Wednesday, 26 August 2026

मनमाड रेल्वे स्थानकाचा दुर्मिळ जुना फोटो.

 मनमाड रेल्वे स्थानकाचा एक दुर्मिळ जुना फोटो.




हे इसवी सन १९३० साली काढलेले जुने छायाचित्र मनमाड रेल्वे स्थानकाच्या इतिहासातील एक अनमोल क्षण जपून ठेवते.
फलकावर दिसणारे “MANMAD” हे नाव आणि त्याखाली नमूद केलेली समुद्रसपाटीपासूनची उंची, बाजूला उभे असलेले प्रवासी, हमाल, मालाच्या गाठोड्यांनी भरलेली हातगाडी आणि सावली देणारी भलीमोठी झाडे—हे दृश्य आपल्याला एका वेगळ्याच काळात घेऊन जाते.
त्या काळात रेल्वे स्थानक म्हणजे केवळ प्रवासाचे ठिकाण नव्हते; ते गाव-शहरांना जोडणारे, व्यापाराला चालना देणारे आणि असंख्य माणसांच्या आयुष्याच्या कथा एकत्र आणणारे केंद्र होते.
आज मनमाड स्टेशन पश्चिम भारतातील सर्वात महत्वाचे जंक्शन आहे. मात्र तीनशे वर्षांपूर्वी ते एक लहानसे खेडे होते. जवळच अनकाई टणकाई हे यादवकालीन किल्ले व लेण्या आहेत. यादवांच्या काळात उत्तरेकडे कान्हदेशा म्हणजेच खान्देशात जाण्यासाठीचा रस्ता ह्या दोन किल्ल्यांच्या मघोमध असलेल्या दरीतून जातो. दक्षिणेकडे पुण्याकडे जाणारा एकमेव मार्गही ह्याच दोन किल्ल्यांच्या मधून जाणाऱ्या रस्त्यातून जातो. त्याच रस्त्यावर "मनमाडी" नावाचे हे जुने खेडे होते.
ब्रिटिशांनी ह्याच पठाराची निवड रेल्वेचे जंक्शन निर्माण करताना केली. मुंबई ते मनमाड, मनमाड ते हैदराबाद, मनमाड ते आग्रा, मनमाड ते दौंड असे चार रेल्वेमार्ग एकाच स्टेशनला जोडण्यात आले आणि ह्या लहानश्या हिलस्टेशनची भरभराट सुरू झाली. ह्या स्टेशनला मनमाड असे नाव ब्रिटिशकाळी पडले. ह्याच काळात शेकडो पंजाबी लोकांनी मनमाड शहरात वास्तव्य केलं. भारतातील तिसरा सर्वात मोठा गुरुद्वारा गुपतसर इथे उभा आहे. ह्या पंजाबातील शीख बांधवांचे हजारो मराठी वंशज आजही मनमाडमध्ये पंजाबी-मराठी ही ओळख घेऊन राहतात.
मोठ्या रेल्वेस्टेशनमुळे भारत सरकारने मनमाडमध्ये धान्य गोदाम तयार केले. हे त्याकाळात आशिया खंडातील सर्वात मोठे धान्य गोदाम होते. मनमाडजवळील थंब्सअप चा आकार असलेला डोंगर जगप्रसिद्ध आहे. ह्या डोंगरावर अंगठ्याच्या आकाराचा सुळका आहे. स्थानिक लोक ह्याला हडबीची शेंडी म्हणून ओळखतात.

Monday, 24 August 2026

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग — बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग

 त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग — बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग, जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकाच लिंगात एकवटले आहेत —


पौराणिक कथा, ऐतिहासिक नोंदी आणि पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे मांडलेला सखोल आढावा. 

त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक या छोट्याशा गावात, ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले शिवमंदिर आहे. भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी (भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर) एक आहे.

या स्थानाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे — भारतातील पवित्र गोदावरी नदीचा उगम येथील ब्रह्मगिरी पर्वतावर मानला जातो, ज्यामुळे या क्षेत्राला केवळ शैव नव्हे, तर नदी-तीर्थ म्हणूनही विशेष स्थान प्राप्त झाले आहे. गावाभोवती ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि गंगाद्वार अशा तीन टेकड्या असून, प्रत्येकीशी वेगळी पौराणिक कथा व देवता जोडलेली आहे.

पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात “ब्रह्मगिरी पर्वत” नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एके काळी गौतम ऋषींचा आश्रम होता. 


