Sunday, 10 July 2022

विठुरायाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या संत संप्रदायाची शिकवण आणि मानवा-मानवांतील एकात्मतेची वीण घट्ट करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. 


सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा,

मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा !!


वारीतला प्रत्येक जण विठ्ठलाच्या भेटीसाठी सलग २०-२२दिवस न थकता ऊन वारा पाऊस कशाचीही चिंता न करता देहभान विसरून चालत असतात.

जेव्हा विठ्ठलाचं दर्शन होईल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो एक वेगळीच ऊर्जा भेटलेली असते.


सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

कर कटावरी ठेवोनिया!


पंढरपूरच्या विठ्ठलाची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. अशी हि सर्वांना वेड लावणारी विठूरायाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक संतांनी तिचे वर्णन देहभान हरपून केलेले आहे. या आषाढी एकादशीच्या पवित्र व्रतानिमित्त आपणही या मूर्तीची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात. 


महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत झिरपलेल्या भक्तीरसाचा हा सांस्कृतिक वारसा आहे. तो असाच वृद्धिंगत होत राहो. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना भक्तीमय शुभेच्छा!


#आषाढीएकादशी #AshadhiEkadashi  

#vitthalrakhumai #pandharpur





Saturday, 9 July 2022

नाशिकची दुर्लक्षित कन्या : “कॉर्नेलिया सोराबजी”

 भारतातली पहिली महिला वकील “कॉर्नेलिया सोराबजी”


https://tinyurl.com/2yfejsf6

देशाच्या एकूणच जडणघडणीत महिलांचे योगदान आता कोणीच नाकारू शकत नाही. कायदे क्षेत्रातही अनेक महिला वकील आज मानाने व तडफेने काम करताना दिसतात. मात्र, भारतातील पहिल्या महिला वकील म्हणून नाव मिळविलेल्या कार्नेलिया सोराबजी या नाशिकच्या कन्येच्या योगदानाची वा  कायदा क्षेत्रातील लढ्याची कोठेच स्मृती जागवली जाताना दिसत नाही.  आज ६ जुलैला त्यांचा स्मृती दिन. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा व संघर्षाचा हा जागर 


देशात महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, सर्व क्षेत्रात संधी मिळाव्यात यासाठी विविध कायदे होतांना दिसतात. महिलांना समान संधी आता मिळूही लागल्या आहेत. मात्र, १८ व्या शतकातील उत्तरार्धात भारतातील एका महिलेने कायदा क्षेत्रात महिलांना वकिली करण्याची संधी मिळावी, यासाठी मोठा संघर्ष केला होता. ही महिला होती कॉर्नेलिया सोराबजी. कॉर्नेलिया सोराबजी ( १८६६ ते १९५४) म्हणजे भारतातली पहिली महिला वकील. त्यांनी या पदापर्यंत येण्यासाठी केलेला संघर्ष कष्टप्रद होता. यात त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.


कॉर्नेलियाचा जन्म १५ नोव्हेंबर १८६६ मध्ये नाशिकजवळील देवळालीतील पारशी कुटुंबात झाला. कॉर्नेलियाचे बालपण नाशिक, पुणे आणि बेळगावात गेले. त्यांच्या कुटुंबाने १८४१ सालीच ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. कॉर्नेलिया हे पाचवे अपत्य. कॉर्नेलियाची आई फासिना यांनी पारशी मुलांसाठी गुजराथी माध्यमाची शाळा, हिंदू मुलांसाठी मराठी तर मुस्लिम मुलांसाठी उर्दू शाळा सुरू केल्या होत्या. 


कॉर्नेलियाने पदवीसाठी पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या पश्चिम भारतातील पहिल्या महिला पदवीधर ठरल्या. त्या बी. ए. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या. त्या वर्षी महाविद्यालयातून पहिला वर्ग मिळवणा-या त्या एकमेव विद्यार्थी होत्या. त्यांना इंग्लंडमधील एका विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळाली. पण महाविद्यालयाने प्रवेश देण्यास नकार दिला. त्या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रशासनाने जे उद्गार काढले ते त्या काळाची मानसिकता दाखवतात. It was nonsense for a woman to even think of it... अशा शब्दात कॉर्नेलियाच्या अर्जाची वासलात लावण्यात आली तरी कॉर्नेलियासारखी माणसे डगमगत नाहीत. तिने अनेक प्रयत्न केले आणि ऑक्टोबर १८८९ मध्ये ती ऑक्सफर्डला दाखल झाली. पण महिला आहे या एकमेव कारणावरून तिला प्रवेश नाकारण्यात आला. 


