Showing posts with label कोजागिरी. Show all posts
Showing posts with label कोजागिरी. Show all posts

Thursday, 29 October 2020

महत्व कोजागिरी पौर्णिमेचे

महत्व कोजागिरी पौर्णिमेचे

कोजागरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.
१. तिथी
कोजागरी पौर्णिमा हा उत्सव आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा करतात.

या वर्षी कोजागरी पौर्णिमा ३० ऑक्टोबर २०२० या दिवशी साजरी करा ! शुक्रवार, ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ नंतर ‘कोजागरी पौर्णिमा’ चालू होते. या वर्षी ‘अधिक आश्‍विन मास’ असल्याने निज आश्‍विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ आहे.

पौर्णिमा तिथी दोन दिवस असल्यास कोणत्या दिवशी कोजागरी पौर्णिमा साजरी करावी ?
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयसमयी असणारी तिथी ग्राह्य धरली जाते. हिंदु पंचांगानुसार आश्‍विन मासात मध्यरात्रीला असणार्‍या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी ३०.१०.२०२० या दिवशी सायंकाळी ५.४६ पासून ३१.१०.२०२० या रात्री ८.१९ वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी आहे. ३०.१०.२०२० या दिवशी मध्यरात्रीला पौर्णिमा असल्याने कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

 २. इतिहास
या दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात रासोत्सव साजरा केला, असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.
३. आश्‍विन पौर्णिमेच्या विविध नावांचा अर्थ
आश्‍विन पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’, ‘नवान्न पौर्णिमा’ किंवा ‘शरद पौर्णिमा’ या नावांनी ओळखले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होते, त्या दिवशी ‘नवान्न पौर्णिमा’ साजरी केली जाते.
अ. आश्‍विन पौर्णिमेला उत्तररात्री लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागत आहे ?’, असे विचारते; म्हणून या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ असे म्हणतात.
आ. आश्‍विन पौर्णिमेला शेतकरी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवीन धान्याची पूजा करून त्याचा नैवेद्य दाखवतात; म्हणून या पौर्णिमेला ‘नवान्न पौर्णिमा’ असे म्हणतात.
इ. आश्‍विन पौर्णिमा शरदऋतूत येते; म्हणून या पौर्णिमेला ‘शरद पौर्णिमा’ असे म्हणतात.
४. महत्त्व
अ. वर्षातील या दिवशी मूळ चंद्रतत्त्वाचे म्हणजे ‘चंद्रमा’चे प्रतिनिधित्व करणारा आणि आपल्याला दिसणारा चंद्र ‘चंद्रमा’प्रमाणेच शीतल आणि आल्हाददायक आहे. साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्वराच्या अवतारांपासून अनुभवता येते, म्हणूनच रामचंद्र, कृष्णचंद्र अशीही नावे राम-कृष्णांना दिली गेली. चंद्राच्या या गुणांमुळेच ‘नक्षत्राणामहं शशी’ म्हणजे ‘नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे’, असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत (१०:२१) सांगितले आहे.

