Friday, 5 May 2023

बुद्ध पौर्णिमा...

 आज बुद्ध पौर्णिमा...  


अत्त दीपो भव:

नाशिकच्या त्रिरश्मी लेण्यातील बुद्धाची प्रतिमा.


शांती,समता,अहिंसा यांची अनमोल शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची ही पौर्णिमा. याच दिवशी त्यांना जन्म,ज्ञान व महानिर्वाण प्राप्त झाले.

"बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसारले. यासाठी स्वतःचे घरदार सोडुन ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. बुद्धांनी जीवनात अतिरेक टाळून सम्यकतेचा आग्रह धरला. अष्टांगमार्ग व पंचशील अनुसरण्याचा उपदेश केला. अपूर्णत्वाकडून पुर्णत्वाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे बुद्ध होण्याचा प्रवास. 


अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन व बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!


#buddhapurnima #बुद्धपौर्णिमा 




Thursday, 4 May 2023

छिन्नमस्ता माता जयंती

 आज छिन्नमस्ता माता जयंती. 


छिन्नमस्ता जयंती ही वैशाख शुद्ध चतुर्दशीला असते. छिन्नमस्ता हे देवी पार्वतीचे अथवा चिंतापूर्णी देवीचे रूप मानतात. ती दशमहाविद्यांपैकी एक अत्यंत महत्वाची देवता मानली जाते. आहे. या देवीला  प्रचंड कालिका,प्रचंडचंडिका अशा इतरही नांवांनीं ओळखले जाते. 


उग्र स्वरूप असलेल्या या देवीचे रूप दिसण्यास अत्यंत भीषण असून या देेेवीच्या एका हातात तिचे कापलेले मस्तक व एका हातात शस्त्र आहे. कापलेल्या शिरविहीन धडातून रक्ताच्या तीन धारा निघून त्या शेजारी असलेल्या देवीच्या दोन्ही मैत्रिणींच्या तोंडात पडत आहेत. गळ्यात कवट्यांची माळ आहे. व ती एका मैथुनरत जोडप्याच्या पाठीवर उभी आहे. 


हिंदू धर्मातील देवी-केंद्रित परंपरेनुसार शाक्त पंथातील कालीकुला संप्रदायामध्ये छिन्नमस्ताची पूजा करतात. जरी छिन्नमस्ता देवी हिला महाविद्यांपैकी एक म्हणून संरक्षित स्थान प्राप्त झाले असले तरी तिची मंदिरे मुख्यतः नेपाळात आणि पूर्व भारतात आढळतात, आणि तिची सार्वजनिक पूजा दुर्लभ आहे. ती एक तांत्रिक देवता आहे आणि गूढ तांत्रिक अभ्यासक तिची उपासना करतात. 'छिन्नमस्ता ही चिन्नमुंडाशी संबंधित आहे - ती तिबेट बौद्ध देवी वज्रयोगिनीचे तुच्छ-मुंडक रूप आहे. शाक्तपंथमतानुसार छिन्नमस्ताची उपासना करणारे राहूच्या प्रभावापासून मुक्त होतात. 


छिन्नमस्ता देवीची साधना ।। ओम  श्रीं ह्रीं क्लीं ऐं वज्र वैरोचनीयै हूं हूं फट स्वाहा: ।। या बीजमंत्राने करतात. 


सोबतच्या छायाचित्रात दाखविलेली छिन्नमस्ता देवीची आदिम शैलीतील धातूची मूर्ती नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात पाहावयास मिळते. 







Sunday, 16 April 2023

भारतीय रेल्वेचा शुभारंभ


'साहेबाचा पोऱ्या किती अकली रे 

बिन बैलाची गाडी कशी ढकली रे! 