अखेर कॉर्नेलियाच्या मित्राने याबाबत तेथील न्यायालयात महिलांना कायद्याचे शिक्षण घेता यावे, यासाठी १८९२ मध्ये याचिका दाखल केली. याचिकेचा निकाल कॉर्नेलियाच्या बाजूने लागला अन् तिला विशेष परवानगी देण्यात आली. यामुळे तिला ऑक्सफर्ड सोमरविले कॉलेजमध्ये कायदा शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळाला. इंग्लंडमध्ये व ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कायद्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय महिला ठरली.   त्यानंतर पदवी प्राप्त करून भारतात परतल्यानानंतरही त्यांचा संघर्ष थांबला नाही. तेव्हा महिलांना वकिली करण्याची परवानगी नव्हती. कायद्यात सुधारणा होऊन वकिली करण्याची परवानगी थेट १९२४ ला मिळाली. व त्यांनी कलकत्ता येथे वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. 


१९२९ मध्ये वरिष्ठ वकील म्हणून उच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतर त्या लंडन येथे स्थायिक झाल्या. निवृत्तीच्या काळात त्यांनी महिलांविषयक समाजसुधारणेच्या कार्यास वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली लव अॅण्ड लाइफ बियाँड द पर्दा’ (१९०१), सन-बेबीज : स्टडीज इन द चाइल्ड-लाइफ ऑफ इंडिया (१९०४), बिटवीन द ट्विलाइट्स: बीइंग स्टडीज ऑफ इंडिया वूमन बाय वन देमसेल्व्ह्स (१९०८), इंडियन टेल्स ऑफ द ग्रेट वन्स अमंग मेन, वूमन अँड बर्ड पीपल (१९१६), सोराबजींनी इंडिया कॉलिंग : द मेमरीज ऑफ कॉर्नेलिया सोराबजी (१९३४), इंडिया रिकॉल (१९३६), क्वीन मेरीज बुक फॉर इंडिया (१९४३) हि पुस्तके जगभर गाजली. सामाजिक सुधारणा कायदेविषयक कामाव्यतिरिक्त त्यांनी अनेक पुस्तके, लघुकथा आणि लेखही लिहिले. ६ जुलै १९५४ ला वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी नाशिकसह राज्याचे नाव इतिहासात कोरले आहे. 

Thursday, 30 June 2022

रहस्यमयी त्र्यंबकेश्वर...

रहस्यमयी त्र्यंबकेश्वर...

त्र्यंबकेश्वराच्या  पिंडीमध्ये आज पहाटे बर्फ जमा झाला. 


असा चमत्कार आज प्रथमच घडला आहे. अगदी हिवाळ्यातही आतापर्यंत असे घडले नव्हते.


हा भविष्यातल्या कोणत्या घटनेचा संकेत असू शकेल?

जय त्र्यंबकराज !!!

🤔🙏🙏🙏 



Monday, 27 June 2022

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या आवारातील प्राचीन भग्नावशेष

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्राकारातील ही चतुर्मुख महादेव मूर्ती व प्राचीन शिवलिंगम. 

 


सध्या या मूर्तीची तीनच मुखे अस्तित्वात आहेत. पाठीमागील चौथे मुख नष्ट झालेले आहे. 

ही मूर्ती खंडीत (भग्न) स्वरूपात असल्याने पुजली जात नाही. या मूर्तीसोबतच तीन प्राचीन शिवलिंगम ठेवलेली आहेत.  या मूर्ती व लिंगे प्राचीन शिलाहारकालीन मूळ त्र्यंबकेश्वर मंदिरातील असावीत असा पुरातत्व संशोधकांचा अंदाज आहे.  


चतुर्मुख महादेवाच्या प्रत्येक मुखाला वेगवेगळी नवे आहेत. 

सद्यो वामं तथा घोर पुरुष च चतुर्थकम ।

पहिलं नाव सद्य, दुसरं वाम तिसरं नाव घोर तर चौथ नाव तत्पुरूष.