शिवपुराण व स्कंदपुराणातील नाशिक-कौशिकी खंडात या ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमागील कथा तपशीलवार वर्णिली आहे. या पौराणिक  आख्यायिकेनुसार, एकेकाळी ब्रह्मगिरी परिसरात महर्षी  गौतम  आपल्या पत्नी अहिल्येसह तपोवनात वास्तव्य करत होते. या तपोवनात राहणाऱ्या इतर ऋषींच्या पत्नींना गौतम ऋषींच्या तपस्येचा व समृद्धीचा हेवा वाटू लागला. त्यांनी कपटाने गौतम ऋषींवर गोहत्येचा (गाईच्या हत्येचा) आळ घेतला — एक भ्रामक गाय निर्माण करून तिला गौतम ऋषींच्या हातून मारवले गेले, असा कट रचला गेला.

या कथित पापाचे परिमार्जन करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर कठोर तपश्चर्या आरंभली. भगवान शंकर त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. गौतम ऋषींनी दोन गोष्टी मागितल्या — एक, आपल्या जटांमधील पवित्र गंगा नदी (जी पुढे गोदावरी  अथवा गौतमी नावाने ओळखली गेली) येथे प्रवाहित व्हावी, जेणेकरून मृत गाय  गंगेच्या जलधारांनी जिवंत होईल , आणि दोन, शंकरांनी स्वतः याच स्थानी कायमचे वास्तव्य करावे. भगवान शिवांनी दोन्ही विनंत्या मान्य करून येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थिरावण्याचे मान्य केले. गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. — तीच जागा आजचे त्र्यंबकेश्वर.

गौतम ऋषींच्या तपाने गंगेला धरतीवर आणले, आणि त्याच पुण्यभूमीत शिवाने स्वतःला ज्योतिर्लिंगाच्या रूपात बद्ध करून घेतले — ही या क्षेत्राची मूळ कथा आहे.

त्र्यंबकेश्वर हे नाव संस्कृत  त्रि-अंबक (तीन नेत्र असलेला) या शब्दावरून आले आहे. गर्भगृहातील लिंग इतर ज्योतिर्लिंगांहून वेगळे आहे — येथे एका खळग्यात तीन लहान सुपारीच्या आकाराचे नैसर्गिक स्वयंभू लिंगे स्पष्ट दिसतात, जी  ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतीक मानली जातात. भाविकांच्या मते या लिंगांतून सतत जलबिंदू झिरपत राहतात — हे या स्थानाचे एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे.

पौराणिक कथांच्या पलीकडे, सध्याच्या मंदिर वास्तूला ठोस ऐतिहासिक व पुरातत्वीय आधार आहे — बांधकामाच्या नोंदी, दानपत्रे आणि अलीकडील उत्खनन-संवर्धन कार्यातून हे स्पष्ट होते. 

सध्याचे भव्य मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांनी बांधले. काम इ.स. १७५५ मध्ये सुरू होऊन तब्बल ३१ वर्षांनी १७८६ मध्ये पूर्ण झाले. त्या काळात अंदाजे १६ लाख रुपये खर्च आल्याची ऐतिहासिक नोंद आहे. सह्याद्रीच्या घडीव काळ्या पाषाणात (बेसाल्ट) कोरलेले हे बांधकाम मराठा-पेशवेकालीन मंदिर-स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानले जाते.



हे मंदिर भूमिज शैलीमध्ये बांधलेले असून, दाक्षिणात्य शैलीच्या चार प्रवेशद्वारे असलेल्या तटबंदीमध्ये पूर्व दिशेकडे तोंड केलेले आहे. मंदिराची रचना नंदीमंडप, अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. काळ्या पाषाणाच्या जाळीदार गवाक्ष असलेल्या नंदीमंडपात संगमरवरी नंदी मूर्ती बसवण्यात आलेली आहे.

मंदिर चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंद केलेल्या विस्तीर्ण आवारात उभे आहे.  गर्भगृहातील त्रिमूर्ती-लिंगाच्या पूर्वेस पार्वतीदेवीची संगमरवरी मूर्ती आहे, तर प्रवेशाशी शुभ्र संगमरवरातील नंदी विराजमान आहे. सर्वसामान्य भाविकांना गर्भगृहाबाहेरून दर्शन घेता येते; विशेष पूजा करणाऱ्यांनाच आत प्रवेश दिला जातो. 

