Wednesday, 29 December 2021

देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज पुण्यतिथी

आज मार्गशीर्ष वद्य एकादशी म्हणजे देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांची पुण्यतिथी 

देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज म्हणजे यशवंत महादेव भोसेकर यांच मुळ गाव पंढरपुर तालुक्यातील करमभोसे. लहानपणी यशवंत अभ्यासात हूशार. सुंदर हस्ताक्षर. त्यांच्या हूशारीवर पहिली नजर पडली ती त्यांच्या मामांची. यशवंत यांचे मामा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव इथे नोकरीस होते. आपण त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेवू हे वचन देवून यशवंतचे मामा त्यांना कोपरगाव इथे घेवून आले. हूशार असलेल्या यशवंतने मामांचा विश्वास जोपासला. त्याने अभ्यास करुन वयाच्या १४ व्या वर्षीच सरकारी नोकरीत प्रवेश केला. 

सन १८२९ साली नाशिक जिल्ह्यात ते बदली कारकून म्हणून नोकरीस लागले. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षा कामातील प्रामाणिकपणामुळे ते वरिष्ठाचे आवडते झाले. याच काळात बढती म्हणून ते शिरस्तेदार ते कलेक्टर यांचे दुय्यम चिटणीस म्हणून काम करु लागले. त्यांच्या कामाच्या शैलीमुळे त्यांना बढती मिळत गेली. 

सन १८५३ साली त्यांना मामलेदार म्हणून बढती मिळाली. या पदावर नियुक्त होताच ते लोकांच्या भल्यासाठी झटू लागले. चाळीसगाव इथून त्यांनी आपल्या मामलेदार पदाच्या नोकरीस सुरवात केली. येवला, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, शहादा, धुळे, शिंदखेडा अशा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मामलेदार म्हणून ते काम करु लागले. ब्रिटीश व्यवस्थेत इतर अधिकाऱ्यांप्रमाणे गळचेपी धोरण न राबवता ते लोकांच्या बाजूने उभा राहू लागले. 

सन १८६९ साली इंग्रजांनी नाशिक जिल्ह्यात बागलाण नावाचा नवा तालुका निर्माण केला. या तालुक्याचे महसुली केंद्र सटाणा ठेवण्यात आले. याच नव्या तालुक्याची मामलेदार म्हणून जबाबदारी यशवंत महाराज यांच्याकडे सोपवण्यात आली. अवघ्या काही दिवसातच एक परोपकारी मामलेदार म्हणून आपली ओळख त्यांनी बागलाण प्रांतात निर्माण केली. बागलाण प्रांतातले शेतकरी त्यांच्याकडे आपल्या समस्या घेवून येवू लागले. इथेच त्यांच्याकडे अडचणीतून मार्ग काढणारे मामलेदार म्हणून ओळखले जावू लागले. 

सन १८७० साली बागलाण प्रांतात मोठ्ठा दुष्काळ पडला. अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. त्याच काळात सटाणा-बागलाण प्रांतातील शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. दूष्काळावर मात करण्यासाठी लोकांना मदत मिळावी अशी याचना करण्यात आली, पण नाशिकच्या कलेक्टर यांनी  काही मदत पोहचवली नाही. 

लोकांचे हाल पाहून यशवंत महाराजांनी आपल्या अधिकारात असणारा सरकारी खजिना लोकांसाठी खुला केला. आपल्या अधिकारात असणारे सुमारे १ लाख २७ हजार रुपये त्यांनी लोकांच्यात वाटले. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दुष्काळात देव धावून आल्याची प्रचिती बागलाण प्रांतात झाली. लोक त्यांचा संत म्हणून उल्लेख करु लागले. पण हि बातमी कलेक्टरांना समजली. कलेक्टरांनी सरकारी तिजोरीची तपासणी केली, मात्र या तपासणीत कलेक्टरांना खजिन्यातील रक्कम तितकीच आढळली. एक पैशाचाही फरक मिळाला नाही. असे बागलाण प्रांतातले भक्त सांगतात.