हाच तो दिवस आणि हीच ती तारीख.... आजच घडली ती भारताला आधुनिक करणारी घटना.. आणि याच दिवशी जगाच्या इतिहासातील एका प्रकरणात


भारतीय रेल्वेचा शुभारंभ झाला. बरोब्बर १७० वर्षांपूर्वी आशियातील पहिली प्रवासी रेल्वे धावली ती आजच्याच दिवशी. ब्रिटिश राज मध्ये कलकत्त्यावर मात करून प्रवासी रेल्वेचा शुभारंभ करण्याचा मान मुंबई शहराने मिळवला. १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर भारतातली पहिली प्रवासी रेल्वे धावली. 

दुपारी ३.३० वाजता २१ तोफांची सलामी घेऊन या रेल्वेने आपला प्रवास सुरू केला. १४ डब्यांच्या या गाडीत त्यावेळी ४०० भाग्यवान प्रवासी बसले होते. सिंध, सुलतान आणि साहिब या तीन वाफेच्या इंजिनांनी या ट्रेनला ५७ मिनिटात ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचवले. या मार्गावर तेंव्हा कुर्ला आणि भायखळा ही दोनच स्थानके होती. या रेल्वेनं वाटेत पाणी भरण्यासाठी सायन येथे एक थांबा घेतला. ४.४५ वाजता ही गाडी ठाणे स्थानकात पोहोचली तेंव्हा स्वागतासाठी शेकडो ठाणेकर उपस्थित होते. या गाडीने पहिला प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना शाही खाना देण्यात आला. 


वाफेच्या इंजिनाने ओढली जाणारी गाडी पाहून 

' साहेबाचा पोऱ्या किती अकली रे 

बिन बैलांची गाडी कशी ढकली रे ' असं गाणं ही तेंव्हा लोकप्रिय झालं होतं. 



Thursday, 6 April 2023

हनुमान जयंती



मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥


https://tinyurl.com/bbjdpkte


भक्ति, शक्ती, बुद्धी, समर्पण आणि अचल निष्ठेचे मूर्तिमंत प्रतिक असलेले महाबली हनुमान यांची आज जयंती. हनुमानाची दैवत म्हणून उपासना होत असली, हनुमान जयंती साजरी होत असली तरी हनुमानाबद्दल तपशीलवार माहिती असतेच असं नाही.


हनुमानाच्या जन्माची कथा मोठी रोचक आहे. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीला म्हणजे मारुतिरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिरायासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुति राहूच आहे असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतिरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले. हनुमानाला मारुती, महावीर, बजरंगबली, अंजनेय, महारुद्र, अंजनीपुत्र, केसरीनंदन, मारुतीनंदन, पवनपुत्र इ अशा अनेक नावांनी संबोधिले जाते. 


व्युत्पत्ती : वैदिक साहित्यात कुठेही हनुमानाचा उल्लेख नाही. हनुमंत हा शब्द तमिळचे संस्कृत रूप असावे असे पार्जीटर, डॉ. सुनीतीकुमार चतर्जी, शिवशेखर मिश्र इ. अभ्यासकांचे मत आहे. द्रविड शब्दाचे संस्कृत रूप बनविताना बहुतेक प्रारंभी ‘ह’कार जोडण्याची पद्धती आहे. तमिळ आणमंदि (आण= वानर, मंदि= नर) शब्दाचे संस्कृतीकरण म्हणजे हनुमंत होय. तमिळमध्ये अनुमंद असे म्हणतात. म्हणजे संस्कृतातील हाकार इथे लोप पावतो. अनुमान (तमिळ), हनुमंथूडू (तेलगु), अनोमन (इंडोनेशियन), अन्दोमान (मलेशियन) आणि हुंलामान (लाओस) अशी विविध नावे आहेत. परंतु विसाव्या शतकातील भाषाशास्त्री मरे इमानु जे द्राविडी भाषांचे तज्ज्ञ आहेत, त्यांचे असे मत आहे की, संगम साहित्यानुसार मंदि हा शब्द फक्त वानरीला उद्देशून वापरला जातो; वानराला नाही. केमिली बुल्के त्यांच्या ‘रामकथा: उत्पत्ती आणि विकास’ या ग्रंथात म्हणतात की मध्य भारताच्या आदिवासी जमातीत हनुमानाचे मूळ सापडते. छोटा नागपूरमध्ये राहणाऱ्या उरांव व मुंड या आदिवासींमध्ये तिग्गा, हलमान, बजरंग व गडी अशी गोत्रे आढळतात. या सर्वाचा अर्थ वानर असा आहे. त्याचप्रमाणे रेद्दी, बरई, बसौर, भना व खुंगार या जातींमध्येही वानरसूचक गोत्रे आहेत. सिंगभूममधले भूईया जातीचे लोक आपण हनुमंताचे वंशज असल्याचे सांगतात. यावरून हनुमान आदिवासी जमातीचा देव असावा असे वाटते.