शिवपुराणात महादेवाला पाच मुख असल्याचे म्हटले आहे. सद्योजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान अशी या पाच मुखांची नावे आहेत. महादेव म्हणतात की ओंकार 'ॐ' ही त्यांची उत्पत्ती आहे. त्यांच्या उत्तर मुखातून अकार, पश्चिम मुखातून उकार, दक्षिण मुखातून मकार, पुर्व मुखातून बिंदु आणि मध्य मुखातून नाद प्रकट झाला. अशा पाच अवयवांपासून 'ॐ' ची निर्मिती झाली. 


या मंदिराच्या आवारातील शिवलिंगे वेगळ्याच प्रकारची दिसतात. मात्र अशाप्रकारचे शिवलिंग हे निव्वळ भगवान शिवशंकराचे प्रतीक नसून यात ब्रह्मा, विष्णू व शिव या तीनही देवतांचा अंश असतो असे मानले जाते.  शिवलिंगाचा सर्वात खालचा भाग चौकोनी असतो त्याला ब्रम्हभाग म्हणतात. मधला भाग अष्टकोनी असतो त्याला विष्णूचा अंश म्हणतात. सर्वात वरचा भाग वर्तुळाकार असतो ज्याला शंकराचा अंश म्हणतात. आणि हाच भाग आपणाला दिसतो बाकी दोन भाग पिठात व भूमीमध्ये असतात.


शिव हा शब्द 'वश्' या शब्दापासून तयार झाला आहे. वश म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशित होतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध अन् स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करतो.

'शं करोति इति शङ्करः । 'शम्' म्हणजे कल्याण आणि 'करोति' म्हणजे करतो. जो कल्याण करतो तो शंकर होय.


आपण श्री त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला जातो तेव्हा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो व बाहेर पडतो मात्र मंदिराच्या आवारात उघड्यावर ठेवलेल्या आपल्या समृद्ध प्राचीन परंपरेचे अवशेष असलेल्या भग्नावषेशांकडे आपले लक्ष जात नाही. हे अवशेष भाविकांच्या दुर्लक्षामुळे व  ऊन, वर व पाऊस यांच्या भडिमारामुळे दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.  या अवशेषांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे हे संबंधितांच्या लक्षात येईल तो सुदिन... 




गर्भगृहातील मूळ श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग 


मंदिराच्या आवारातील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग प्रतिकृती 



शिवलिंगाचे विविध भाग


शिवलिंगाचे विविध भाग
















Monday, 20 June 2022

'पंचमुखी' कपालेश्वर मुखवटा

 'पंचमुखी' कपालेश्वर मुखवटा   


नाशिकमध्ये पंचवटीत गोदावरी नदीच्या काठी एका उंच टेकडीवर *कपालेश्वर मंदिर* वसले आहे. कपालेश्वर म्हणजे महादेव. प्रत्यक्ष शंकराने येथे वास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील पहिलेच मंदिर असावे, जेथे शंकरासमोर नंदी नाही.


नाशिकचे कै. दादाजी उमाशंकर वैद्य यांनी ६ नोव्हेंबर १८९३ रोजी धनोत्रयोदशीला दि कपालेश्वर पालखी प्रोसेशन ट्रस्टची स्थापना केली. तेव्हापासून वैद्य कुटुंबीयांकडे पंचमुखी सेवेचा वारसा लाभला आहे. सदरचा पंचमुखी महादेवाचा मुखवटा वर्षभरातील सर्व सोमवती अमावस्या, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो. त्यानंतर विधीवत पूजा आणि श्रुंगार करून सवाद्य पालखी सोहळा संपन्न होत असतो. पालखीसोहळ्यात मिरवला जाणारा हा आगळावेगळा पंचमुखी मुखवटा अत्यंत तेजस्वी भासतो. शिवशंकराच्या पाच मुखांच्या जटामुकुटात गंगा विराजमान आहे. तिच्या शिरावर पंचमुखी नागराजांनी आपली छाया धरली आहे. 