आ. मध्यरात्री श्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारून जो जागा असेल, त्याला धनधान्याने संतुष्ट करते.
इ. या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्तीरूपी धारणेतील श्री लक्ष्मीरूपी इच्छाशक्तीची स्पंदने कार्यरत असतात. या दिवशी धनसंचयाविषयी असलेल्या सकाम विचारधारणा पूर्णत्वाला जातात. या धारणेच्या स्पर्शाने स्थूलदेह, तसेच मनोदेह यांची शुद्धी होण्यास साहाय्य होऊन मनाला प्रसन्नधारणा प्राप्त होते. या दिवशी कार्याला विशेष असे धनसंचयात्मक कार्यकारी बल प्राप्त होते.
ई. कोजागरी पौर्णिमेला वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या 
कोजागरीच्या रात्री जो जागृत आणि सावध असतो, त्यालाच अमृतप्राशनाचा लाभ मिळतो ! कोजागर · को ± ओज ± आगर. या दिवशी चंद्राच्या किरणांद्वारे सर्वांना आत्मशक्तीरूपी (ओज) आनंद, आत्मानंद, ब्रह्मानंद भरभरून मिळतो; परंतु हे अमृत प्राशन करण्यासाठी ऋषी म्हणतात, ‘को जागर्ति ?, म्हणजे कोण जागृत आहे ? कोण सावध आहे ? कोण याचे माहात्म्य जाणतो ? जो जागृत आणि सावध आहे आणि ज्याला याचे माहात्म्य ठाऊक आहे, त्यालाच या अमृतप्राशनाचा लाभ मिळेल !’ – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
६. उत्सव साजरा करण्याची पद्धत
‘या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे. या रात्री जागरण करतात. करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. दुसर्‍या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.
७. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी
लक्ष्मी आणि इंद्र यांचे पूजन करण्याची कारणे
अ. या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आग्रहात्मक आवाहन करतो.
आ. लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते.
८. लक्ष्मी आणि इंद्र यांचा पूजाविधी
अ. लक्ष्मी आणि इंद्र यांच्या पूजेत पोहे आणि नारळाचे पाणी वापरतात. पोहे हे आनंद देणारे, तर नारळाचे पाणी हे शीतलता प्रदान करणारे आहे. त्यामुळे हे दोन घटक वापरून जीव स्वतःकडे आनंद आणि शीतलता यांच्या लहरी आकर्षित करत असतो.
आ. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात; कारण या दिवशी दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे चंद्रतत्त्व आपल्याला मिळते. या दुधात स्थूल आणि सूक्ष्म रूपांतून चंद्राचे रूप अन् तत्त्व आकर्षित झालेले असते.
इ. जागरण : मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते आणि जो जागा असेल, त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपाशीर्वाद देऊन जाते. त्यामुळे कोजागरीच्या रात्री जागरण केले जाते.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
 ९. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पहाण्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
या दिवशी देवी लक्ष्मी आणि इंद्रदेवता यांचे पूजन करतात. यामुळे लक्ष्मीकृपेने सुखसमृद्धी प्राप्त होते. रात्री दुधात चंद्राचे दर्शन घेतल्याने चंद्राच्या किरणांच्या माध्यमातून अमृतप्राप्ती होते. याचे कारण ‘आश्‍विन पौर्णिमा’ अश्‍विनी नक्षत्रात चंद्र असतांना होते. अश्‍विनी नक्षत्राची देवता ‘अश्‍विनीकुमार’ आहे. अश्‍विनीकुमार सर्व देवतांचे चिकित्सक (वैद्य) आहेत. अश्‍विनीकुमारांच्या आराधनेमुळे असाध्य रोग बरे होतात. यामुळे वर्षातील इतर पौर्णिमांच्या तुलनेत आश्‍विन पौर्णिमेला चंद्रदर्शनाने त्रास होत नाही.
ज्योतिषशास्त्रात चंद्र ग्रहाला मनाचा कारक मानले आहे. त्यामुळे आपल्या मानसिक भावना, निराशा आणि उत्साह हे चंद्राशी संबंधित आहेत. यामुळे ज्यांच्या जन्मकुंडलीत चंद्रबळ न्यून असते, त्यांना पौर्णिमेच्या जवळपास मानसिक त्रास होण्याचे प्रमाण वाढते. ज्यांच्या जन्मकुंडलीत चंद्रबळ चांगले आहे, त्यांची पौर्णिमेचा चंद्र, चांदण्या, अशा वातावरणात प्रतिभा जागृत होते. त्यांना काव्य सुचते.
चंद्र हा ग्रह मातृकारक आहे, म्हणजे कुंडलीतील चंद्रावरून मातेचे सुख अभ्यासतात. आश्‍विन पौर्णिमेला चंद्राच्या साक्षीने माता आपल्या ज्येष्ठ अपत्याला कृतज्ञताभावाने ओवाळते; कारण प्रथम अपत्य जन्मानंतर स्त्रीला मातृत्वाचा आनंद प्राप्त होतो.’

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...