हनुमानाच्या विविध उपाधी : रामरक्षेत हनुमानाची विविध विशेषणे सांगितली आहेत. ती अशी-मनोजवं, मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियं, बुद्धीमतावरिष्ठम्, वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं इ.


हनुमानाचे जन्मस्थान: हनुमानाच्या जन्मस्थानाबद्दल विविध प्रांतातील लोक दावे करतात. नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वरपासून सात किमीवरील अंजनेरी पर्वत

कर्नाटकातील हम्पी येथील अंजनेय पर्वत, हरियाणातील गुमला येथून १८ किमीवरील अंजन नावाचे खेडे, अंजनधामानुसार, राजस्थानातील चुरू जिल्ह्य़ातील सुजानगढजवळ लक्षका पर्वत, पुरी धामानुसार, भुवनेश्वरजवळ खुर्द येथील दाट जंगल इ. विविध ठिकाणी त्याचे जन्मस्थळ आहे असे तेथील स्थानिक लोक मानतात. मात्र बहुतांशी लोक नाशिकजवळील अंजनेरी पर्वत अथवा हंपीजवळील अंजनेय पर्वत या दोन ठिकाणांना जन्मस्थळ म्हणून मान्यता देतात. 


हनुमंताला संगीतशास्त्राचा एक प्रवर्तक मानतात. संगीत् पारिजात, संगीत् रत्नाकार इ. ग्रंथांतून प्राचीन संगीताचार्यांबरोबर अंजनेयाचा उल्लेख येतो. आंजनेय् संहिता अथवा हनुमानत्संहिता या ग्रंथाचा उल्लेख तंजौरच्या रघुनाथ नामक राजाने आपल्या ‘संगीत् सुधा’ ग्रंथात केला आहे. संत रामदासांनी त्याची गायनी कला ध्यानात घेऊन त्याला संगीतज्ञानमहानता असे संबोधले आहे.


हनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे.  हनुमानाची पंचमुखी मूर्ती  रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे.


रामायणातून नि राम परंपरेतून दिसणारा पराक्रमी, बुद्धिमंत, रामभक्त हनुमान आणि लोकपरंपरेतून दिसणारा रुद्रावतार, शनीशी साधम्र्य दाखवणारा, यक्षोपासनेशी जवळीक साधणारा, तंत्रोपासनेतही असणारा हनुमान. साधारण उत्तर भारतात वैष्णव परंपरेतला दास-हनुमान आणि लोक परंपरेतला वीर हनुमान प्रकर्षांने जाणवतो तर महाराष्ट्रात समर्थ परंपरेतला हनुमानाचा पगडा जाणवतो. असे असले तरीही महाराष्ट्रात लोक परंपरेतला हनुमानही आपले अस्तित्व टिकवून आहे. हनुमान ही लोकमान्य, आपली वाटणारी देवता आहे. त्यामुळे तिची बलोपासना आणि संकटमोचन प्रतिमा आजही तरुण भजतात हे जाणवते.