या चमत्कारामुळे त्यांना दैवत्व बहाल करण्यात आले. पुढे चारच वर्षात ते मामलेदार पदावरुन निवृत्त झाले. लोकांच्या आग्रहावरुन ते याच ठिकाणी राहू लागले. त्यानंतर ११ डिसेंबर १८८७ रोजी त्यांचे निधन झाले.  नाशिककरांनी गोदावरीतटी रामकुंडासमोर त्यांचे समाधी मंदिर बांधले व त्या परिसराला यशवंतराव महाराज पटांगण असे नाव दिले. तर सटाणा येथे आरमनदीच्या काठी त्यांचे स्मारक आणि मंदिर बांधण्यात आले. सटाणा येथे महाराजांच्या पुण्यतिथी दिनी इ.स.१९००मध्ये पहिला यात्रोत्सव सुरू झाला. तेव्हापासून दरवर्षी हा यात्रोत्सव होतो. आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातील भक्तगण या मंदिरास भेट देत असतात. संपूर्ण भारत देशात सरकारी अधिकाऱ्याचे मंदिर हे फक्त यशवंतराव महाराज यांचेच आहे. या मंदिरात त्यांचा पुतळा उभारण्यात आला असून त्याची रोज पूजा केली जाते. मंदिरात धार्मिक पारायणे होतात. एक सरकारी अधिकारी आपल्या परोपकारी व समर्पित वृत्तीमुळे नागरिकांच्या मनात देव बनून राहतो आणि तब्बल दीडशे वर्षांनंतरही श्रद्धेने पूजला जातो ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. 

#देवमामलेदार #यशवंतरावमहाराज #सटाणा  #नाशिक #बागलाण 












Wednesday, 22 December 2021

आज राष्ट्रीय गणित दिन.

 आज राष्ट्रीय गणित दिन.

.......................................

रामानुजन श्रीनिवास अय्यंगार प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ

(जन्म: २२ डिसेंबर १८८७; निधन: २६ एप्रिल १९२०)


रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.


या महान गणितज्ञाचा जन्म तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. त्यांनी प्रारंभी स्वतःच त्रिकोणमितीचा अभ्यास केला व वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लेनर्ड ऑयलर  यांनी पूर्वसूचित केलेली ज्या व कोज्या यांसंबंधीची प्रमेये मांडली. १९०३ मध्ये त्यांना जी. एस्. कार यांचा सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्टस् इन प्युअर अँड ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स हा ग्रंथ अभ्यासण्याची संधी मिळाली. या ग्रंथात सु. ६,००० प्रमेये होती व ती सर्व १८६० सालापूर्वीची होती. या ग्रंथामुळे रामानुजन यांच्या कुशाग्र बुद्धीला चालना मिळाली. त्यांनी कार यांच्या ग्रंथातील प्रमेये पडताळून पाहिली; परंतु त्यापूर्वी गणितावरील चांगल्या प्रमाणभूत ग्रंथांशी त्यांचा संपर्क न आल्याने त्यांना प्रत्येक वेळी स्वतः मूलभूत संशोधन करावे लागले. या कार्यात त्यांनी अनेक नवीन बैजिक श्रेढीही शोधून काढल्या. १९०४ मध्ये कुंभकोणम् येथील गव्हर्न्मेंट कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला व शिष्यवृत्तीही मिळाली. त्यांचे प्राध्यापक पी. व्ही. शेषू अय्यर यांना रामानुजन यांचे गणितातील असामान्य प्रभुत्व जाणवले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांचे वाचन व संशोधन चालू झाले; परंतु गणिताचा सतत अभ्यास करण्याच्या नादात त्यांनी इंग्रजी भाषा व इतर विषयांकडे दुर्लक्ष केल्याने ते परीक्षेत अनुत्तीर्ण झाले व त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली. त्यानंतर ते प्रथम विशाखापटनमला व नंतर मद्रासला गेले. १९०६ मध्ये ते परीक्षेला पुन्हा बसले; पण अनुत्तीर्ण झाले व त्यामुळे पुढे परत परीक्षेला बसण्याचा प्रयत्न त्यांनी सोडून दिला. पुढील काही वर्षे त्यांचा निश्चित असा कोणताच व्यवसाय नव्हता; पण त्यांनी गणितातील आपले स्वतंत्र कार्य पुढे चालू ठेवले. १९०९ मध्ये त्यांचा विवाह झाला व उपजीविकेसाठी नोकरी शोधत असताना त्यांना नेल्लोरचे जिल्हाधिकारी रामचंद्र राव यांना देण्यासाठी शिफारसपत्र मिळाले. रामचंद्र राव यांना स्वतःला गणितात रस असल्याने व रामानुजन यांच्या कार्याच्या दृष्टीने त्यांनी कारकुनी काम करणे अयोग्य वाटल्याने त्यांनी रामानुजन यांना मद्रासला परत पाठविले. त्यांनी त्यांच्या चरितार्थाला काही काळ मदत केली व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठीही प्रयत्न केले. हे प्रयत्नही निष्फळ ठरल्यावर १९१२ मध्ये रामानुजन यांना मद्रास बंदर विश्वस्त मंडळाच्या (पोर्ट ट्रस्टच्या) कार्यालयात नोकरी मिळविण्यात यश आले. याच वेळी त्यांनी जर्नल ऑफ द इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी या नियतकालिकात आपले लेखन प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांपैकी पहिला निबंध बेर्नुली संख्यासंबंधी होता आणि त्यानंतर श्रेढी व अनंत गुणाकार आणि π चे मूल्य काढण्यासाठी भूमितीय रचना यांसंबंधी त्यांनी लिहिले.