या मुखवट्याच्या निर्मितीची कथा मोठी अद्भुत आहे. नाशिकच्या जुन्या तांबट आळीत रहाणारे दादा उमाशंकर वैद्य  हे निस्सीम शिवभक्त. कपालेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा. एकदा त्यांना कपालेश्वराचा द्रुष्टांत झाला. त्यानुसार त्यांनी कपालेश्वर चरणी चांदीचा मुखवटा अर्पण करण्याचे ठरवले. ही गोष्ट १८९३ सालची. सोनार  समाजातील तत्कालीन कसबी सुवर्णकार श्री रामचंद्र रावजी इंदोरकर यांच्याकडे हे  काम सोपवण्यात आले. आपले सर्व कसब कारागीरी  पणाला लावुन त्यांनी हा पंचमुखी शिवाचा मुखवटा घडवला. आणि त्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा तो कपालेश्वर पालखीत मिरवण्यात आला.


तेव्हापासून श्रावणी सोमवार, महाशिवरात्री आणि सोमवती अमावस्या या महापर्व कालात वैद्य कुटुंबाकडे असलेला मुखवटा भगवान कपालेश्वराच्या पालखीत मिरवला जातो. वंशपरंपरेने या पालखी सोहळ्याचा खर्च आणि परंपरा वैद्य कुटुंबाकडे राहील हेही तेव्हाच ठरवण्यात आले. वैद्य कुटुंबीयांनी दादा उमाशंकरांची ही परंपरा निष्ठेने पुढे चालु ठेवली आहे. 














Friday, 17 June 2022

स्मारक एक चित्रपट गीताचे - 'झुमका गिरा रे बरेली के बाजार में...'

 'झुमका गिरा रे बरेली के बाजार में...!’ हे गाणे आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेलं असेल. या गाण्याबाबतचा हा एक विलक्षण किस्सा... 


'झुमका गिरा रे बरेली के बाजार में...!’  या प्रसिद्ध चित्रपट गीताने बरेली या उत्तर प्रदेशातील शहराला देशभर प्रसिद्धी मिळवून दिली. ‘मेरा साया’ या १९६६ सालच्या  चित्रपटातील हे अतिशय गाजलेले गाणे. या गाण्यामुळे बरेली संपूर्ण भारतात प्रसिद्धीस आले. 


या गाण्याचे गीतकार आहेत राजा मेहंदी अली खान. गायिका आशा भोसले, संगीतकार – मदन मोहन. पडद्यावर गीत सादर केलय बहारदार नृत्य करून दिवंगत साधनाने.

 ‘मेरा साया’ (१९६६) हा सिनेमा मराठी ‘पाठलाग’ (१९६४) या सिनेमावरुन काढणेत आला. तसं पाहिलं तर मूळ सिनेमाच्या कथेशी गाण्यातील बरेली या  शहराचा दुरान्वयेही संबंध नाही.


या गाण्यात बरेलीच्या बाजारात नायिकेचा झुमका हरवला. पण आता तो हरवलेला झुमका तब्बल ५४ वर्षांनी सापडला आहे.  बरेली विकास प्राधिकरणाने शहरातील एन एच २४ वर झीरो पॉइंट येथे एक झुमका  उभा केलेला आहे.  त्याची ऊंची १४ फूट व वजन आहे २०० किलोग्रॅम. पितळ व तांब्याचा हा झुमका बनवला आहे  गुडगावच्या एका कारागिराने. त्याची किंमत आहे १८ लाख रुपये.  या ठिकाणांचे नाव आहे  “झुमका तिराहा.”  ५४ वर्षांनी म्हणजे २०२० मध्ये झुमक्याचे हे स्मारक उभे राहिले आणि आता पर्यटकांचे आकर्षण स्थळ झाले आहे. 

पण बरेली गावात झुमका पडल्याची कहाणी मात्र अगदी खरी आहे आणि त्या कहाणीचा संबंध आहे अभिताभ बच्चन परिवाराशी.