हनुमान जयंतीला चणे-गूळ एकत्र करून देण्याची पद्धत असते. हरभरे भाजून त्याचे चणे तयार केले जातात. यालाच फुटाणे असेही म्हणतात. चांगल्या प्रतीच्या हरभऱ्यापासून बनविलेले फुटाणे किंवा फुटाणे सोलून तयार केलेले डाळे हे रुचकर तर असतातच; पण पौष्टिकही असतात. अतिप्रमाणात घाम येणे, अनुत्साह वाटणे, कफदोष वाढल्यामुळे अंगाला जडपणा येणे, अकारण थकवा जाणवणे वगैरे तक्रारींवर चणे उपयोगी असतात. नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी चणे धातुपुष्टीस उत्तम होत. चण्याबरोबर गुळाची योजना केलेली असते कारण गुळातील उष्णता चणे पचवण्यास मदत करते. गुळाचा खडा तोंडात ठेवला रे ठेवला की त्यातून लगेच शरीराला शक्ती मिळते म्हणून उन्हातान्हातून आल्यावर गूळ-पाणी देण्याची पद्धत असते. गूळ हा रक्त वर्धकही असतो. अशा प्रकारे हनुमानजयंतीला दिला जाणारा चणे-गुळाचा प्रसादही आरोग्याच्या दृष्टीनेच योजलेला आहे. 


आज हनुमान जयंतीच्या मुहुर्ताव हनुमंताची समर्पण वृत्ती, पराक्रम आणि संकटांवर मात करण्याची जिद्द् आत्मसात करण्याचा आपण संकल्प करूया. मारुतीरायांचे आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो हीच या मंगलदिनी प्रार्थना आहे. 


संकट कटै मिटै सब पीरा।

जो सुमिरै हनुमत बलबीरा।।


#हनुमानजयंती


Monday, 13 March 2023

फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजेच नाथषष्ठी

आज फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजेच नाथषष्ठी 





अमृताहूनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनविणारे महान संत म्हणजे संत एकनाथ महाराज! एकनाथ महाराजांनी सामान्यांना भक्ती मार्गाची शिकवण दिली. पारंपरिक मराठी पंचांग दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यातील वद्य पक्षातील षष्ठीच्या दिवशी श्री एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली म्हणूनच या दिवशी नाथ षष्ठी साजरी केली जाते.


                श्री संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी " चतुःश्लोकी भागवत " या त्यांच्या पहिल्या ग्रंथाचे लेखन त्यांनी नाशिक मध्ये गोदातीरी, म्हणजेच कपिला संगम की जेथे कपिलमुनींनी तपश्चर्या केली व जनार्दन स्वामींचे नाशिक मधील तपश्चर्येचे ठिकाण आहे अशा तपोवन येथे केले. त्यानंतर तीर्थ यात्रेत नाथ महाराज व त्यांचे गुरू जनार्दन स्वामी यांच्या सोबत असलेले श्री चंद्रभट ( चांदबोधला ) नामक ब्राम्हण याच पवित्र स्थानी नेहमी येऊन भागवताचे पारायण व चिंतन करत असत. पुढे जाऊन भागवताचे अभ्यासक येथे येऊन भागवत अभ्यासत.

     

        म्हणून भागवताचे लेखन झालेल्या या सिद्ध परिसरात एकनाथ महाराजांच्या वंशजांनी गरुडावर विराजमान अशा भगवान श्री विष्णुंचे मंदिर निर्माण करुन येथे श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुका स्थापीत केल्या, असे नाशिक मधील जुनी जाणकार व इतिहास अभ्यासक मंडळी सांगतात.  पूर्वी नाशिक शहर हे जुने नाशिक एवढेच सीमित होते. आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाण्याची सुरवात जेव्हा पासून झाली - तेंव्हा पासून, जातांना पालखीचा दुसरा मुक्काम नाशिक मध्ये ज्या मंदिरात होत असतो, ते मंदिर म्हणजे नाशिक मधील वारकरी संप्रदायाचे त्या काळातील प्रमुख स्थान असावे. त्या श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर येथून नाशिक मधील सर्व भजनी मंडळ फाल्गुन कृ.६ ( नाथ षष्ठी ) या दिवशी टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीने येथे येत व भजन , कीर्तन करत.