त्यांच्या गणितीय कार्यात रस असलेल्या काही मित्रांनी प्रोत्साहन दिल्याने रामानुजन यांनी केंब्रिज येथील गणिताचे प्राध्यापक सर गॉडफ्री हॅरल्ड हार्डी  यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. पहिल्या पत्रात त्यांनी अविभाज्य संख्यांच्या वितरणासंबंधीच्या आपल्या संशोधनाविषयी, तसेच गणिताच्या विविध शाखांत स्वतः शोधलेल्या शंभराहून अधिक प्रमेयांसंबंधी लिहिले. या पत्रव्यवहाराने हार्डी प्रभावित झाले व त्यांनी रामानुजन यांना केंब्रिजला येण्याचे निमंत्रण दिले; परंतु त्यांनी धार्मिक कारणास्तव ते नाकारले व त्यामुळे मद्रास विद्यापीठाची दोन वर्षांची शिष्यवृत्ती त्यांना मिळण्याची व्यवस्था करण्यात आली. पुढे हार्डी यांचे सहकारी ई. एच्. नेव्हिल हे मद्रासला आलेले असता त्यांनी प्रयत्न करून रामानुजन यांची संमती मिळविली आणि १९१४ मध्ये रामानुजन यांना केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजात प्रवेश देण्यात आला. हार्डी व जे. ई. लिट्लवुड यांच्या मार्गदर्शनाखाली रामानुजन यांचा झपाट्याने विकास झाला. त्यांच्या मदतीने रामानुजन यांचे निबंध इंग्लिश व इतर यूरोपीय नियतकालिकांत प्रकाशित झाले. इंग्लंडमधील पाच वर्षांच्या वास्तव्यात त्यांचे २१ निबंध प्रसिद्ध झाले व त्यांतील कित्येक हार्डी यांच्या सहकार्याने लिहिलेले होते. यांखेरीज इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये त्यांचे सु. १२ निबंध प्रसिद्ध झाले. केंब्रिज विद्यापीठातील अनुभवामुळे रामानुजन यांचे कार्य पुष्कळच सुविकसित झाले; परंतु या वेळेपावेतो त्यांच्या मनोवृत्तीला काहीसे दृढ स्वरूप आलेले होते. त्यामुळे त्यांनी आपले कार्य पूर्वीच्याच पद्धतीने म्हणजे कारणमीमांसेपेक्षा अंतःप्रेरणेला अधिक महत्त्व देण्याच्या पद्धतीने चालू ठेवले. हार्डी यांच्या मते रामानुजन यांची नैसर्गिक बुद्धिमत्ता त्यापूर्वीच ओळखली गेली असती, तर ते तुलनेने एक फार मोठे गणितज्ञ झाले असते.

रामानुजन यांचे गणितातील ज्ञान आश्चर्यकारक होते व त्यातील बहुतेक त्यांनी स्वतःच प्राप्त केलेले होते. परंपरित अपूर्णांकासंबंधी यापूर्वी काय विकसित केले गेलेले आहे यासंबंधी त्यांना आजिबात माहिती नव्हती, तरीही या विषयातील त्यांचे प्राविण्य त्या काळच्या इतर गणितज्ञांच्या तुलनेने अनन्यसाधारण होते. विवृत्तीय समाकल, रीमान श्रेढी, झीटा फलनाची समीकरणे व त्यांचा स्वतःचा अपसारी श्रेढींसंबंधीचा सिद्धांत हे त्यांनी स्वतः संशोधन करून शोधून काढले. याउलट गणितातील पद्धतशीर प्रशिक्षण न मिळाल्याने किंवा उत्तम दर्जाच्या ग्रंथालयाचा उपयोग करण्याची संधी उपलब्ध न झाल्याने त्यांच्या ज्ञानातील वैगुण्येही तितकीच आश्चर्यकारक होती. गणितीय सिद्धतेविषयीची त्यांची कल्पना अतिशय संदिग्ध होती. अविभाज्य संख्यांसंबंधीची त्यांची अनेक प्रमेये त्यांच्या बुद्धीची चमक दाखवीत असली, तरी ती पुढे चुकीची ठरली. इंग्लंडमधील वास्तव्यातील पहिल्या निबंधात त्यांनी π चे आसन्न मूल्य (खऱ्या मूल्याच्या जवळपास असणारे मूल्य) काढण्याच्या निरनिराळ्या पद्धती दिलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी विशेषत्वाने संख्या विभाजन फलनाच्या गुणधर्माविषयी काम केले व ते अतिशय मोलाचे मानले जाते. त्यांनी संख्या सिद्धांतात केलेले कार्य भौतिक व संगणक विज्ञानातील काही समस्या सोडविण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. त्यांच्या कार्याचा विविध देशांतील गणितज्ञ अद्यापही अभ्यास करीत आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९८७ मध्ये अनेक देशांत त्यांच्या कार्यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी चर्चासत्रे व परिषदा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.