अभिताभ यांचे वडील  हरिवंशराय बच्चन व मातोश्री तेजी ( माहेरचे आडनाव- सूरी) यांची पहिली भेट  बरेलीला एका नातेवाईकाच्या लग्नात झाली. त्यावेळी झालेल्या एका घरगुती कार्यक्रमात  हरिवंशराय यांना एखादी कविता म्हणण्याचा आग्रह झाला. त्यांनी कविता अतिशय सुंदररित्या सादर केली. ती ऐकून तेजी यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. हरिवंशराय यांचे डोळे तेजी यांची ही अवस्था पाहून भरून आले. या पहिल्या कविताभेटीचे रूपांतर नंतर एका प्रेमकथेत झाले. पण त्यांच्या लग्नाची बातमी येत नसल्याने सारे मित्र नेहमी चौकशी करीत. गीतकार राजा मेहंदी दोघांचेही चांगले मित्र होते. त्यांनी पण एकदा तेजी यांना याबाबत विचारले. तेव्हा त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्या म्हणाल्या, “मेरा झुमका तो बरेली के बाजार में गिर गया है..!” लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तेजी यांनी केलेले हे विधान राजा मेहंदी यांच्या अगदी डोक्यात फिट्ट बसले होते. 


जेव्हा मेरा साया चित्रपटाची गाणी लिहायची वेळ आली तेव्हा त्यांना तेजी यांच्या या वाक्याची आठवण झाली. त्या वाक्यावर त्यांनी हे गाणे पूर्ण लिहिले. आणि या गाण्याने बरेली शहराला प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्याचे उतराई होण्यासाठी बरेली गावात ५४ वर्षांनी(२०२०) हा हरवलेला झुमका उभा राहिलाय. 


सिनेमाची कथा वेगळीच आहे. या  गाण्याचा व त्या बरेली गावाचा सिनेमाशी काहीही संबंध नाही. बरेलीमध्ये पहिली भेट झाली अभिताभ यांच्या मात्या  -पित्याची. त्यांचाही या सिनेमाशी काहीएक संबंध नाही. 


कशाचाही कशाशीही काहीही संबंध नसताना आज एका सिनेगीताचे-कलाकृतीचे असे अविस्मरणीय स्मारक उभे राहते  ही आश्चर्यकारक घटना आपल्या बॉलीवुड मध्येच घडू शकते.


त्यावेळचे हे प्रतिभावान कलाकार त्यांच्या परिसरस्पर्शाने कोणत्याही घटनेला व त्यावर आधारीत कलाकृतीला  अजरामर करून टाकत असत. अशा अनेक उदाहरणापैकी हे एक...!🙏








Monday, 6 June 2022

किल्ल्यांप्रमाणेच शत्रूंपासून बचाव करण्यासाठी फसवे दरवाजे असलेली घरटी बनवणारा पक्षी

 किल्ल्यांप्रमाणेच शत्रूंपासून बचाव करण्यासाठी फसवे दरवाजे असलेली घरटी बनवणारा पक्षी 








फिरंगी चिमणी प्रजातीचे हे  स्थलांतर करणारे पक्षी सुंदर घरटी बनवतात. या घरट्याचे वैशिष्ट्य म्हणजे या घरट्यांना दोन प्रवेशद्वारे असतात. एक दरवाजा असतो शत्रूला फसवण्यासाठी व दुसरा खरा दरवाजा अंडी व पिल्लांना राहण्यासाठी. खरा दरवाजा इतका छोटा असतो कि त्यातून साप किंवा इतर मोठे पक्षी घरट्यात प्रवेश करू शकणार नाहीत, मात्र लवचिकपणामुळे हे पक्षी त्याच दरवाजातून आत जातात. हा दरवाजा फसव्या दरवाज्यावरच्या झाकणासारखा दिसतो व शत्रू फसून दुसऱ्या दरवाज्याकडे वळतो. 


दुसरा आकाराने मोठा दरवाजा खास शत्रूंसाठी तयार केलेला असतो व त्यातुन शत्रू आत घुसतो मात्र ती घरट्याची अतिशय अरुंद असलेली खोली असते व त्यात शत्रूला आपले भक्ष्य मिळून येत नाही त्यामुळे तो परत फिरतो. व अशाप्रकारे हा अक्षी किंवा त्याची अंडी व पिल्ले सुरक्षित राहतात. 


ही घरटी गवताने बनवलेली व अतिशय लवचिक असतात. त्यांच्यावर पावसाचा, पाण्याचा अथवा वादळाचा काहीही परिणाम होत नाही.  या पक्षांचे इंग्रजी भाषेतील नाव European Penduline Tit असे आहे.







सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...