मंदिराच्या भिंती अष्टदिक्पाल आणि इतर देवतांच्या सुबक शिल्पांनी समृद्ध आहेत. सभामंडपात देवकोष्ठात उमा महेश, महिषासुरमर्दिनी, वीरभद्र, विष्णू इ च्या मुर्त्या आहेत. अंतराळाच्या वितानावर मल्लयुद्ध खेळताना कुस्तीगीर कोरलेले आहेत. तर गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजू शैव द्वारपाल, तपस्वी, विविध वाद्ये वाजविणारे कलाकार व व्याल आणि शुक यांच्या शिल्पाकृतींनी अलंकृत केलेल्या आहेत. 


मंदिराच्या फरसबंदी आवारात नैऋत्येला एक बांधीव कुंड आहे. त्याला 'अमृतकुंड' नावाने ओळखले जाते. या कुंडातील पाणी  श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पूजेसाठी व अभिषेकासाठी वापरले जाते.







मंदिरातील शिवमूर्तीच्या अलंकरणासाठी जगप्रसिद्ध 'नासिक डायमंड' वापरण्यात आल्याची नोंद आहे. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (१८१७–१८१८) ब्रिटिशांनी मंदिराची लूट केली, त्यात हा हिरा घेऊन गेले. पेशव्यांचे सरदार अण्णासाहेब विंचूरकर यांनी मंदिराला सुवर्णकळस व पंचधातूचा ध्वज अर्पण केल्याचीही ऐतिहासिक नोंद मिळते.

पेशव्यांनी बांधलेले सध्याचे मंदिर उभारण्यापूर्वी याच जागी एक जुने शिवालय अस्तित्वात होते, असे अनेक ऐतिहासिक व स्थानिक संदर्भ सांगतात. मराठी परंपरेनुसार हे मूळ मंदिर दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ  या शिवभक्त राजाने उभारले होते — झंझ राजाने कोकण व उत्तर महाराष्ट्र भागात अनेक शिवमंदिरे बांधल्याची नोंद परंपरेत आढळते. पुढे मुघल आक्रमणांच्या (औरंगजेबाच्या दख्खन मोहिमांच्या) काळात हे जुने मंदिर उद्ध्वस्त झाल्याचे मानले जाते, आणि त्यानंतर सुमारे शतकभराने नानासाहेब पेशव्यांनी १७५५ मध्ये सध्याच्या भव्य मंदिराचे बांधकाम हाती घेतले.

कालरेषा — ठळक ऐतिहासिक टप्पे 

प्राचीन काळ : गोदावरी नदीचे उगमस्थान व शैव तीर्थक्षेत्र म्हणून पौराणिक व साहित्यिक उल्लेख; परिसरातील गुंफा-स्थापत्य (पांडवलेणी) इ.स.पूर्व काळातील अस्तित्वाचा पुरावा देते.

इ.स. १० वे शतक (परंपरागत) : शिलाहार राजा झंझ याने या स्थानी मूळ शिवालय उभारल्याची स्थानिक परंपरा — निश्चित शिलालेखीय पुराव्याअभावी हा दावा पारंपरिक मानला जातो.

मुघल काळ : औरंगजेबाच्या दख्खन मोहिमांदरम्यान जुने मंदिर उद्ध्वस्त झाल्याचे मानले जाते; पुढील शतकभर हे स्थान जीर्णावस्थेत राहिले. 

इ.स. १७५५–१७८६ : नानासाहेब पेशव्यांच्या पुढाकाराने सध्याच्या काळ्या पाषाणातील भव्य मंदिराचे बांधकाम — सुमारे ३१ वर्षांचा कालावधी.

१८१७–१८१८ : तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धादरम्यान मंदिराची लूट; नासिक हिरा या घटनेत नेला गेल्याची नोंद.

वर्तमान काळ: श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून मंदिराचे व्यवस्थापन; ASI कडून सुरू असलेले संवर्धन कार्य 


कालसर्प दोष व नारायण-नागबली  या पूजाविधींसाठी त्र्यंबकेश्वर देशभरातून भाविकांना आकर्षित करते.

सिंहस्थ कुंभमेळा — नाशिक-त्र्यंबकेश्वर हे बारा वर्षांतून एकदा भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे एक प्रमुख केंद्र आहे.

आदि शंकराचार्यांचा संबंध — अनेक परंपरांनुसार आदि शंकराचार्यांनी या क्षेत्राला भेट देऊन नजीक मठाची स्थापना केल्याचे मानले जाते.























































मनमाड रेल्वे स्थानकाचा दुर्मिळ जुना फोटो.

  मनमाड रेल्वे स्थानकाचा एक दुर्मिळ जुना फोटो. हे इसवी सन १९३० साली काढलेले जुने छायाचित्र मनमाड रेल्वे स्थानकाच्या इतिहासातील एक अनमोल क्षण...