१९१७ मध्ये रामानुजन क्षयरोगाने आजारी पडले व त्यामुळे इंग्लंडमधील त्यांचे उर्वरित वास्तव्य निरनिराळ्या आरोग्यधामांत गेले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.


१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. मद्रास विद्यापीठाने दरसाल २५० पौंडांची शिष्यवृत्ती त्यांना पाच वर्षांकरिता मंजूर केली परंतु त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.


त्यांचे सर्व संशोधन कार्य जी. एच्. हार्डी, पी. व्ही. शेषू अय्यर व बी. एम्. विल्सन यांनी संपादित करून कलेक्टेड पेपर्स ऑफ श्रीनिवास रामानुजन (१९२७) या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. त्यांनी केलेली विविध टिपणे नोटबुक्स ऑफ श्रीनिवास रामानुजन (२ खंड, १९५७) या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध झाली.




२२ डिसेंबर : वर्षातील सर्वात लहान दिवस

आज २२ डिसेंबर ! वर्षातील सर्वात लहान दिवस !


२२ डिसेंबर रोजी सुर्य जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला 'विंटर सोल्सस्टाईल' असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते.

 

आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्र किनारी जगभरातील लोकं गर्दी करतात आणि वर्षातील मोठी समजल्या जाणाऱ्या रात्रीचे स्वागत करतात.


याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीची गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखलेले असतात.


ग्रेगरी दिनदर्शिकेत २२ डिसेंबर हा वर्षातील ३५५वा किंवा लीप वर्षात ३५६वा दिवस असतो. हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते.


आजपासून सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. आजच्या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य आहे.


वास्तविक पृथ्वीच्या सू्र्यापासूनच्या अंतरात कायम होणाऱ्या बदलांमुळे हा फरक पडत असतो. पृथ्वी ही कायम सूर्याच्या बाजूने थोडीशी कललेली असते. त्यामुळे बारकाईने निरीक्षण केल्यास वर्षातल्या प्रत्येक दिवशी सूर्याची उगवण्याची जागा किंचित बदलत असते. 


२२ डिसेंबरला सूर्याचं दक्षिणायण संपून उत्तरायण सुरु होतं. याचा अर्थ सूर्याची किरणं पृथ्वीवर सर्वाधिक तिरपी पोहोचत असतात आणि पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात ती जवळपास सरळ पडतात. 


त्यामुळे पृथ्वीच्या इतर भागात दिवस खूप लहान होतो आणि रात्र मोठी होते. त्यानंतर लगेचच सूर्याचं उत्तरायण सुरु होतं. याचाच अर्थ पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता हळूहळू दक्षिणेकडे कलू लागते.


याचाच परिणाम म्हणून २२ मार्च आणि २२ सप्टेंबर या दोन दिवशी दिवस आणि रात्र हे समान म्हणजेच १२ तासांचे असतात.





Tuesday, 21 December 2021

हुतात्मा अनंत कान्हेरे शौर्यदिवस


आज २१ डिसेंबर, हुतात्मा #अनंत_कान्हेरे शौर्य दिवस !


आजच्याच दिवशी १९०९ साली नाशिकचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन ह्याचा हुतात्मा अनंत कान्हेरे ह्यांनी गोळ्या घालून वध केला !

आजच्या दिवशी १९०९ साली संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा तत्कालीन कलेक्टर जॅक्सनचा विजयानंद नाट्यगृहात गोळ्या झाडून वध केला.  अनंत कान्हेरे अभिनव भारत संघटनेच्या सदस्य होते .गणेश सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आल्या चा बदला म्हणून कान्हेरे यांनी नाशिकचे न्यायाधीश व तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांना २१ डिसेंबर १९०९ ला विजयानंद थिएटरमध्ये गोळ्या घालून ठार केले. त्यावेळी ते फक्त १७ वर्षांचे होते.

