Showing posts with label कानेटकर. Show all posts
Showing posts with label कानेटकर. Show all posts

Saturday, 20 March 2021

वसंत कानेटकर जन्मशताब्दी

आज २० मार्च...
आज मराठीतील प्रतिभावंत व चतुरस्त्र नाटककार आणि साहित्यिक #वसंत_कानेटकर यांचा जन्मदिन. आजपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे.

वसंत कानेटकर यांचा जन्म २० मार्च १९२० साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या शहरात झाला. त्यांचे वडील शंकर केशव कानेटकर म्हणजे कवि गिरीश हे सुप्रसिद्ध रविकिरण मंडळातील कवि होते. त्यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले.

इंग्रजी विषय घेऊन एम. ए. पदवी मिळविल्यानंतर नाशिक येथे हंसराज प्रागजी ठाकरसी (एचपीटी) महाविद्यालयात सुमारे २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. विषयाचे सखोल ज्ञान, शिकवण्याची उत्कृष्ट हातोटी त्यामुळे विद्यार्थीप्रिय अशा कानेटकर सरांच्या वर्गात ज्यांचा तो विषय नाही असे विद्यार्थी सुद्धा त्यांचे लेक्चर ऐकायला त्या वर्गात बसत असत. अशा आठवणी आजही सरांबद्दल सांगितल्या जातात. २५ वर्षे अध्यापन केल्यानंतर नाट्यलेखनासाठी सरांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

नाटककार म्हणून ओळख असलेल्या कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कादंबरीपासूनच आपल्या लेखनाला सुरुवात केली. वि. स. खांडेकर यांचा सहवास मिळाल्याने साहित्याचा दर्जेदारपणा कळत नकळत रूजला गेला. नाशिकला आल्यावर कुसुमाग्रजांच्या सहवासातूनही त्यांच्यातील साहित्यिक आणखी फुलत गेला. ३० वर्षांच्या काळात त्यांनी सुमारे चाळीस नाटकं आणि काही एकांकिका रंगभूमीच्या ओटीत घातल्या. प्रेक्षकांची आवडनिवड जाणणारा एक प्रयोगशील नाटककार म्हणून ते लोकप्रिय होते.

प्रेक्षकांच्या मनोविश्वाचा ठाव घेणारी नाटके त्यांनी लिहिली. वेड्याचं घर उन्हात हे त्यांचे पहिले नाटक म्हणजे मनोविश्लेषणाचा एक नवीन प्रयोग होता. त्यानंतर देवांचं मनोराज्य, प्रेमा तुझा रंग कसा, रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड जाहली, मत्स्यगंधा, हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, कस्तुरीमृग, वादळ माणसाळतयं, अश्रूंची झाली फुले, मला काही सांगायचयं इ. अनेक नाटके त्यांनी लिहिली. विविध सामाजिक विषय आपल्या नाट्यकृतींतून त्यांनी परिणामकारक रीत्या हाताळले. मराठीतील ऐतिहासिक-पौराणिक नाटकांच्या क्षीण झालेल्या परंपरेचे त्यांनी रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, मत्स्यगंधा, मीरा-मधुरा आदी दर्जेदार नाटकांद्वारे पुनरूज्जीवन केले. मेलोड्रामाटीक, सुखात्मिका, ऐतिहासिक, पौराणिक, प्रायोगिक अशा सर्व प्रकारची नाटके कानेटकरानी लिहीली. त्यांनी चाळीस नाटके आणि अकरा विनोदी एकांकिका लिहून मराठी रंगभूमी गाजवली होती. तसेच त्यांनी पंख , घर , तेथे चल राणी , आणि पोरका ह्या कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांच्या नाटकांनी इतिहासच रचला नाही तर कलावंतांना नावलौकिकही मिळवून दिला.

त्यांच्या अश्रूंची झाली फुले गाजलेल्या नाटकावरून हिंदीमध्ये ' आसू बन गये फूल ' हा चित्र तयार झाला. त्यात अशोककुमार, निरुपा रॉय , प्राण आणि देब मुखर्जी या नामवंत कलाकारांनी काम केले होते. त्या चित्रपटाच्या कथेसाठी वसंत कानेटकर याना फिल्मफेअर अवॉर्डही मिळाले होते. त्यांची जवळजवळ सगळीच नाटके गाजली. त्यांच्या ओघवत्या लेखणीने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पाडली होती.

१९८८ मध्ये ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता. भारत सरकारने १९९२ मध्ये पद्मश्री ने त्यांना सन्मानित केले होते.

अशा सिद्धहस्त नाटककाराचे ३१ जानेवारी २००० रोजी नाशिक येथे निधन झाले.




सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...