                शंभराहून अधिक वर्षां पूर्वीची ही परंपरा म्हणून जुने नाशिक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिर, भजनी मंडळ या पवित्र स्थानी येऊन हि परंपरा अखंडपने चालू ठेवत आहे. तसेच नाशिक मधील पवार कुटुंबीय आणि अनेक भाविक भक्तगण गोपाल काल्याचा प्रसाद येथे आणून वाटत.


               फाल्गून वद्य षष्ठीच्या या दिवशी पाच मोठ्या घटना घडलेल्या असल्याने त्यांस " पंचपर्वश्रेणी पर्व " असं म्हणतात. एकनाथ महाराज स्वत: आपल्या गुरुंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून यादिवशी उत्सव साजरा करीत. पुढे नाथांनीही ह्याच दिवशी जलसमाधी घेतल्याने एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येवू लागला.


पंचपर्व -

१) नाथांचे गुरू श्री जनार्दनस्वामी यांचा जन्म दिवस.

२) स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह याच दिवशी.

३) नाथांना स्वामींचे प्रथमदर्शन व अनुग्रह याच दिवशी.

४) श्री जनार्दनस्वामी यांची पुण्यतिथी याच दिवशी.

५) शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज यांच्या जलसमाधीचा हाच दिवस.


शांतिब्रह्म संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज यांच्या चरणी नाथषष्ठी निमित्त भक्तिपूर्ण नमन....!!!







Sunday, 5 March 2023

होलिका दहन

 फाल्गुन मासी येते होळी

खायला मिळते पुरणाची पोळी

रात्री देतात जोरात आरोळी

राख लावतो आपुल्या कपाळी


https://tinyurl.com/4rzbp26b


वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा होळी हा  हिंदू धर्मियांचा एक महत्वाचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या हा सणाला दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी केली जाते तर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर चिखल, माती अथवा  रंग उडवून धुळवड खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते. पुढे पाच दिवसांनी रंगपंचमी असते. होळीचा सण हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे हे दर्शवतो. या सणाला भारतामध्ये फार महत्त्व आहे. देशातील प्रत्येक भागात होळीचा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.


होलिका दहन

फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन करण्याची परंपरा आहे. काही राज्यांमध्ये याला छोटी होळी असे म्हटले जाते. प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यपने त्याच्या बहिणीची मदत घेतली. पण या प्रयत्नांमध्ये होलिकेचा अंत झाला. होलिका दहनासाठी लाकूड, गवत आणि शेणाची पोळी यांची एक मोठी मोळी उभी केली जाते, त्याभोवती सजावट करुन तिची पूजा केली जाते. त्यानंतर तिला अग्नी दिला जातो. सोबतच होलिका दहनासाठी तयार केलेले पदार्थ अग्नीत समर्पित केले जातात.


लठमार

मथुरेतील ब्रज प्रदेशामध्ये होळी आठवडभर असते. येथील लठमार होळीची परंपरा फार प्रसिद्ध आहे. बरसाना या गावामध्ये हा खेळ होळीच्या दिवशी खेळला जात असे. हे राधेचे गाव होते असे म्हटले जाते. लठमार होळीमध्ये स्त्रिया हातात काठ्या घेऊन पुरुषांना मारण्याचा प्रयत्न करत असतात. येणारा प्रहार रोखण्यासाठी पुरुषांना ढाल दिलेली असते. ही होळी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक मथुरेला जमतात.


दोल जत्रा

पश्चिम बंगाल, ओडिसा अशा काही राज्यांमध्ये होळीच्या दिवशी दोल जत्रा/ डोल जात्रा असते. या निमित्ताने कृष्णाची आराधना केली जाते. कृष्ण-राधा यांच्या मूर्ती झोपाळ्यावर प्रस्थापित केल्या जातात. पूजा सुरु असताना झोपाळा झुलवला जातो. त्यानंतर भक्तगण मिळून रंग खेळतात.


आणखी वाचा – विश्लेषण : होळीच्या नानाविध उत्पत्तीकथा आणि भारताची सांस्कृतिक विविधता


होळी-योशांग

मणिपूर राज्यात होळी आणि योशांग हे उत्सव एकत्रितपणे साजरा केले जातात. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामूहिक गायन-नृत्य करत नागरिक हा सण साजरा करतात.