२१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटक वाली मंडळी नव्हे,अजूनही तीन व्यक्ती त्या जॅक्सनसाठी,त्याची वाट पाहत नाट्यगृहात थांबल्या होत्या

मंचासमोरून धाड धाड असे एकामागून एक गोळ्यांचे आवाज झाले,अन नाशिकचा तो दुष्ट जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.मागे बसलेल्या त्या क्रांतिकारी तरुणाने सुरवातीस एक गोळी आपल्या पिस्तुलाने पाठीमागूनच जॅक्सनवर झाडली पण ती चुकली म्हणून समोर येऊन पुन्हा चार गोळ्या झाडून त्या पापी इंग्रजाचा अंत ह्या तरुणाने केला. गोळ्यांचे आवाज ऐकता हा हा कल्लोळ माजला,अन तितक्यात विनायकराव देशपांडे आणि अण्णा कर्वे सभागृहातून बाहेर पडले,पण हा अनंत कान्हेरे,त्याचा उद्देश वेगळाच,त्याने दुसरेही पिस्तुल काढले आणि स्वतःच्या मस्तकी धरले,स्वतःलाही संपवण्याचा त्याचा प्रयत्न मात्र फसला,गोळी चालवण्याआधीच शेजारी उभ्या अधिकाऱ्याने त्याचा हात पकडून त्याला अटकाव केला.पुढे खटला चालला,गणू वैद्याच्या भित्रेपणामुळे इतरही साथीदार पकडले गेले,अनंत कान्हेरे,विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे या तिघांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशीही दिल्या गेली. या तिघांचेही मृतदेह नातलगांना न सोपवता त्यांच्यावर परस्पर अंतिम संस्कार करण्यात आले. ब्रिटिश सरकारने अस्थी ठाण्याच्या खाडीत आणि रक्षा मुंबईला समुद्रात विसर्जित केली. 

आपल्या कर्तृत्वाने जॅक्सन चा वध करणारा हा केवळ १९ वर्षांचा तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे इतिहासात अजरामर झाला. 

#नाशिक  #कान्हेरे  #जॅक्सन  #nashik #kanhere #jackson 








Monday, 20 December 2021

अहिल्याबाई_होळकर_ह्यांचा_फोटो_किंवा_पुतळा_हातात_शिवलिंग_आणि_डोक्यावर_पदर_घेतलेला_असाच_का_असतो?

अहिल्याबाई_होळकर_ह्यांचा_फोटो_किंवा_पुतळा_हातात_शिवलिंग_आणि_डोक्यावर_पदर_घेतलेला_असाच_का_असतो?


प्रत्येक शिल्पाची काहीतरी ओळख असतेच स्वतःची अशी वेगळी ! जसे स्वातंत्र्यवीर म्हटले की त्यांची ती " मार्गदर्शक तर्जनी ", झाशीची राणी म्हटले की " आपल्या पाठीवर मूल बांधलेली आणि उभी समशेर हातात असलेली स्त्री ! तसेच अहिल्याबाई होळकर म्हटले की " डोक्यावर पदर घेतलेली आणि हातात शिवलिंग " अश्या एका स्त्रीचे चित्र डोळ्यासमोर येते .
अहिल्याबाई ह्या शिवभक्त होत्या हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे पण त्यांचा पुतळा किंवा फोटो असाच का असतो हे आपल्याला माहीत आहे ? आज आपण तेच समजून घेऊ !
अहिल्याबाईंच्या राजवटीत त्यांचे कर्तृत्व बघून एक इंग्रज शिल्पकार इंग्रजांनी दूरदृष्टीने अहिल्याबाईंच्या दरबारात घुसवला .
तो बरेच दिवस अहिल्याबाईंच्या दरबारात राहिला , त्याने अहिल्याबाई ह्यांचे अगदी जवळून निरीक्षण केले आणि त्यानुसार अहिल्याबाईंचे दोन पुतळे त्याने बनवले .
एक दिवस अहिल्याबाई ह्यांच्या दरबारात येऊन त्याने अहिल्याबाई ह्याचेच दोन पुतळे अहिल्याबाईंना भेट दिले . त्या शिल्पकाराने अहिल्याबाईंचे सूक्ष्म निरीक्षण करून ते बनवले होते .
" मी एक विधवा स्त्री ! मी माझे सासरे गमावले आहेत , माझ्या सासवा सती गेल्या आहेत , माझा नवरा गेला आहे , माझा मुलगा गेला आहे , त्याबरोबर सून सती गेली आहे, माझी मुलगी तिच्या नवऱ्याबरोबर सती गेली आहे , एवढेच कशाला माझा दहा वर्षांचा नातू गेला आहे आणि त्याची लहान बायकोही सती गेली आहे, मी फार दुःखी आहे . भगवान शंकराला गादीवर बसवून त्याची सेविका म्हणून मी राज्य करतेय . त्यामुळे माझा पुतळा वगैरे नको ". म्हणून अहिल्याबाईंनी ते पुतळे नर्मदा नदीत टाकून देण्याची आज्ञा भानराव होळकर ह्या आपल्या विश्वासू माणसास दिली .
त्याने अहिल्याबाईंचा एक पुतळा नर्मदा नदीत विसर्जित केला पण दुसरा मात्र लपवून ठेवला .
अहिल्याबाई 1794 मध्ये मरण पावल्यावर महेश्वर येथेच नर्मदा नदीच्या काठावर त्यांचे दहन करण्यात आले . तिथून अगदी जवळ त्यांच्या महालाच्या जवळ एक छत्री उभारण्यात आली , छत्री म्हणजे स्मृतिस्थळ !
आज ती छत्री " अहिल्येश्वर महादेवाचे " म्हणून प्रसिद्ध आहे . त्या मंदिराच्या गाभाऱ्यात अहिल्याबाईंचा हा पुतळा आहे .
मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला जाता येत नाही आणि आपल्याला फोटोही काढता येत नाही . त्यामुळे त्याच्या फोटोचा फोटो इथे टाकला आहे.
माहेश्वर येथे जाल तेव्हा अवश्य हा पुतळा बघा .
अहिल्यामातेचे चित्र किंवा पुतळा म्हटले की त्यात मातेच्या हातात शंकराची पिंड दिसतेच . त्याचा हा इतिहास !
© डॉ सुबोध नाईक
( कुठेही शेयर करायचे असल्यास लेखकाच्या नावासहच शेअर करावा . )

