्टदिक्पाल आणि इतर देवतांच्या सुबक शिल्पांनी समृद्ध आहेत. सभामंडपात देवकोष्ठात उमा महेश, महिषासुरमर्दिनी, वीरभद्र, विष्णू इ च्या मुर्त्या आहेत. अंतराळाच्या वितानावर मल्लयुद्ध खेळताना कुस्तीगीर कोरलेले आहेत. तर गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजू शैव द्वारपाल, तपस्वी, विविध वाद्ये वाजविणारे कलाकार व व्याल आणि शुक यांच्या शिल्पाकृतींनी अलंकृत केलेल्या आहेत. 


मंदिराच्या फरसबंदी आवारात नैऋत्येला एक बांधीव कुंड आहे. त्याला 'अमृतकुंड' नावाने ओळखले जाते. या कुंडातील पाणी  श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पूजेसाठी व अभिषेकासाठी वापरले जाते.







मंदिरातील शिवमूर्तीच्या अलंकरणासाठी जगप्रसिद्ध 'नासिक डायमंड' वापरण्यात आल्याची नोंद आहे. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (१८१७–१८१८) ब्रिटिशांनी मंदिराची लूट केली, त्यात हा हिरा घेऊन गेले. पेशव्यांचे सरदार अण्णासाहेब विंचूरकर यांनी मंदिराला सुवर्णकळस व पंचधातूचा ध्वज अर्पण केल्याचीही ऐतिहासिक नोंद मिळते.

पेशव्यांनी बांधलेले सध्याचे मंदिर उभारण्यापूर्वी याच जागी एक जुने शिवालय अस्तित्वात होते, असे अनेक ऐतिहासिक व स्थानिक संदर्भ सांगतात. मराठी परंपरेनुसार हे मूळ मंदिर दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ  या शिवभक्त राजाने उभारले होते — झंझ राजाने कोकण व उत्तर महाराष्ट्र भागात अनेक शिवमंदिरे बांधल्याची नोंद परंपरेत आढळते. पुढे मुघल आक्रमणांच्या (औरंगजेबाच्या दख्खन मोहिमांच्या) काळात हे जुने मंदिर उद्ध्वस्त झाल्याचे मानले जाते, आणि त्यानंतर सुमारे शतकभराने नानासाहेब पेशव्यांनी १७५५ मध्ये सध्याच्या भव्य मंदिराचे बांधकाम हाती घेतले.

कालरेषा — ठळक ऐतिहासिक टप्पे 

प्राचीन काळ : गोदावरी नदीचे उगमस्थान व शैव तीर्थक्षेत्र म्हणून पौराणिक व साहित्यिक उल्लेख; परिसरातील गुंफा-स्थापत्य (पांडवलेणी) इ.स.पूर्व काळातील अस्तित्वाचा पुरावा देते.

इ.स. १० वे शतक (परंपरागत) : शिलाहार राजा झंझ याने या स्थानी मूळ शिवालय उभारल्याची स्थानिक परंपरा — निश्चित शिलालेखीय पुराव्याअभावी हा दावा पारंपरिक मानला जातो.

मुघल काळ : औरंगजेबाच्या दख्खन मोहिमांदरम्यान जुने मंदिर उद्ध्वस्त झाल्याचे मानले जाते; पुढील शतकभर हे स्थान जीर्णावस्थेत राहिले. 

इ.स. १७५५–१७८६ : नानासाहेब पेशव्यांच्या पुढाकाराने सध्याच्या काळ्या पाषाणातील भव्य मंदिराचे बांधकाम — सुमारे ३१ वर्षांचा कालावधी.

१८१७–१८१८ : तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धादरम्यान मंदिराची लूट; नासिक हिरा या घटनेत नेला गेल्याची नोंद.

वर्तमान काळ: श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून मंदिराचे व्यवस्थापन; ASI कडून सुरू असलेले संवर्धन कार्य 


कालसर्प दोष व नारायण-नागबली  या पूजाविधींसाठी त्र्यंबकेश्वर देशभरातून भाविकांना आकर्षित करते.

सिंहस्थ कुंभमेळा — नाशिक-त्र्यंबकेश्वर हे बारा वर्षांतून एकदा भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे एक प्रमुख केंद्र आहे.

आदि शंकराचार्यांचा संबंध — अनेक परंपरांनुसार आदि शंकराचार्यांनी या क्षेत्राला भेट देऊन नजीक मठाची स्थापना केल्याचे मानले जाते.























































नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिराची कहाणी.

 आज तिसरा श्रावणी सोमवार. आज जाणून घेऊया नाशिकच्या श्री कपालेश्वर मंदिराची कहाणी. श्री कपालेश्वर मंदिर हे त्रैलोक्यातील एकमेव शिवमंदिर आहे ,...