भस्म होळी

वाराणसीमध्ये भस्म होळी खेळण्याची मोठी प्रथा आहे. नागा साधू, अघोरी आणि अन्य साधू मंडळी ही अनोखी होळी खेळतात. अंत्यसंस्कार झाल्यानंतर जमा झालेल्या राखेने होळी खेळण्याची अघोरी संप्रदायमध्ये परंपरा आहे. ही होळी प्रामुख्याने स्मशानभूमीमध्ये साजरी केली जाते.


फुलों वाली होळी

वृंदावनमध्ये होळीच्या आदल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी राधा-कृष्णाच्या मूर्तींवर फुलांचा वर्षाव केला जातो आणि त्यांची पूजा-अर्चना केली जाते. यंदाच्या वर्षी ३ मार्च रोजी वृंदावनातील बांकेबिहारी मंदिरामध्ये फुलों वाली होळी खेळली गेली.


एवढेच काय तर महाराष्ट्रामधील कोकण, विदर्भ अशा प्रत्येक विभागामध्ये सुद्धा होळीचा उत्सव साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असल्याचे पाहायला मिळते.





Wednesday, 15 February 2023

दासनवमी....

 आज दासनवमी....


सद्गुरु समर्थ रामदासांनी पंधरा दिवस आधी पूर्व सूचना देऊन इ.स.१६८२ च्या माघ वद्य नवमीला दुपारी साडे बारा वाजता सज्जनगडावर देह ठेवला. तेंव्हापासून माघ वद्य नवमी ' दासनवमी ' म्हणून ओळखली जाते.


समर्थांनी तर देह ठेवण्याआधी आपल्या शिष्यांना दिलेल्या अखेरच्या संदेशात स्पष्ट सांगून ठेवले आहे कीं ते या जगांत त्यांच्या ग्रंथ रूपाने निरंतर वास करून आहेत. 

माघ वद्य नवमीला समर्थांनी तीन वेळेला मोठ्यांदा रामनामाची गर्जना केल्यानंतर त्यांची प्राणज्योत त्यांच्या शरीरातून बाहेर पडली व समोरच्या राममूर्तीत प्रविष्ट झाली. दुपारी साडे बारा वाजता त्यांनी अशा प्रकारे देह ठेवला.

रामदास स्वामी समाधिस्त झाल्याची ही बातमी संभाजीराजांना समजली. समर्थांच्या उत्तरकार्यासाठी त्यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना सज्जनगडी जाण्याची आज्ञा केली. नंतर दीड महिन्याने संभाजीराजे रामचंद्रपंतांसह सज्जनगडावर गेले. समर्थांच्या समाधीचे दर्शन घेऊन समाधीसुद्धा मोठे देवालय बांधण्याची आज्ञा केली. दीड महिन्यात मोठे देवालय करविले. खाली समाधी आणि वरती तंजावरहून आणलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमान याच्या मूर्ती असे हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मठाच्या खर्चास द्रव्य पुरविण्याची रामचंद्रपंत अमात्य व खंडोबल्लाळ यांना आज्ञा दिली. साधुसंतांचा योग्य तो मान राखण्याचे शिवाजी महाराजांचेच धोरण संभाजीराजांनी अंगिकारले.

समर्थ समाधी रुपाने सज्जनगडावर आजही आहेत व भाविकांना याचे प्रत्यंतर अनेक प्रकारांनी येत असते. तेथील समाधी मंदिरावर पुढील श्लोक आहे.

सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदारश्रृंगापरि ।
नामे सज्जन जो नृपे वसविला श्रीउर्वशीचे तिरी ।
साकेताधीपती कपि भगवती हे देव ज्याचे शिरी ।
तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या टाकळी (नाशिक) येथील  गोमय हनुमान मंदिरात जतन केलेल्या समर्थांच्या चरण पादुका (खडावा)


सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...