अहिल्याबाई होळकरांची छत्री म्हणजे स्मृतिस्थळ असलेल्या " अहिल्येश्वर महादेव " मंदिराच्या गाभाऱ्यातील अहिल्याबाईंचा पुतळा.


काशी विश्वनाथ धाम मध्ये बसवण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांचा पुतळा.


Friday, 17 December 2021

कर्दमाश्रम : 'श्रीदत्तप्रभूंचं आजोळ', करंजी

 'श्रीदत्तप्रभूंचं आजोळ' असलेला #कर्दमाश्रम,  करंजी ता. दिंडोरी, जि. #नाशिक 


#दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र #करंजी म्हणजे कर्दमऋषींच्या तपश्चर्येने व प्रभू #दत्तात्रेयांच्या बाललीलांनी पुनीत झालेला परिसर. #नाशिक - #वणी रस्त्यावर दिंडोरीपासून सात-आठ किलोमीटरवर डाव्या हाताला ओझरखेड हे गाव लागते. रस्त्यावरील पुल ओलांडताना उजवीकडे श्री क्षेत्र करंजीकडे जाणारा दिशादर्शक फलक आपले स्वागत करतो अन् एक कच्चा रस्ता आपल्याला कर्दम ऋषींच्या आश्रमाकडे घेऊन जातो. महामार्गापासून साधारण एक किलोमीटर आत गेल्यावर घनदाट झाडीत श्री क्षेत्र करंजी वसले आहे.

#कर्दम ऋषी व देवहूती या दांपत्याची कन्या महासती #अनुसया हिचा विवाह सप्तर्षींपैकी एक असलेले महान ऋषी #अत्रि यांच्याशी झाला होता. त्रेतायुगात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या भर माध्यान्ही, महर्षी अत्रि आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या उदरी पुत्ररुपानं भगवान् श्रीदत्तात्रेयांनी अवतार धारण केला. म्हणजेच कर्दम ऋषी हे प्रभू दत्तात्रेयांचे आजोबा.  सृष्टीची रचना करत असताना ब्रह्मदेवाच्या छायेतून कर्दम ऋषींचा जन्म झाला. त्यांनाच ब्रह्माने सृष्टीचा  विस्तार करण्याचा आदेश दिला. कर्दम ऋषींनी आपल्या  भार्येसाठी आकाशात उडणाऱ्या विमानाची निर्मिती केली होती, असेही म्हटले जाते.  कर्दम ऋषींचा विवाह लग्न मनुची कन्या देवहूतीशी झाला.  त्यांना नऊ मुली व एक मुलगा झाला. देवहुतीने आपल्याला विष्णूसारखा पुत्र व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याने स्वतः:भगवान विष्णूंनी तिच्या पोटी जन्म घेतला. त्यामुळे या पुत्राला म्हणजेच #कपिल ऋषींना विष्णुच्या २४ अवतारांपैकी एक अवतार मानले जाते. हे कपिल मुनी 'सांख्य तत्वज्ञानाचे' प्रवर्तक मानले जातात. कर्दम ऋषींनी आपल्या सर्व कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गति, क्रिया, ख्याति, अरुंधती तथा शान्ति या मुलींचे लग्न क्रमश: मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतु, भृगु, वसिष्ठ तथा अथर्वा या ऋषींशी लावले. 

श्री क्षेत्र करंजी हे नाव दण्डकारण्यातील या ज्या परिसरात कर्दम ऋषी तपश्चर्या करीत होते, त्या भागात करंजीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे परिसराला करंजी हे नाव पडले व आश्रमाला कर्दमाश्रम असे नाव पडल्याचे ग्रामस्थ सांगतात. दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून हा परिसर परिचित आहे.  यालाच 'निर्जल मठ' असंही म्हणतात. याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते. साक्षात् श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन 'सिद्धानां कपिलो मुनीः' असं केलंय, त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे.

सुप्रसिद्ध संतसत्पुरुष श्रीरंग अवधूतांनी श्रीदत्ताला एका आदर्श शेतकऱ्याच्या रूपात उभे केले आहे. शेतकऱ्यास कधीही विश्रांती नसते त्याचप्रमाणे दत्तही नेहमीच उभा आणि संचारी असतो, अशी त्यांच्या रूपाची व्याख्या केली त्यांनी केली आहे. मात्र करंजीत दत्तात्रेय प्रभूंची पद्मासनातील त्रिमुखी मूर्ती पहायला मिळते. श्रीदत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही व एकमेव इथे पहायला मिळते. श्रीदत्तात्रेयांनी आपल्या आजोळी ज्ञानसाधना केल्याने ही मूर्ती पद्मासनातील असल्याचे येथे सांगितले जाते. प्रत्यक्ष गंगामाईनं श्रीदत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्रीशिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरुप दिलेली आहे असे म्हणतात. मंदिरात असलेल्या देवघरात एक वित उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे. या कर्दमाश्रम परिसरात स्वामी शिवदयाळ गिरी व रामचंद्र महाराज यांची समाधी आहे. करंजीतील या क्षेत्रात श्री जुना दत्त आखाड्याचीही परंपरा आहे. 

कर्दमाश्रमात अनेक मंदिरे असून, गंगास्थानावर सुंदर घाट बांधण्यात आला आहे. घाटाजवळच गंगा मंदिरही आहे. श्रीगणेश मंदिर, महादेव मंदिर तसेच आश्रमातून बाहेर पडताना उजव्या हाताला सप्तशृंगी माता व विठ्ठल रुक्मिणी मंदिरही आहे. या आश्रमातच काशीची गंगा अवतरल्याचे म्हटले जाते. पर्वणी काळात हजारो भाविक गंगामाईत स्नानासाठी कर्दमाश्रमात येतात म्हणून या क्षेत्राला प्रतिगाणगापूरही म्हटले जाते. 

व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.  

https://youtu.be/MCXEbPPByTY

https://youtu.be/MCXEbPPByTY
































Thursday, 16 December 2021

गोदाकाठावरील ऐतिहासिक कपूरथळा छत्री

 गोदाकाठावरील ऐतिहासिक कपूरथळा छत्री


गोदाकाठावर विसावलेल्यांमध्ये असंख्य ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. यात साधू, महंतांपासून ते लढवय्या सरदारपर्यंत तर विचारवंतापासून राजे, महाराजांचाही समावेश आहे. त्यांच्या आठवणींचे प्रतीक म्हणून येते अनेक समाधी पहायला मिळतात. काहींबद्दल आपल्याला माहिती असते तर काही अजूनही अज्ञातच आहेत. यात कपूरथळा डोमचा समावेश होतो. कपूरथळा कोण, ही समाधी कोणाची, त्यामागील इतिहास काय या प्रश्नांची उत्तर रमेश पडवळ यांच्या अल्बममधून….
गोदाकाठावरील बालाजी मंदिरासमोरील कपूरथळा छत्री (डोम) म्हणून परिचित असलेली समाधीची वास्तू परिचित आहे ती तिच्या सुंदरतेमुळे. मात्र, याबद्दल फारशी माहिती नसल्याने कपूरथळा समाधी इतकेचं याबद्दल सांगितले जाते. ही समाधी आहे कपूरथळा संस्थानचे राजे राजा रणधीर सिंह यांची. कपूरथळा म्हणजे सध्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. पूर्वी हे शीख साम्राज्यातील एक प्रांत होता. त्यांचा इतिहास रोचक असून, शेर-ए-पंजाब म्हणजेच शिखांचा पहिला राजा रणजितसिंहांची पत्नी जिंदाची समाधीही गोदाकाठावर उभारण्यात आली होती, या इतिहासाशी राजा रणधीर सिंहाच्या इतिहासाचाही एक अनोखा संबंध आहे.
शेर-ए-पंजाब म्हणजेच शिखांचा पहिला राजा रणजितसिंहच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी शिखांविरोधात आघाडी उघडली. यातून १८४५ ला पहिले अँग्लो-शीख युद्ध झाले. इंग्रजांनी लाहोर जिंकल्यामुळे शिखांना तह करणे भाग पडले. मात्र, काही वर्षांनी म्हणजे १८४९ मध्ये शिखांनी रणजित सिंहांची पत्नी जिंदाच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा इंग्रजांविरोधात उठाव केला आणि दुसरे अँग्लो युद्ध छेडले गेले. यातून पंजाब प्रातांचे तुकडे पडले. जनरल लॉर्ड डलहौसीने शरण आलेल्या व मदत केलेल्या शीखांना वेगवेगळे प्रांत वाटून दिले व त्यांच्यावर ब्रिटिशांचे नियंत्रण निर्माण झाले. यात कपूरथळा संस्थानचाही समावेश होता.
अहलूवालिया मिसालचे शीख प्रमुख हे कपूरथळा संस्थानचे राजे म्हणून ओळखले जात. दुसऱ्या अँग्लो-शीख युद्धानंतर निहाल सिंह अहलूवालिया हे कपूरथळाचे राजे झाले. राजा निहाल सिंह यांनी १३ सप्टेंबर १८५२ रोजी अखेरचा श्वास घेतला.
राजा रणधीर सिंह कोण?
राजा निहाल सिंहांनंतर त्यांचा मोठा मुलगा राजा रणधीर सिंह यांनी अहलूवालिया मिसालचे शीख प्रमुख व कपूरथळाचे राजा म्हणून सूत्रे हाती घेतली. राजा रणधीर सिंह एक कुशल शासक होता. त्याच्या वडिलांचा सौम्य आणि उदार स्वभाव त्याच्याकडेही होता. ब्रिटिशांच्या सोबत राहण्याचे धोरण राजा रणधीर सिंहांनीही स्वीकारले, त्यामुळे त्यांना ब्रिटिशांमध्येही महत्त्वाचे स्थान मिळाले. राजा रणधीर सिंहांनीही ब्रिटिशांना वेळोवेळी सहकार्य केले. यामुळे १८६४ मध्ये लाहोर येथे भरलेल्या लॉर्ड लॉरेन्स यांच्या सार्वजनिक दरबारात राणी व्हिक्टोरियाकडून दिला जाणारा जी.सी.एस.आय. हा किताब राजा रणधीर यांना देण्यात आला. राजा रणधीर सिंह हा पर्शियाच्या नादिर शहाची तलवार व हातातील चांदीचा कडा नेहमी परिधान करीत असे, अशी नोंद इतिहासात मिळते.
राजा रणधीरचा मृत्यू अन् गोदाघाट
राजा रणधीर सिंह यांचा मृत्यू वयाच्या ३९ व्या वर्षी २ एप्रिल १८७० मध्ये लंडन येथील ईडन शहरात झाला. ते व्हिक्टोरिया राणीच्या भेटीसाठी समुद्रमार्गे जात असताना एडन येथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले. यावेळी त्यांचा ज्येष्ठ पुत्र खडक सिंह उपस्थित होते. खडक सिंह यांनी त्यांच्यावर नाशिक येथे दहन पद्धतीने अंत्यसंस्कार केले. गोदाकाठावर कपूरथळा घाटावर समाधीचा डोम बांधण्यासाठी १२,६१० रूपये खर्च आला. डोमचा खालील भाग बेसाल्ट दगडाने तर वरील पांढऱ्या मार्बलचा वापर करण्यात आला आहे. संस्कृत, ऊर्दू व इंग्रजीत तीन शिलालेख असून, संस्थांनच्या चिन्हाचाही वापर यावर करण्यात आला आहे. या डोमची उंची ३० फूट (९.१४ मीटर) आहे. यावर सिंहाचे शिल्पही आकर्षक आहे. बालाजी मंदिराशेजारील आश्रम व मंदिराची इमारत १८७८ मध्ये बांधण्यात आली. आश्रमाच्या इमारतीसाठी १४,६९० खर्च करण्यात आला होता. या आश्रमात राम, लक्ष्मण, सीता, गंगा आणि गोदावरीच्या प्रतिमा असलेले एक मंदिर बांधण्यात आले होते. यावेळी खडक सिंह नासिकमध्ये आले होते. हॉल बांधण्यासाठी ३५ हजार रूपये खर्च करण्यात आला.
खडकसिंहांनी केली नाशिकरांची मदत
२९ सप्टेंबर १८७० च्या रिपोर्टमधील एका नोंदीनुसार, गोदावरीच्या पात्रात मोठ्या खड्ड्यात पाणीसाठा झाल्याने त्यातून दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होत होता. हा खड्डा भरून काढणे गरजेचे होते. यावेळी नाशिकमध्ये आलेल्या कपूरथळाचे राजे खडकसिंह यांच्याकडे नाशिकच्या नागरपित्याने ही कैफियत मांडली तेव्हा त्यांनी या कामासाठी तसेच नदीच्या बाजूने पक्का दगडी कोट बांधण्याचे काम क्रमाक्रमाने करून देण्यास आर्थिक मदत केली.
#नाशिक #nashikpratibimb #nashik

- रमेश पडवळ
rameshpadwal@gmail.com




सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...